हिमाचल प्रदेशात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग नऊ दिवसांपूर्वी कोसळला होता.
बिलासपूर- हिमाचल प्रदेशात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग नऊ दिवसांपूर्वी कोसळला होता. यावेळी बोगद्यात काम करत असलेले तीन मजूर आतमध्येच अडकून पडले होते. यापैकी दोन मजुरांना नऊ दिवसांनी तब्बल २११ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एनडीआरएफच्या जवानांनी यशस्वीपणे सुखरूप बाहेर काढले आहे. तर एक मजूर मात्र अजूनही बेपत्ता आहे.
हिमाचल प्रदेशातील किरतपूर-मनाली दरम्यान सध्या रस्त्याचे काम सुरू असून यात एका ठिकाणी १.२ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. या बोगद्याचा बाहेरील भाग १२ सप्टेंबर रोजी कोसळला होता.
यावेळी बोगद्यात काम करत असलेले मणिराम, सतीश तोमर आणि हृदयराम हे तीन मजूर आतच अडकले होते. त्यांचा बाहेर येण्याचा रस्ता बंद झाला होता. मात्र आतमध्ये पुरेशी जागा असल्याने ते जिवंत राहू शकले. यानंतर या मजुरांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले.
यावेळी सुमारे २११ तासांचे ऑपरेशन राबवून यापैकी मणिराम आणि सतीश तोमर या दोघांना बाहेर काढण्यात आले. तर हृदयराम मात्र बेपत्ता आहे.
हे मजूर आतमध्ये अडकलेले असताना त्यांच्याकडे असलेल्या वेब कॅमेराच्या माध्यमातून एनडीआरएफचे जवान त्यांच्याशी संपर्कात होते. त्यानंतर बोगद्याच्या छताला भोक पडून त्यातून या दोघांना बाहेर काढण्यात आले, अशी माहिती एनडीआरएफचे अधिकारी जयदीप सिंह यांनी दिली.