आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार आजपासून
जकार्ता – १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारपासून (१८ ऑगस्ट) इंडोनेशियामध्ये सुरुवात होत आहे. या स्पर्धेत बॅडमिंटनपटूंसह बॉक्सर, नेमबाज आणि वेटलिफ्टर्सवर भारताची भिस्त आहे. दरम्यान, भारताचा टेनिस संघ गुरुवारी अनुभवी खेळाडू लिअँडर पेसशिवाय दाखल झाल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
आशियाई स्पर्धेतील आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी पाहता २०१० ग्वांगजो आशियाई स्पर्धेत भारताने सर्वाधिक ६५ पदके मिळवली आहेत. त्यात १४ सुवर्णासह १७ सुवर्ण आणि ३४ कांस्यपदकांचा समावेश आहे. १९५१मध्ये नवी दिल्लीत भारताला सर्वाधिक सुवर्णपदके मिळवण्यात यश आले. त्यावेळी भारताला १५ सुवर्णपदके जिंकता आली. स्पर्धामधील स्थानाचा विचार करता, भारताने सर्वोत्कृष्ट स्थान दुसरे आहे. मायदेशामध्ये (१९५१) यजमानांनी दुसरे स्थान मिळवले होते. मागील ४ स्पर्धाचा विचार करता भारताने प्रत्येक एशियाडमध्ये १० किंवा त्याहून अधिक सुवर्णपदके मिळवली आहेत. आशियाई स्पर्धात सुवर्णपदकांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवण्यास उत्सुक असलेल्या भारताला बॅडमिंटन आणि वेटलिफ्टिंगमध्ये अद्याप सुवर्ण कामगिरी नोंदवता आलेली नाही.
यंदाच्या स्पर्धेत भारताचे तब्बल ५७२ खेळाडू सहभागी होत आहेत. त्यात ३१२ पुरुष, २६० महिलांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत प्रशिक्षक, स्पोर्ट स्टाफ आणि पदाधिकारी असा मिळून २३२ जणांचा ताफा आहे. भारताचे खेळाडू ३६ क्रीडा प्रकारांमध्ये नशीब अजमावणार असून भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्यावर पथकप्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारताने मागील खेपेस हॉकीमध्ये पुरुष गटात सुवर्णपदक मिळवले आहे. जेतेपद राखण्यात यश आल्यास भारताच्या हॉकीपटूंसाठी तो एक विक्रम असेल.
भारतासह इंडोनेशिया, जपान, फिलिपीन्स, श्रीलंका, सिंगापूर आणि थायलंड हे सात देश आजवरच्या सर्वच्या सर्व आशियाई स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
>> सर्वच्या सर्व आशियाई स्पर्धात खेळणा-या सात देशांपैकी भारत एक
>> भारताचे ५७२ खेळाडूंचे पथक; ३१२ पुरुष, २६० महिला
>> भालाफेकपटू नीरज चोप्रा पथकप्रमुख
>> बॅडमिंटन, वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा
टेनिसपटू पेसची माघार
भारताचा दुहेरीतील अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेसने आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली. पसंतीचा जोडीदार न मिळाल्यामुळे माघारीचा कटू निर्णय घ्यावा लागला, असे त्याने म्हटले आहे. पेसला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या ‘टॉप्स’ योजनेतून यापूर्वीच वगळण्यात आले होते. त्यानंतरही त्याने आशियाई स्पर्धेत खेळण्यास होकार दिला होता. त्याला दुहेरीमध्ये रोहन बोपण्णाबरोबर खेळायचे होते. पण, अखिल भारतीय टेनिस संघटनेने बोपण्णा याची आणि दिवीज शरणची जोडी बनवली. त्यामुळे पेस याला रामकुमार रामनाथन किंवा सुमीत नागल यांच्यासोबत खेळण्याशिवाय पर्याय नसल्याचे कर्णधार झिशान अली यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे पेस याने माघार घेतल्याचे समजते.