बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरली आहे.
पाटणा – बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यासाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरली आहे. लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेला नरेंद्र मोदी यांचा झंझावत रोखण्यासाठी नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांची एकत्र येण्याची रणनिती बिहारमध्ये यशस्वी ठरली आहे.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बिहार विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या धर्मनिरपेक्ष महाआघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. तर, भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिल्ली पाठोपाठ बिहारमध्येही जोरदार झटका बसला आहे. यात धर्मनिरपेक्ष महाआघाडीला १७८ जागा मिळाल्या असून भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अवघ्या ५८ जागा जिंकता आल्या.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर बिहारसाठी विकास पॅकेज जाहीर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमिषाला न भुलता मतदारांनी विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
नितीश कुमार यांनी बिहारच्या विकासासाठी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्याला मतदारांनी मतपेटीतून दाद दिली आहे. दुस-या बाजूला भाजपाला जातीयवादाला खतपाणी घालण्याचा फटका बसला आहे.
सरसंघचालकांचे आरक्षणाचा फेरविचार करावा हे वक्तव्य, दादरी हत्याकांड, गोमांस बंदी आणि भाजपाच्या वाचाळवीर नेत्यांची वक्तव्ये भाजपाला भोवल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. बिहार जिंकण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती.
बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या जवळपास २६ सभा झाल्या होत्या. केंद्रीय मंत्र्यांचा ताफा निवडणूक प्रचारात उतरवला होता तरीही भाजपाला पराभव स्वीकारावा लागला.
लोकसभा निवडणुकीपासून भाजपाचे अच्छे दिन सुरु होते. बिहारसारख्या मोठया राज्यामध्ये पराभव मोदी-शहा यांच्या विरोधकांना बळ देणारा आहे. बिहारमधील नितीश, लालू, काँग्रेसच्या विजयाचे राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. केंद्रीय स्तरावर नवीन राजकीय समीकरणे आकाराला येऊ शकतात. या निकालामुळे मोदी लाटेमध्ये वाहून गेलेले राजकीय पक्ष सावरले असून, मोदी लाट संपल्याचे स्पष्ट झाले आहे.
लालू यादवांचे जोरदार पुनरागमन
या निवडणुकीत राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांचे जोरदार पुनरागमन झाले आहे. अनेक गैरव्यवहारांचा आरोप असलेले यादव हे काही वर्षे राजकारणाबाहेरच होते. मात्र, राजदने या निवडणुकीत ८० जागा जिंकल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून आम्ही कठोर परिश्रम घेतले. या निवडणुकीने पुन्हा यादव यांचे राज्य बिहारमध्ये सुरू झाले, अशी प्रतिक्रिया राजदने दिली.
देशाला भक्कम विरोधकाची गरज : नितीश कुमार
देशाला भक्कम व एकजुटीने काम करणा-या विरोधकांची गरज असल्याचा कौल बिहारने दिला आहे. बिहारने आपली जबाबदारी ओळखून हे दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिली. मी व आमचे आघाडीतील पक्ष विरोधकांचाही योग्य सन्मान करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कॉँग्रेसने जिंकल्या २७ जागा
या निवडणुकीत महाआघाडीचा भाग असलेल्या कॉँग्रेसने कमाल केली. ४१ जागा लढवून तब्बल २७ जागा जिंकल्या. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचे केवळ चार आमदार होते. केंद्रातील मोदी सरकारवर जनता नाराज आहे. तो राग बिहारच्या जनतेने मतपेटीतून काढला आहे, अशी प्रतिक्रिया कॉँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी दिली. भाजपा प्रत्येक निवडणुकीत मोदींना पुढे करत आहे. आता त्यांना जनता नाकारत असल्याचे दिसून येत आहे.