मुंबई आणि उपनगरात भंगारात गेलेल्या रिक्षा-टॅक्सी पुन्हा जोडून रस्त्यावर उतरविल्या जात असल्याने असुरक्षित आणि धोकादायक प्रवास सर्रासपणे शहरात सुरू आहे.
मुंबई- मुंबई आणि उपनगरात भंगारात गेलेल्या रिक्षा-टॅक्सी पुन्हा जोडून रस्त्यावर उतरविल्या जात असल्याने असुरक्षित आणि धोकादायक प्रवास सर्रासपणे शहरात सुरू आहे. हा धोकादायक प्रवासाला आळा घालण्याकरिता शहरातील भंगारात गेलेल्या रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करण्याचे आदेश एमएमआरटीएकडून परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.
त्यानुसार परिवहन विभागाकडून मुंबई आणि उपनगरातील रस्त्यांवर धावणा-या भंगार रिक्षा-टॅक्सींवर मंगळवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. याकरिता परिवहन विभागाकडून एक विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आरटीओतील एका अधिका-याने दिली.
मुंबईतील अंधेरी, वडाळा, बोरिवली आणि ताडदेव, आरटीओच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या भंगार रिक्षा-टॅक्सींच्या वाहतुकीवर २ जून ते ८ जून दरम्यान सलग सात दिवस कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. याकरिता नियुक्त करण्यात आलेले विशेष पथक अशा प्रकारच्या धोकादायक भंगारातील रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करणार आहे.
[poll id=”1034″]
तपासणी दरम्यान अशा प्रकारची संशयास्पद रिक्षा किंवा टॅक्सी आढळल्यास त्या वाहनाची कागदपत्रे तपासून त्वरित कारवाई करण्यात येणार आहे. दोषी आढळलेल्या अशा प्रकारच्या वाहनांवर बुलडोझर फिरवून ती भंगारात काढली जाणार असल्याची माहिती आरटीओच्या अधिका-याने दिली.
शहरातील वांद्रे, कुर्ला, जोगेश्वरी, कांदिवली, अंधेरी, वडाळा अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारची वाहतूक सुरू असल्याचे यापूर्वी अनेक वेळा उघड झाले आहे. या प्रकाराबाबत रिक्षा संघटनांकडूनही अशा प्रकारच्या तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे धोकादायक वाहतूक सर्रासपणे सुरू आहे.
कारवाई करूनही ही संख्या कमी होताना दिसत नाही. अनेक रिक्षा-टॅक्सी चालकांकडे वाहनांची कागदपत्रे नसतानाही अशा प्रकारची अनधिकृत वाहतूक सुरू असते. मात्र वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये साटेलोटे असल्याने ही वाहतूक सुरू असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. अशा प्रकारे संपूर्ण मुंबई आणि उपनगरात भंगारात गेलेल्या जवळपास ४० ते ५० हजार रिक्षा-टॅक्सी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.