सरकार स्थापनेसाठी भाजप आणि ‘आप’ यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविणा-या किरण बेदींचा प्रस्ताव ‘आप’ने धुडकावून लावला आहे.
नवी दिल्ली- सरकार स्थापनेसाठी भाजप आणि ‘आप’ यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविणा-या किरण बेदींचा प्रस्ताव ‘आप’ने धुडकावून लावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या आम आदमी पार्टीने सरकार स्थापनेसाठी कोणालाही पाठींबा देण्यास किंवा कोणाचाही पाठिंबा घेण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत दिल्लीत पुन्हा निवडणुक घेण्याचा पर्याय असून आप यासाठी तयार असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी सोमवारी सांगितले.
७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पहिल्याच निवडणुकीत २८ जागा जिंकल्या. तर भाजपने ३१ जागांवर विजय मिळवला असून सत्ताधारी काँग्रेस आठ जागांसह तिस-या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ‘आप’च्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी पुन्हा निवडणुका घेतल्यास आम्ही निवडणुकीला सज्ज असल्याचे सूचक वक्तव्य केले.
तत्पूर्वी, अण्णा हजारे यांच्यासोबत केजरीवालांसह जनलोकपाल आंदोलनात सहभाग घेतलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी ‘आप’ आणि ‘भाजप’ यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. दोन्ही पक्ष कोणाचाही पाठिंबा घेणार किंवा देणार नसल्याने त्रिशंकू स्थिती कायम आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास दिल्लीत पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल. यापार्श्वभूमीवर किरण बेदी यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन्ही पक्षांनी मिळून दिल्लीत सत्ता स्थापन करावी असे आवाहन केले. तसेच या दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. मात्र आपने बेदींचा हा प्रस्तान धुडकावून लावल्याने दिल्लीतील सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे.