ई ऑफिस’ हा पहिला टप्पा यशस्वी झाला. मात्र ज्या वेळी शासनाच्या संकल्पनेनुसार ही सेवा थेट जनतेपर्यत पोहोचेल त्याच वेळी हा टप्पा यशस्वी झाला, असे म्हणता येईल.
सिंधुनगरी– ‘ई ऑफिस’ हा पहिला टप्पा यशस्वी झाला. मात्र ज्या वेळी शासनाच्या संकल्पनेनुसार ही सेवा थेट जनतेपर्यत पोहोचेल त्याच वेळी हा टप्पा यशस्वी झाला, असे म्हणता येईल. या प्रणालीत हा जिल्हा देशातील पहिला जिल्हा म्हणून झळकला. त्याचप्रमाणे देशाला भविष्य देणारा सिंधुदुर्ग जिल्हा देशात ‘एफ जिल्हा’ म्हणून झळकेल, असा विश्वास सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ई रवींद्रन यांनी व्यक्त केला. निमित्त होते सिंधुदुर्ग जिल्हा ई ऑफिस प्रणलीच्या वर्षपूर्तीचे!
सिंधुदुर्ग महसूल प्रशासनाने सुरू केलेल्या ई ऑफिस प्रणालीला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने जिल्हाधिकारी भवनात या वर्धापन दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी ई रवींद्रन आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते केक कापून साजरा झाला. व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते, रवींद्र बोंबले, उपजिल्हाधिकारी कशिवले, नियोजन अधिकारी हनुमंत माळी, एलआयसीचे बी. बी. हेगडे, लिंगराज आदींसह सर्व तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी मोठय़ा संख्येने जिल्हाधिकारी भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांनी या प्रणालीत चांगले काम केल्यानेच ‘ई ऑफिस’चे चांगले चित्र दिसले. मात्र गव्हर्नमेंट ई गव्हर्नमेंट हा पहिला टप्पा झाला. आता गव्हर्नमेंट टू बिझीनेस व गव्हर्नमेंट टू सिटीझन हे शासनाचे संक ल्प असलेले दोन महत्त्वाचे टप्पे पूर्ण करून या प्रणालीतून गतिमान व चांगली सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यास ही प्रणाली ख-या अर्थाने यशस्वी झाली असे म्हणता येईल व त्याचवेळी सिंधुदुर्ग जिल्हा भविष्य देणारा एफ जिल्हा, एफ गव्हर्नमेंट म्हणून देशात झळकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी ई रवींद्रन यांनी व्यक्त केला.
ई ऑफिसचे शिवधनुष्य पेलून धरण्यापेक्षा ते सक्षमपणे सांभाळण्याची ताकद ठेवा. त्यातून यशस्वी बाण सोडण्याचा प्रयत्न करा व जिल्हावासीय जनतेस चांगली सेवा द्या, असे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
पाच लाख कागद वाचले !
या ई ऑफिस प्रणालीत ५ लाख कागद आणि ५० लाखांची बचत झाल्याचे जाहीर करण्यात आले. वर्षभरात १ लाख ४५ हजार टपाल संगणक प्रणालीवर नोंदविले गेले तर ५४ हजार पत्रव्यवहार संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात आले. यातून ४५ हजार फाइल्स करण्यात आल्याचेही या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले. या वेळी महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुकही जिल्हाधिकारी ई रवींद्रन यांनी करताना पुढच्या काळातही एफ ऑफिससाठी योगदान द्यावे असे आवाहनही केले.