राजकारणातील चढउतारावर स्वार होत असतानाच येणा-या प्रत्येक प्रसंगाला धिराने सामोरे जाणारे काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे दिल्लीत निधन झाले. अलीकडेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन झाले. २०१९च्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेस पक्षातील या दोन नेत्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झालेले आहे. कदाचित बदलते राजकारण आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव प्रकृती अस्वस्थ्यावर परिणाम करीत नाहीत ना, अशीही एक दाट शंका व्यक्त केली जात आहे. गुरुदास कामत हे एक धडाडीचे नेते होते. कोणत्याही पदापेक्षा ते स्वाभिमानाला किंमत देणारे होते.
मुंबईच्या राजकारणात गुरुदास कामत यांचा दबदबा होता. विशेषत: मुंबई काँग्रेसच्या चढउतारात गुरुदास कामत यांचे स्थान खूप महत्त्वाचे होते. एकंदर राजकारणात आणि पक्षात आपला एक दबदबा आणि रुबाब कामत यांनी कायम ठेवला होता. कार्यकर्ते ही कोणत्याही राजकीय नेत्याची ताकद असते. कामत यांच्याकडे कार्यकर्त्यांचे मोहळ होते. विशेषत: गोरगरीब झोपडपट्टीतील लोकांचे त्यांना मोठे पाठबळ होते. तीच त्यांची ताकद होती. त्या बळावरच त्यांनी काँग्रेस पक्षात आणि राजकीय जीवनात अनेक पदावर काम केले. १९७२ मध्ये विद्यार्थी जीवनातच त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९७६ साली त्यांनी काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयचे अध्यक्षपद भूषवले होते. १९८४ मध्ये अत्यंत तरुण वयात ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यावेळी मुंबई काँग्रेसवर मुरली देवरा यांचा एकछत्री अंमल होता. देवरा यांच्या विरोधात ब्र काढण्याची कुणाची हिंमत नव्हती. त्या काळात कामत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये आपले स्थान निर्माण करायला सुरुवात केली होती. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे अत्यंत निकटवर्ती होते. राजीव गांधी कधी मुंबई दौरावर असले की अनेकदा स्वत: कामत त्यांची गाडी चालवत असत. ते सावलीसारखे त्यांच्यासोबत राहात होते. त्यातून त्यांचा मुंबई काँग्रेसमध्ये एक दबदबा निर्माण झाला होता. पुढे ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही झाले. या काळात त्यांनी मुंबई काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर खूप भर दिला होता.
पक्षीय राजकारणाबरोबरच त्यांनी संसदीय कारकीर्दही चांगलीच गाजविली. २००९ ते २०११ या काळात ते मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. या पदावर विराजमान झाल्यानंतर कामत यांचे मुंबई काँग्रेसमधील स्थान आणखीनच मजबूत झाले. पण काँग्रेसमध्ये एखाद्याचे महत्त्व वाढू लागले की, त्याचे हळूच पंख छाटण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे कामत यांच्याकडील गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी काढून घेऊन दुय्यम दर्जाचे पेयजल व स्वच्छता खाते देण्यात आले. त्याच वेळी कामत यांना किती तरी ज्युनिअर असलेल्या मिलिंद देवरा यांना चांगले खाते देण्यात आले. ही खेळी त्यांनी लगेच ओळखली. तडकाफडकी राज्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला. तरीही ते पक्षात सक्रिय होते. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेत कामत यांचा पराभव झाला. त्यानंतरही पक्षo्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवत राजस्थान व गुजरातचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविली होती. मात्र मुंबई काँग्रेसवर कामत यांची जास्त नजर होती. विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्याकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी असावी, किमानपक्षी काही अधिकार असावेत, असे त्यांना वाटत होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना जास्त महत्त्व दिले. परिणामी कामत कमालीचे नाराज झाले. त्यातूनच त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केला होता.
लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले तेव्हा पक्षश्रेष्ठींना पुन्हा कामत यांची गरज भासू लागली. सहा खासदार आणि ३४ आमदार असणा-या मुंबईवर पकड बसवायची असेल तर कणखर आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज पक्षश्रेष्ठींनी ओळखली होती. म्हणूनच मुंबई काँग्रेसची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे येईल, असे संकेत मिळत होते. परवा कामत दिल्लीत सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी ‘‘चुनाव आ रहे है। आपको बढी जिम्मेदारी निभानी है।’ असे सांगत कामत यांच्याकडे मुंबई काँग्रेसची जबाबदारी देण्याचे संकेत पटेल यांनी दिले होते. मात्र त्यानंतर काही तासांतच कामत यांनी या जगाचा निरोप घेतला.
काँग्रेस पक्षाची सध्या देशात आणि राज्यात परिस्थिती वाईट आहे. महाराष्ट्रातील वातावरणही काँग्रेसला अद्यापही पोषक नाही. महाराष्ट्रातील सत्तेत मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. विशेषत: काँग्रेसला या दोन्ही भागांनी कायम साथ दिलेली आहे. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील पतंगराव कदम आणि मुंबईतील गुरुदास कामत यांचे जाणे पक्षासाठी मोठी हानी आहे. ती काँग्रेस पक्ष कशी भरून काढणार हा खरा प्रश्न आहे.