टीम इंडियाच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी बीसीसीआयने भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षासंबंधी प्रमुख रवी सावानी यांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – सिडनीमधील ओलीस नाटयाच्या घटनेनंतर भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरी, टीम इंडियाच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी बीसीसीआयने भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षासंबंधी प्रमुख रवी सावानी यांना ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
चार कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौ-यावर असून, ही मालिका संपल्यानंतरही आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच रहाणार आहे. ऑस्ट्रेलियन दूतावास सावानी यांनी व्हिसा द्यायला तयार झाला असून, सावानी मंगळवारी रात्री ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.
सावानी आधी ब्रिस्बेनला जाणार आहेत जिथे भारतीय संघ आपला दुसरा कसोटी सामना खेळणार आहे त्यानंतर सिडनीला जाऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना सहा ते दहा जानेवारी २०१५ दरम्यान सिडनीमध्ये होणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँण्ड यांनी आम्हाला सुरक्षेची पूर्ण हमी दिली आहे पण तेथील परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही स्वत:च्या पातळीवर ही पाहणी करत आहोत असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. सावानी स्थानिक सुरक्षा यंत्रणांशी चर्चा करण्याबरोबरच संघाशी विचारविनिमय करणार आहेत.