बेळगावमधील वडगाव पिरनवाडी आणि फोर्ट रोडभागात रविवारी रात्री दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याने शीघ्र कृती दलाच्या 250 जवानांनी पथ संचलन केले.
बेळगाव – बेळगावमधील वडगाव पिरनवाडी आणि फोर्ट रोडभागात रविवारी रात्री दोन गटांत झालेल्या हाणामारीने निर्माण झालेल्या तणावानंतर मंगळवारी शहरातील जनजीवन हळूहळू सुरळीत होत आहे. दरम्यान, शहरात सकाळी शीघ्र कृती दलाच्या 250 जवानांनी पथ संचलन केले. तणावानंतर मंगळवारी सकाळपासूनच लोक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले होते. पण, मंगळवार असल्याने अर्ध्याहून अधिक दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
शहरात जमावबंदी लागू करण्यात आल्याने शहरातील काही शाळा मंगळवारी सुरू झाल्या. तर काही शाळा आजही बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता शहरातील सर्व शाळा बुधवारपासूनच सुरू होणार आहेत. वडगाव आणि शहापूर भागात येत्या 1 सप्टेंबपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा भाग अति संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर, शहरातील अन्य भागांत बुधवार सायंकाळपर्यंत 144 कलम लागू करण्यात आला आहे. सोमवारपासून कोलमडलेली येथील बस सेवा मंगळवारी काही प्रमाणात सुरळीत झाली.
दरम्यान, वडगाव भागात असिफ माणगावकर आणि फोर्ट रोड येथे डॉचेतन पाटील यांचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी 48 जणांना ताब्यात घेतले आहे.
वडगावमधील एका गटाने शहापूर पोलिस ठाण्यात एका लोकप्रतिनिधीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत तपास सुरू असून त्यानंतरच तक्रार नोंदवली जाईल.
– संदीप पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख
शीघ्र कृती दलाचे पथ संचलन
बेळ्गाव शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 800 आणि अन्य जिल्ह्यातील 1400 असे एकूण 2200 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. बेळगाव, विजापूर, धारवाड आणि हावेरी येथून पोलिस बळ मागवण्यात आले आहे. शहरात शीघ्र कृती दलाचे 250 जवान दाखल झाले असून त्यांनी मंगळवारी सकाळी वडगाव शहरात पथ संचलन केले. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन गोपाल कृष्ण, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी वडगाव, पिरण वाडी आणि फोर्ट रोड परिसराचा दौरा करून पाहणी केली. तसेच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखावी, असे आवाहन केले.