भारताने १९८०च्या दशकात स्वीडनकडून घेतलेल्या बोफोर्स तोफ घोटाळा हा प्रसारमाध्यमांनी चालवलेला खटला होता.
नवी दिल्ली- भारताने १९८०च्या दशकात स्वीडनकडून घेतलेल्या बोफोर्स तोफ घोटाळा हा प्रसारमाध्यमांनी चालवलेला खटला होता. भारतीय न्यायालयात त्याबाबत कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.
स्वीडिश वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, आपण संरक्षणमंत्री असताना भारताने स्वीडनकडून बोफोर्स तोफा खरेदी केल्या. या तोफा खरेदीत कोणताही घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले नाही. यातील कोणताही आरोप भारतीय न्यायालयात सिद्ध झालेला नाही.
बोफोर्स तोफा खरेदीनंतर आपण अनेक वर्षे संरक्षणमंत्रीपद भूषवलेले आहे. लष्करातील माझ्या जनरल्सनी या तोफा अतिशय उत्तम असल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अजूनही या तोफा भारतीय लष्कर वापरत आहे. बोफोर्स संदर्भात कथित घोटाळा हा प्रसारमाध्यमांनी चालवला आहे, असे मुखर्जी यांनी सांगितले.
तुम्हाला या प्रकरणात काही संशय वाटत असेल मात्र त्याचे कोणतेही पुरावे नाहीत. हा घोटाळा झाल्याची चर्चा होते ती केवळ प्रसारमाध्यमांमुळेच. हे संपूर्ण प्रकरण प्रसारमाध्यमांनी चालवले, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
भारतीय लष्करासाठी स्वीडनकडून ४१० होवित्झर तोफा खरेदी केल्या होत्या. हे कंत्राट १.३ अब्ज डॉलर्सचे होते. या व्यवहारात ६४ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप बोफोर्स कंपनीने केला. त्यामुळे संपूर्ण देशात वादळ उठले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९मध्ये झालेल्या कारगील युद्धात बोफोर्स तोफांनी जोरदार कामगिरी केली होती.
संरक्षणमंत्रीही म्हणतात बोफोर्सची कामगिरी उत्तम
बोफोर्स तोफांचा दर्जा कसा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, स्वीडिश बनावटीच्या बोफोर्स तोफा अतिशय उत्तम असून त्यांची कामगिरीही चांगली आहे.
भारताचे संरक्षण करण्यासाठी आपण कोणतेही साहस करू शकतो. कोणी भारतावर हल्ला केल्यास त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जाईल. भारताकडे १३ लाखांचे मजबूत लष्कर असून ते केवळ शांततेचे प्रवचन झोडण्यासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.