बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात शुक्रवारी ५५ टक्के मतदान झाले.
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात शुक्रवारी ५५ टक्के मतदान झाले. सहा नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील ३२ विधानसभा मतदारसंघात मतदान होत असून, पाच टप्प्यांपैकी हा सर्वात लहान टप्पा आहे.
घातपाती कारवायांच्या शक्यतेमुळे २३ मतदारसंघात मतदानाचा कालावधी एक ते दोन तासाने कमी करण्यात आला होता. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. कैमूर, रोहतास, अरवाल, जेहानाबाद, औरंगाबाद आणि गया या जिल्ह्यांमध्ये दुस-या टप्प्यामध्ये मतदान झाले.
३२ पैकी ११ मतदारसंघात दुपारी तीन वाजता तर १२ मतदारसंघात दुपारी चार वाजण्यापर्यंतची मतदानाची वेळ होती. केवळ नऊ मतदारसंघात सकाळी सात ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत पूर्णवेळ मतदान झाले. एकूण ८६ लाख १३ हजार ८७० नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. ३२ जागांसाठी ४५६ उमेदवार रिंगणात असून, त्यात ३२ महिला उमेदवार आहेत. एकूण ९ हजार ११९ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
दुस-या टप्प्यात उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपी आणि जिंतन राम मांझी यांच्या एचएएम (एस) या भाजपाच्या सहकारी पक्षांना आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. भाजपा ३२ पैकी १६ जागा लढवत असून, निम्म्या जागा सहकारी पक्षांसाठी आहेत.
उरलेल्या तीन टप्प्यांचे मतदान २८ ऑक्टोबर, १ व ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.