राजकीय पक्ष स्थापनेच्या मुद्यावरुन अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यात शाब्दीक लढाई सुरु झाली आहे
नवी दिल्ली – राजकीय पक्ष स्थापनेच्या मुद्यावर अण्णा हजारेंच्या मताशी सहमत असणा-या किरण बेदींनी गुरुवारी भष्टाचारविरोधी चळवळीने राजकीय पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे का ? असा सवाल उपस्थित करत अरविंद केजरीवालांवर टीका केली. भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे स्वरूप कसे असावे, याविषयी केजरीवाल यांनी आपली भूमिका बदलली आहे.
अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाने चळवळीला एकसंध बांधले होते. मात्र ते नसल्याने चळवळ विस्कळीत होईल, असे बेदी म्हणाल्या. केजरीवालांनीही ‘किरण बेदी यांच्यावर पलटवार केला. किरण बेदींना राजकरणात यायचे नसेल तर त्यांनी येऊ नये असे केजरीवाल म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधात लढयात अण्णा सर्वांना एकत्र आणू शकतात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर सर्व चळवळींना एकत्र आणून राजकीय पक्षांवर दबाव आणण्याचे तसेच सक्षम लोकपाल विधेयक आणण्याची अण्णांची क्षमता आहे असे बेदी म्हणाल्या.
अण्णांचा निर्णय दुर्देवी – केजरीवाल
‘‘अण्णा हजारे आमच्यासाठी गुरू आणि पित्यासारखे आहे. त्यांचा आम्ही आदर करतो. परंतु राजकारणातील प्रवेशाबाबतचा त्यांचा निर्णय धक्कादायक आहे,’’ असे मत टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले. राजकीय पक्ष स्थापनेवरून ‘टीम अण्णा’त फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर ते गुरुवारी पत्रकारांशी बोलत होते.
राजकीय पक्ष स्थापनेवरून केजरीवाल व आपल्यात मभेद असल्याचे स्वत: अण्णा यांनी बुधवारी स्पष्ट केले होते. केजरीवाल यांनी जर पक्ष स्थापन केलाच, तर आपले नाव किंवा छायाचित्र वापरू नये, असा इशाराही अण्णांनी दिला होता.