अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या वतीने पहिले बालनाटय संमेलन सोलापुरात २७, २८ आणि २९ नोव्हेंबरला होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्यांनी नृत्य-नाटयकलेद्वारे अपंग मुलांच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणले त्या कांचन सोनटक्के यांची निवड झाली आहे. हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. हा सन्मान सार्थ ठरवण्यासाठी आता शालेय अभ्यासक्रमात नाटयशिक्षणाचा समावेश व्हावा. तसे झाले तर पहिले बालनाटय संमेलन खऱ्या अर्थाने सार्थकी ठरेल.
अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेने वेगवेगळे उपक्रम राबवून राज्यभरात मराठी रंगकर्म्ीची घट्ट मैत्री विणली आहे. वेगवेगळ्या शाखांद्वारे नाटयप्रशिक्षण शिबिर, एकांकिका स्पर्धा, कलावंतांचे मेळावे, गौरव सोहळे आयोजित करीत आली आहे. या साऱ्या शाखांना जोडणाऱ्या मुंबईतील मध्यवर्ती शाखेने अ. भा. मराठी नाटय संमेलन, रंगकर्मींचा सन्मान सोहळा, नाटयलेखन पुरस्कार अशा एक दोन नव्हे असंख्य उपक्रमांनी रंगकर्म्ीच्या मनात आपले हक्काचे घर बांधले आहे. आजवर वेगवेगळ्या नाटय संमेलनांमधून बालनाटय़ावर एखाद् दुसरा परिसंवाद, पुरस्कारप्राप्त बालनाटय़ांचे प्रयोग एवढीच स्पेस बालनाटय़ाला दिली जात होती. त्यामुळे बालनाटय हा विषय संमेलनाच्या एका कोपऱ्यातला विषय झाला होता. बालनाटय हा स्वतंत्र संमेलनाचा विषय आहे, हे नाटय परिषदेच्या ध्यानात आले असावे आणि येत्या २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान हे पहिले बालनाटय होत असावे. बालनाटय़ाची गरज ओळखून टाकलेले हे पाऊल महत्त्वाचे आहे आणि बालनाटय चळवळ पुढे नेण्यासाठी ते महत्त्वाचे ठरेल, यात कुणाचे दुमत असण्याचे कारण नसावे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गेल्या पाच वर्षापासून राज्यस्तरीय बालनाटय स्पर्धा घेण्यास सुरुवात केली. त्यातून बालकलावंतांना एक हक्काचा रंगमंच मिळाला आहे. या स्पर्धेत शालेय संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे प्रमाण मात्र निराशाजनक आहे. ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी महत्त्वाचा उपक्रम ठरला पाहिजे. त्यासाठी नाटकातून विद्यार्थ्यांच्या जाणिवा समृद्ध होतात, हे आधी शिक्षणसंस्था, शिक्षण खाते, शिक्षकांनी मान्य करण्याची गरज आहे. फक्त रंगकर्मींना याची जाणीव असून चालणार नाही. ते सर्वाना उमगले तर शालेय अभ्यासक्रमात नाटयशिक्षण असलेच पाहिजे या आग्रहाला बळ मिळू शकेल. त्या दृष्टीने सोलापूर येथे होणारे पहिले बालनाटय संमेलन महत्त्वाचे आहे. त्यातही कांचन सोनटक्के यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने अभ्यासक्रमातील नाटयशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.
नाटकातून फक्त कलावंत घडत नसतो तर व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो, हे कांचन सोनटक्के यांनी सिद्ध करून दाखवले आहे. वेगवेगळ्या शाळांमध्ये कांचनताईंनी सृजनशील नाटय़ातून अपंग मुलांच्या कल्पना, क्षमता वाढवल्या आणि त्यांच्यातील उत्साह व उत्स्फूर्ततेतून एकापेक्षा एक सरस कलाकृतींना जन्म दिला. मुलांच्या क्षमता वाढवण्यासाठी नाटयकला ही एक उपचार पद्धत आहे, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मनोरंजनातून हसत-खेळत शिक्षण देत अपंग मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले आहे. त्यासाठी त्यांनी कार्यशाळा घेतल्या. शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे कामही केले आहे. अपंग मुलांना त्यांनी या चळवळीद्वारे मोठी ताकद दिली आहे.
नाटक सादर करताना मुलांमध्ये आत्मविश्वास येतो. त्यांचे संवादकौशल्य वाढते. नाटक ही समूहकला असल्याने रंगमंचावर सहकलावंतांशी नाटयव्यवहार करतानाच संघभावना वाढते. प्रेक्षकांकडून मिळणारे कौतुक त्यांना प्रोत्साहन देणारे ठरते. कांचनताईंनी अपंग मुलांमध्ये जागृत केलेला आत्मविश्वास प्रत्येकच मुलासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात नाटयशिक्षणाचा समावेश केला तर मुलांचे व्यक्तिमत्त्व उजळण्यास ते सहाय्यभूतच ठरेल. अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेने हे बालनाटय संमेलन आयोजित करून नाटय चळवळीचा पाया रचण्यास सुरुवात केली आहे. शालेय अभ्यासक्रमात ‘नाटयशिक्षण’ आले तर हा पाया आणखी भक्कम होईल.