योग, ज्ञान, याग हे सर्व मार्ग भगवंताकडे जाणारे अवघड घाट आहेत. मात्र आमच्या साधुसंतांनी या अवघड वाटा मोडून नामजपाचा राजमार्ग भाविकांसाठी खुला करून दिला. भगवंतांचे नाव हे सोपे आणि सहजसाध्य होणारे आहे. मात्र ते मनोभावे, सद्गदित अंत:करणाने घेतले पाहिजे.
एकतत्त्व नाम दृढ धरी मना।
हरीशी करुणा येईल तुझी॥ १॥
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद।
वाचेशी सद्गद जपे आधी॥ २॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा।
वाया आणिक पंथा जाशी झणी॥ ३॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी।
धरोनी श्रीहरी जपे सदा॥ ४॥
भगवंताला आपलेसे करण्यासाठी नाना प्रकारची साधने असली तरी त्यात त्याचे नाम हेच एकमेव तत्त्व आहे. इतर साधनांच्या माध्यमांद्वारे भगवंताचे आकलन करण्याचा प्रयत्न म्हणजे एकटय़ाने अवघड कडा चढण्यासारखे आहे. अगदी योगाचेच उदाहरण द्यायचे झाले तर योग किती अवघड आहे. श्वासनिरोधन करून शरीरातील तापमान तप्त करायचे आणि कुंडलिनी जागृत करायची. नाभीच्या खाली असलेली ही कुंडलिनी जागृत झाल्यानंतर हळूहळू ब्रह्मरंध्राच्या दिशेने जाते.
मात्र त्यात श्वासनिरोधनाचे सूत्र फसले तर त्यात जिवाला धोकाही होऊ शकतो. त्या वेळी सावरण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. ज्याप्रमाणे कडय़ावरून एकटय़ाने जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वत:च्या आत्मघाताला कारणीभूत होण्यासारखे आहे. तसेच योगाच्या माध्यमातून भगवंताकडे जाण्यासारखे आहे. ज्ञानेश्वर महाराज गीतेवरील आपल्या टीकेमध्येसुद्धा योगाच्या माध्यमातून भगवंताला आकलन करण्याचे प्रयत्न करणे म्हणजे दु:ख ओढवून घेण्यासारखे आहे, असे सांगतात. महाराज म्हणतात –
योगाचिया वाटा। जे गेले गा शुभटा।
तया दु:खाचाची वाटा। भागा आला॥
योग, ज्ञान, याग हे सर्व मार्ग भगवंताकडे जाणारे अवघड घाट आहेत. मात्र आमच्या साधुसंतांनी या अवघड वाटा मोडून नामजपाचा राजमार्ग भाविकांसाठी खुला करून दिला. हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात –
मोडोनिया वाटा सूक्ष्मदुस्तर। केला राज्यभार चाले ऐसा॥
अवघड साधने टाकून नामस्मरणाचे सुलभ साधन साधुसंतांनी आम्हाला दाखवून दिले. संसारिक दु:खाने भयभीत झालेल्या जीवांना दिलासा देताना ज्ञानदेव म्हणतात, इतर साधनांची खटापट न करता भगवंताचे नामच एकतत्त्व आहे, असे समजून मनामध्ये दृढ धर. या ठिकाणी दृढ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कोणत्याही कार्यासाठी दृढ निश्चय असेल तरच ते कार्य साध्य होते. म्हणून या नामाला मनामध्ये दृढ धरायला सांगतात. कारण केवळ वाचेने केलेला उच्चार वरपांगी ठरू शकतो. जोपर्यंत मनापासून भगवंतांचे नाव घेतले जाणार नाही, तोपर्यंत त्याला (भगवंताला) आपली करुणा येणार नाही.
भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे इतर साधने आहेत, परंतु ते अवघड आहे. इथे मात्र महाराज सांगतात, ज्या नामाच्या माध्यमातून तुला हरीची करुणा येणार आहे, असे अत्यंत सोपे नाम म्हणजे ‘रामकृष्ण गोविंद’..! काही साधने सोपी असून फलद्रुप मात्र नसतात. काही साधने फलद्रुप असतात मात्र सोपी नसतात तर काही साधने सोपी आणि फलद्रुप दोन्हीही होणारी असतात.
भगवंतांचे नाव हे असे सोपे आणि सहजसाध्य होणारे आहे. मात्र ते मनोभावे, सद्गतीत अंत:करणाने घेतले पाहिजे. नाम सोडून इतर मार्गाने भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे म्हणजे व्यर्थ त्रास करून घेण्यासारखे आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी त्या भगवंतांची जपमाळ मौनानेच अंत:करणात धरून त्याचे चिंतन करीत आहे. आपणही त्याचे तसेच चिंतन केल्यास त्या
करुणाघन परमात्म्याला तुमची करुणा आल्याशिवाय राहणार नाही.