शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी, लाडक्या साहेबांना डोळे भरून अखेरचे पाहण्यासाठी अलोट जनसागर रविवारी दादर परिसरात लोटला होता.
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी, लाडक्या साहेबांना डोळे भरून अखेरचे पाहण्यासाठी अलोट जनसागर रविवारी दादर परिसरात लोटला होता. ‘न भूतो न भविष्यति’ अशी गर्दी दादरच्या रस्त्या-रस्त्यांवर पाहायला मिळाली. काहींनी तर शनिवारी रात्रीपासूनच शिवाजी पार्क परिसरात मुक्काम ठोकला होता. येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू तराळले होते, तर ओठात ‘बाळासाहेब अमर रहे’ चा घोषा होता. प्रत्येकालाच आस बाळासाहेबांच्या दर्शनाची होती.
‘श्वासांची माळ तुटली, ध्यासाची कधीच नाही’ अशा घोषणा अधूनमधून परिसरात दिल्या जात होत्या. ‘बाळासाहेब परत या’ अशी इच्छा व्यक्त केली जात होती. दादर परिसरात सर्व जण त्यांच्या दर्शनासाठी आस लावून रस्त्यावरच बसले होते. अनेक जण धाय मोकलून रडत होते, तर बाळासाहेबांच्या नावाचा जयजयकार आणि भजने म्हटली जात होती. अंत्ययात्रेच्या मार्गावरील प्रत्येक इमारतीची खिडकी, गॅलरी, गच्ची माणसांची फुल्ल झाली होती. दुकानांच्या शेडवर व पत्र्यांवर तरुण उभे राहून बाळासाहेबांचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होते. बाळासाहेबांचा चेहरा दिसावा, त्यांना हात जोडून वंदन करता यावे, आपल्या दैवताचे रूप मनात साठवून ठेवता यावे, यासाठी सा-यांचेच डोळे आसुसलेले होते. शिवसेना भवनात लावलेल्या टीव्हीवरून महायात्रेच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यात येत होते.
बाळासाहेबांची अंत्ययात्रा सेना भवन परिसरात येताच अनेकांनी रस्त्यावरच लोटांगण घातले. शिवाजी पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी तब्बल अडीच किलोमीटपर्यंत रांगा लागल्या होत्या. गेली ४५ वर्षे शिवसेनाप्रमुख शिवतीर्थावर येताच ‘आवाज कुणाचा..शिवसेनेचा,’ अशा जोरदार घोषणा दिल्या जायच्या. मात्र अंत्ययात्रेवेळी घोषणा देतानाच शिवसैनिकांचा आवाज क्षीण झाला होता. शिवसेनाप्रमुख आपल्यात नाहीत हेच त्यांना सहन होत नव्हते. शिवतीर्थावर आजपर्यंतच्या प्रत्येक सभा शिवसेनाप्रमुखांनी गाजवल्या होत्या. मात्र, यापुढे त्यांचा आवाज येथे परत ऐकू येणार नसल्याची खंत प्रत्येकालाच जाणवत होती.
‘कदम मॅन्शन’मध्ये सन्नाटा
शिवाजी पार्कच्या रानडे रोडवरील ‘७७-ए कदम मॅन्शन’ या इमारतीच्या परिसरात सन्नाटा पसरला होता. शिवसेनेची जडणघडण या इमारतीने पाहिली असल्याने आणि याच इमारतीच्या तळमजल्यावर पूर्वी ठाकरे कुटुंबीय राहत असल्याने इथल्या प्रत्येक घरात कर्ता पुरुष गमावल्याचे चित्र दिसत होते. शनिवारी बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त या ठिकाणी पोहोचल्यानंतर एकच शांतता परिसरात पसरली, तर अनेकांच्या घरातली चूलही पेटली नाही.
