नेरळ पूर्व भागातील रेल्वे लाईनच्या बाजूने येणारी जलवाहिनी इमारत बांधण्यासाठी खड्डा खोदताना तोडल्याने या भागातील नागरिकांना मागील ८ दिवसांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
नेरळ- नेरळ पूर्व भागातील रेल्वे लाईनच्या बाजूने येणारी जलवाहिनी इमारत बांधण्यासाठी खड्डा खोदताना तोडल्याने या भागातील नागरिकांना मागील ८ दिवसांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकत्रे गजू वाघेश्वर यांनी टँकर मागवून नागरिकांची तहान भागवली.
गंगानगर भागात एका बिल्डरने इमारत बांधण्यासाठी जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठे खड्डे खोदले. त्यावेळी तेथून जाणारी पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटली. मात्र ती दुरुस्त न करता त्यावर मातीचा ढिगारा टाकण्यात आल्याने राठोड आळी, झोपडपट्टी, साईकृपा सोसायटी आणि निर्माणनगरीच्या काही भागात मागील ८ दिवसांपासून पाणी आलेले नाही.
यानंतर नागरिक संतप्त झाल्याने नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाने २ दिवसांपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र तरीही अजून काही भागांत पाणी आलेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडली आहे.