बाबी नारकराचा मुंबईत रहात असलेला पोरगा विश्वास उर्फ इश्वास गावी आल्याचं कळल्यावर शित्या चौकेकर, दत्त्या मालपेकर जाम खूष झाले. ही बातमी कळल्यावर ते दोघेही लगेचच नारकराच्या घराकडे गेले. इश्वास आल्याची खबर जणू काही आपल्याला माहितच नाही अशा प्रकारचं त्यांचं एकंदर वागणं होतं. नारकराच्या घराजवळून काहीतरी कामासाठी चाललो आहोत या अविर्भावात त्यांनी बाहेरूनच बाबी नारकराला हाक मारली. बाबी तेव्हा खळयात बसून बोलत होता.
‘काय रे बाबी, बसान काय करतंस?’
‘काय नाय रे! झील काय सांगता ता आय्कतय. इश्वास इलो हा मुंबय्तसून.’
‘काय सांगतंस काय? कदी इलो इश्वास?’ दत्त्या मालपेकराने उगाचच आश्चर्यचकीत झाल्यासारखा चेहरा केला. शित्याने इश्वासाला हाक मारल्यावर तो बाहेर आला. मग दोघांनीही त्याच्या तब्येतीची आणि कामधंद्याची चौकशी केली. इश्वासाने चहा प्यायला बोलावल्यावर त्याच इराद्याने आलेल्या शित्या आणि दत्त्या मालपेकराने बेडयाच्या आत प्रवेश केला. दोघांची पहिली पायरी तरी यशस्वी झाली. चहापाणी झाल्यावर इश्वास घरातून त्यांच्या बरोबरच निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्यांना म्हणाला,
‘काय रे, आता तुमचं कुठे काम वगैरे आहे का?’
‘अरे आमचा कितीव मोटा काम आसला तरी तुज्यासाटी ता बाजूक ठेव. काय दत्त्या?’ शित्याने दत्त्याला विश्वासात घेतलं. यावर दत्त्याने आपली प्रतिक्रिया देताना इश्वासालाच उलट प्रश्न केला,
‘अरे तू हाक मारलंस आनी आमी कदी तुज्या हाकेक इलंव नाय असा आजपावत कदी झाला हा काय?’
‘होय ना! मग चला कणकवलीला जावून येवू. माझं थोडं काम आहे. ते झालं की मग बारमध्ये बसू.’
‘अरे, पन आता बार बंद झाले ना?’ शित्याने मुद्दयाचा प्रश्न केला. यावर विश्वास म्हणाला,
‘अरे, रस्त्याच्या बाजूचे बार बंद झाले. पण पाचशे मीटरच्या बाहेर काही बार असतील ना? तिथे बसू. जेवण वगैरे घेवूनच मग निघू. पण तुमच्या घरी मात्र सांगून ठेवा.’
‘आवशीक रे खाव! आमच्या घराकडे वाट बगणारो आसा कोन?’ स्वत:वरून शित्याने दत्त्याचीही गणती केली. इश्वासाबरोबर बाहेर जाणे म्हणजे चंगळ असल्याने दोघांनीही ठरवून आल्याप्रमाणे दुसरी आणि फायनल फेरीही यशस्वी केली.
कणकवलीला प्रांताधिका-यांच्या कार्यालयात इश्वासाचं काम अगदी पंधरा ते वीस मिनिटातच आटोपलं. पण त्यानंतर बारमध्ये मात्र त्यांचे जवळ-जवळ दोन तास गेले. नेहमी गूळाची पिणाऱ्या शित्या आणि दत्त्या मालपेकराने इश्वासाबरोबर बॅगपायपरची कंपनी दिली. इश्वासाची एक क्वाटर खाली होण्याच्या अगोदर या दोघांचा एक खंबा आडवा झाला. तरीही दोघांची जीभ अजिबात अडखळत नव्हती. उलट पाऊन क्वाटर पोटात गेलेल्या इश्वासाचे शब्द सुस्तावल्यासारखे झाले होते. अजून हाफ बॅगपायपर शित्याने स्वत:हूनच मागवली. बोलता-बोलता इश्वासाने त्या दोघांजवळ आंब्याच्या पेटीचा विषय काढला. यावर जणू स्वत:च्या दररोज चार-पाच हजार पेटया वाशी मार्केटमध्ये जात असल्यासारख्या अविर्भावात शित्याने इश्वासाला विचारलं,
‘तुका किती पेटये व्हये आसत?’
‘काय हाय शित्या, मला खायला एखाद-दुसरी पेटीही चालेल. पण मी ज्या कंपनीत काम करतो त्या माझ्या ऑफिसर लोकांना मला एक-एक पेटी द्यायची आहे. आपल्याला साय्ब लोक भरपूर मानतात. सगळे साय्ब तिकडचे पूणा नागपूरचे आहेत. पण आपल्यावर लय जीव! कुठल्या कामगाराला सुट्टी देत नाहीत. पण मी सांगितलं की, आपल्याला हवी तेव्हा सुट्टी मिळते.
अर्ज करण्याची पण गरज नाही. मी कोकणात जातो म्हटल्यावर सगळय़ांनी आंब्याच्या पेटीची आठवण केली. तयार झाले की, महिनाभरात घेवून ये बोलले. आपण काय त्यांच्याकडून पैसे घेणार नाही….’