चाहत्यांच्या आक्रोशाने शिवतीर्थ हेलावले
कंठात दाटलेले हुंदके, डोळय़ांतून ओघळणारे अश्रू आणि भावनावेगाने फोडलेला हंबरडा यांनी शिवतीर्थावरील वातावरण रविवारी कमालीचे भावूक झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अंतिम प्रवास पाहताना लाखो चाहत्यांनी केलेल्या आक्रोशाने शिवतीर्थ अक्षरश: हेलावले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पार्थिव रविवारी सकाळी १० वाजल्यापासून शिवतीर्थावर ठेवण्यात येणार असल्याचे शनिवारी जाहीर केल्याने महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील लाखो शिवसैनिक आणि चाहत्यांची रीघ सकाळी नऊ वाजल्यापासूनच शिवतीर्थाच्या दिशेने लागली. पोलिसांनी सकाळपासूनच शिवतीर्थावर कडक बंदोबस्त ठेवला होता. सकाळी अकरा वाजताच मोठा जनसमुदाय शिवतीर्थावर पोहोचला. सूर्य वर चढत होता, उन्हाच्या झळा वाढत होत्या, तशी लोकांची गर्दीही वाढत होती. अंत्ययात्रा यायला उशीर होत आहे, असे कळल्यानंतर मात्र लोक आजूबाजूच्या झाडांच्या सावलीला विसावले. सकाळपासूनच येथे ‘हरे रामा हरे कृष्णा’ पंथाचे भजन सुरू होते. त्यांना सिद्धिविनायक मंदिर भजनी मंडळाची साथ मिळाली.
चार वाजता अंत्ययात्रा शिवसेना भवनासमोर पोहोचल्याची बातमी येऊन धडकली, तसे आजूबाजूला पांगलेले लोक मैदानात जमा होऊ लागले. अंत्यसंस्कारासाठी तयार केलेल्या चबुतऱ्याजवळ जाण्याची प्रत्येकाची धडपड होती. संपूर्ण मैदानात जनसमुदाय लोटला. ठिकठिकाणी बॅरिकेड्स टाकून रांग विस्कळीत होणार नाही, याची पोलिसांनी काळजी घेतली होती. प्रसारमाध्यमांनाही वेगळी जागा राखून ठेवण्यात आली होती. लहान मुलांपासून ते ८० वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील लोक येथे उपस्थित होते. दिवसभर उन्हात चटके बसत असतानाही घोषणा मात्र बंद होत नव्हत्या. शिवाजी पार्कमध्ये अंत्ययात्रा पोहोचल्यावर ‘कोण आला, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशी आरोळी घुमली. बाळासाहेबांचे शेवटचे दर्शन घेता यावे, यासाठी सकाळी सात वाजल्यापासून शिवाजी पार्क मैदानात बसलेले लोक भावनाविवश झाले. अंत्यसंस्कारांचा विधी सुरू झाला, तसा बाळासाहेबांच्या जयजयकारांनी शिवतीर्थ दुमदुमून गेले. प्रत्यक्ष अग्नी दिला, तेव्हा अनेकांना भावनावेग अनावर झाला. अनेक कंठातून हुंदके दाटून आले, डोळय़ांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. एका महान नेत्यांना अखेर निरोप देताना चाहत्यांतून उमटलेल्या आक्रोशाने शिवतीर्थही शहारले.
दर्शनासाठी साडेसहा तासांची प्रतीक्षा
आपल्या लाडक्या साहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी शिवसैनिकांनी रविवारी शिवसेना भवन आणि परिसरात अगदी सकाळपासूनच ठाण मांडले होते. मात्र, साहेबांचे प्रत्यक्ष अंतिम दर्शन घडले ते दुपारी साडेतीन वाजताच. त्यासाठी शिवसैनिकांना तब्बल साडेसहा ते सात तास प्रतीक्षा करावी लागली. मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी आपल्या सरसेनापतीला शेवटचा सलाम देण्यासाठी अगदी जीवाचीही पर्वा न करता बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवरही गर्दी केली होती. शिवसेना भवन परिसरातील इमारती सकाळपासूनच फुल्ल झाल्या होत्या. सकाळी दहानंतर तर शिवसैनिक जमा होऊ लागल्याने येथील जागा अपुरीच पडू लागली. त्यामुळे शिवसैनिकांनी आसपासची झाडे, बस स्टॉप, संरक्षक भिंत, विजेचे खांब यांचा आधार घेतला. तब्बल साडेसहा तासांच्या प्रतीक्षेनंतर फुलांनी सजलेल्या ट्रकवरून आणलेले बाळासाहेबांचे पार्थिव दृष्टीस पडताच शिवसैनिकांना भावना अनावर झाल्या आणि त्यांनी आपल्या दैवताला सलाम ठोकला. शिवसेनाप्रमुखांची महायात्रा ‘मातोश्री’हून सकाळी निघाल्यानंतर शिवसेना भवनापाशी पोहोचली. मात्र, साहेबांचे जवळून अंत्यदर्शन होईल, या विचाराने असंख्य शिवसैनिकांनी शिवतीर्थावर न जाता शिवसेना भवन परिसरातच राहणे पसंत केले. सकाळपासूनच साहेबांचे अंत्यदर्शन होईपर्यंत शिवसैनिक तहानभूक विसरून बसले होते.
