ठाणे जिल्ह्यातील कुपोषणावर उपाय म्हणून ठाणे जिल्हा परिषदेने बाळंतीणीला सकस आहार व आरामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपहारगृह बांधण्याचे ठरवले आहे.
ठाणे- ठाणे जिल्ह्यातील कुपोषणावर उपाय म्हणून ठाणे जिल्हा परिषदेने बाळंतीणीला सकस आहार व आरामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपहारगृह बांधण्याचे ठरवले आहे. गरोदर काळात महिलांसाठी आवश्यक ती काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार असून, हे आरोग्य केंद्रात बाळंतीणीसाठी जणू माहेरघरच ठरणार आहे.
आजघडीला जिल्ह्यात १२ हजार ३६३ कुपोषित बालके असून गतवर्षी राज्यपाल शंकरनारायणन् यांनी जिल्ह्यातील कुपोषित भागांचा दौरा केला होता. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना राबवणे गरजे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेतर्फे कुपोषणावर मात करण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार त्यांनी युनोच्या इनफॅक्ट फाउंडेशनच्या सहकार्याने एक टास्क फोर्स तयार केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. यामध्ये फाउंडेशनने केलेले डॉक्टर, संशोधनाचा फायदा घेण्याचे ठरवले आहे. या टास्क फोर्समध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याणचे अधिकारी, डॉक्टर, शिक्षकांसोबत फाउंडेशनचे डॉक्टर असतील.
जिल्ह्यात ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यातील ४५ केंद्रे ही केवळ आदिवासी तालुक्यात आहेत. या केंद्रात वर्षातून तीन ते चार शिबिरे घेण्यात येणार आहेत. यामध्ये दोन बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञांच्या माध्यमातून गरोदरमातांची तपासणी करण्यात येणार आहे. मानव विकास प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करून घेण्यासंबंधी जिल्हा परिषद विचाराधीन आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपहारगृह नसल्याने तपासणीसाठी येणा-या गरोदर महिलांची मोठी परवड होते. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ‘माहेरघर’ ही इमारत बांधण्यात येणार आहे. गरोदर मातेला तपासणी व बाळंतपणानंतर याच माहेरघरात आराम करण्यासाठी ठेवण्यात येईल. तेथेच त्यांना लोहाच्या गोळय़ा, सकस आहार पुरवण्यासाठी काही कंपन्यांबरोबर जिल्हा परिषदेने संपर्क साधला आहे. त्यासाठी जिंदालसारख्या बडय़ा कंपन्यांनी मदत करण्याची तयारी दाखवली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातच ५० सीटस्चे ऑडिओ थिएटर उभारण्यात येणार आहे. टाटा कंपनीने ते बांधून देण्याची तयारी केली आहे. या सिनेमागृहात गरोदर महिलांना आरोग्यविषयक चित्रपट दाखवण्यात येतील.
जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञ नसल्याने यंदा प्रथमच दोन बालरोगतज्ज्ञांच्या माध्यमातून गरोदर मातांची तपासणी करण्यात येईल. बरेचदा आदिवासी भागातील महिला बाळंत झाल्यावर त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातच ‘माहेरघर’ उभारून या मातांना सकस आहार, आराम मिळण्याठी प्रयत्न सुरू आहेत. – शेखर गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.