आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतराम मांझी यांनी नेमक्या परीक्षेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बिहार विधानसभेत बहुमत सिध्द करण्याआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
पाटणा – आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतराम मांझी यांनी नेमक्या परीक्षेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी बिहार विधानसभेत बहुमत सिध्द करण्याआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यामुळे मांझी यांचा बंडाचा बार फुसका ठरला असून, यामध्ये भाजपाची सपशेल हार झाली आहे. कारण मांझींच्या बंडाला भाजपाने पाठिंबा दिला होता.
बिहार विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्याच्या तासभर आधी मांझी यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रधान सचिवांनी मांझी यांच्या राजीनाम्याची घोषणा केली.
मांझी यांच्या राजीनाम्यामुळे नितीश कुमार यांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी आसनस्थ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितीश कुमार यांना स्वपक्षातल्या ९७ आमदारांसह राजद, काँग्रेस आणि सीपीआयच्या आमदारांचा पाठिंबा आहे. नितीश कुमार यांच्याजवळ १२८ आमदारांचा पाठिंबा आहे.
याउलट माझींकडे स्वपक्षाच्या आठ आणि भाजपाच्या ८७ आमदारांचा पाठिंबा होता. पण या पाठिंब्यावर बहुमत सिध्द करता येणार नाही हे लक्षात येताच, मांझींनी बहुमताच्या लढाईत पराभव पत्करण्यापेक्षा राजीनामा देण्याचा पर्याय स्वीकारला.
मला पाठिंबा देणा-या आमदारांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या म्हणून मी राजीनामा दिला अशी सारवासारव मांझींनी केली आहे. गुप्त मतदान घेतले असते तर, मला १४० आमदारांनी पाठिंबा दिला असता असाही मांझी यांचा दावा आहे.
एकूणच भाजपाने मांझींच्या खांद्यावर बंदूक ठेवून नितीश यांच्यावर नेम साधण्याची चाल रचली होती. पण ऐनवेळी मांझींनी माघार घेतल्याने भाजपाचा डाव फसला. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये झालेल्या जनता दल युनायटडेच्या दारुण पराभवानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन, त्या ठिकाणी दलित कार्ड खेळत जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाच्या गादीवर बसवले होते. नंतर पक्षाने पायउतार होण्यास सांगितले. तेव्हा मांझींनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार देत नितीश कुमार यांना आव्हान दिले.