कोहिनूरने घडवले बाळासाहेबांचे अंत्यदर्शन
शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिलच्या जागेत बांधकाम सुरू असलेली इमारत शिवसैनिकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी खुली करण्यात आली होती. त्यामुळे कार पार्किंगच्या पाचमजली अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीतून असंख्य शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले.
भगवी लाट
महायात्रा शिवसेना भवनाकडे सरकत असताना एका शिवसैनिकांच्या गटाने मोठय़ा लांबीचा भगवा कपडा डोक्यावर घेत भगव्या लाटेचे दर्शन घडवले.
शिवसेनाप्रमुखांची सावली झाली पोरकी!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आल्यानंतर त्यांना २४ तास खासगी आणि पोलिस अंगरक्षकांचे संरक्षण कवच पुरवण्यात आले. ‘झेड’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था असतानाही त्यांची सर्वाधिक मर्जी चंपासिंग थापा यांच्यावर होती. थापा जणू त्यांची सावलीच झाले होते.. ‘साहेब’ ‘मातोश्री’वर असोत किंवा दौ-यावर त्यांच्यासोबत थापा असणार हे समीकरणच होते. बाळासाहेब आजारी पडल्यानंतर कुटुंबीयांइतकेच थापाही सतत त्यांच्याजवळ होते. शिवसेनाप्रमुखांची प्राणज्योत मालवल्याचा धक्का थापांनाही तितकाच बसला. ‘साहेब’ आता पंचत्वात विलीन झाल्यामुळे त्यांची ही ‘सावली’ आता कायमची पोरकी झाली आहे. शिवसेनाप्रमुखांवर अंत्यसंस्कार होताना ही पोरकेपणाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
शिवसेनाप्रमुखांची अंत्ययात्रा सकाळी ‘मातोश्री’वरून निघाली, तेव्हा साहेबांची शेवटची सेवा करण्यासाठी थापांची लगबग चालली होती. वारंवार साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना भावनावेग दाटून येत होता. साहेब कायमचे अंतरणार या कल्पनेने ते व्याकूळ झालेले दिसत होते. त्यांच्या सेवेची पोचपावती अंत्यसंस्काराच्या वेळी मिळाली. घरच्या लोकांनी जे धार्मिक संस्कार केले, त्यात चंपासिंह थापा या सेवकालाही मान मिळाला.
मूळ नेपाळचे असलेले थापा २७ वर्षापूर्वी मुंबईत आले. शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक खिमबहाद्दूर थापा यांच्यामुळे त्यांचा शिवसेनाप्रमुखांशी संपर्क झाल्यानंतर ते ‘मातोश्री’त सेवक म्हणून रुजू झाले. शिवसेनाप्रमुखांचे सर्व दैनंदिन व्यवहार, जेवण, औषधे देणे आदी छोटय़ा-मोठय़ा बाबींची माहिती थापा यांनी जाणून घेतली होती. मिठ्ठास वाणी, कामाची धडाडी यामुळे थापांचे शिवसेनाप्रमुखांशी जे ऋणानुबंध जुळले ते कायमचेच!
शिवसेनाप्रमुखांची सतत काळजी असे मीनाताई ठाकरे यांना.. त्यांच्या पश्चात थापा यांनी ही धुरा बाळासाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळली. ‘मातोश्री’च्या तिस-या मजल्यावर शिवसेनाप्रमुखांची खोली आहे. त्यांच्या शेजारीच थापांची खोली आहे. शिवसेनाप्रमुख झोपेतून उठायच्या आत थापा तयार होऊन त्यांच्याजवळ हजर असायचे. दिवसभर त्यांच्या सावलीसारखे त्यांच्यासोबत राहायचे. पण आता साहेबच कायमचे निघून गेल्याने त्यांची ही सावलीही आता कायमची पोरकी झाली आहे..!