‘ता अळान-मीट बाजूक ठेव. तुका पेटये किती व्हयेत तेवढा सांग.’ शित्याने पाचवा पेग उचलत प्रश्न केला.
‘तरी बारा-एक पेटया लागतील.’
‘मग असा कर. माजा खुळयाचा आय्क. पेटये अजिबात घेव नूको. ते तुका म्हागाय्त पडतले. त्येच्यापेक्षा माज्या घरामागचा धरलेला कलाम तू आठ हजारात कर. ता तुका बरा पडतला.’ शित्याने स्वत:च्या कलमाचा व्यवहार असा सहजगत्या करायला घेतल्यावर दत्त्या त्याला म्हणाला,
‘अरे पन तुज्या घरामागचा कलाम तू पाच वर्शाच्या मुदतीर कादीरमामूक दिलंस ना?’
‘कलाम कोनाचा?’
‘तुजा.’
‘मग यव्हार कोन करतलो?’
‘तू.’
‘बरोबर ना? मग तू निवात -हव. सोताचा खावचा नी लपून ..चा हया माका पटना नाय. आनी करार झालेलो आसलो तरी हय़ां इश्वासाफूडे माका करार महत्वाचो नाया. यंदा कलाम इश्वास करीत. मामूक काय फुडचा याक वरीस वाढव्न दिला. काय इश्वासा?’
‘पण आठ हजार म्हणजे….’
‘साडेसात दी. तुका म्हणान पाचशे कमी केलंय. पन इश्वासा, हिशेब केलंस तर तू माज्या कलमात फायद्यात आसस. कलाम कसला धरला हा ता हय़ां दत्त्याक इचार. पंचवीस पेटी माल खंय गेलो नाया. बारा पेटये सायबांका देव्न उरलेले पेटये इकलंस तरी तुजे पैशे वसूल होतले. काय दत्त्या?’ दत्त्याने आता फक्त मानच हलवायची एवढंच ठरवलं होतं. त्याच्या मानेचा होकार समजून शित्या पूढे म्हणाला,
‘संध्याकाळी ये नी सोता कलाम बगून जा.’
‘अरे बाबा, तेवढा माझा तुझ्यावर विश्वास आहे.’
‘आय्कलंस दत्त्या. हय़ेका इश्वास म्हंतत.’
‘आता इश्वास नायतर कोन हा तो?’ दत्त्याने थोडंसं मौनव्रत सोडलं.
‘तसा न्हय रे! तो इश्वास हा हय़ां माका म्हयती हा. पन त्या इश्वासाचो माज्यार इश्वास हा हया महत्वाचा. काय?’ दत्त्याने पुन्हा मान डोलावली. बारमधल्या शेवटच्या पेगमध्ये शित्या चौकेकराच्या कलमाचा व्यवहार करण्यात आला. आंब्याच्या पेटय़ांसाठी आणलेल्या पाच हजारात विश्वासाने संडासाची टाकी काढण्यासाठी आणलेल्या पैशातील अडीज हजार रूपये घातले आणि शेवटचा पेग खाली करण्यापुर्वी साडेसात हजार रूपये दत्त्यासमक्ष त्याने शित्या चौकेकराला दिले.
दत्त्याने आणि शित्याने आंब्याच्या पेटया भरून एस्. टी. किंवा खाजगी ट्रॅव्हर्ल्सने मुंबईला पाठवायच्या. त्याचा येणारा खर्चही नंतर विश्वास देणार होता. दारूनंतर चिकन जेवण झालं. दरम्यान हा व्यवहार आपल्या घरी कुणालाच कळता नये अशी अटही त्याने त्या दोघांना घातली आणि लोड झालेल्या या तीन गाडया बांबरवाडीच्या दिशेने रवाना झाल्या.
दुस-या दिवशी सकाळी विश्वास कणकवलीमार्गे ट्रेनने मुंबईला गेला. इकडे शित्याची भेट झाल्यावर दत्त्या मालपेकराने त्याला विचारलं,
‘शित्या, तुजा डोक्या तर फिरला नाया ना? अरे, पाच वर्शाच्या करारार तू कादीर मामूक कलाम दिलंस ना? यंदाचा तिसरा वरीस. अवशेद फवारनी सगळा मामून केल्यान आनी तू असा कसा दुस-याक देव शकतंस?’
‘दत्त्या, मी इश्वासाक माजा कलाम दिलंय हय़ां तुका खंयच्या मायझयान सांगितल्यान?’ शित्याने दत्त्यालाच उलट विचारलं.
‘अरे कल फेंदरीत तुमच्ये यव्हार झाले हय़ां तू इसारलंस की काय? माज्या फुडयात इश्वासाकडसून तू साडेसात हजार रूपये घेतलंस.’
‘शित्या, तू म्हंतस ता खरा हा. पन ते पैशे माज्या कलमाचे नाय. माजा कलाम करार पूरो होयपर्यंत कादीर मामूच करतलो. पन मी इश्वासाक दिलंय ता बाबा साटमाचा कलाम. ता आजच सकाळी यव्हार करून मी पाच हजाराक ठरवलंय.’
‘म्हंजे?’ शित्याचं बोलणं ऐकून दत्त्या अक्षरश: भिरभिरून गेला.
‘म्हंजे काय नाय. थोडा डोक्या वापराक व्हया. मगे कायच कठीन नाया. मुंबयवाल्यांका वाटता आसतला की, गाववाले अलीबागेतना इले हत. पन मायझयांनू अलीबाग तुमका जवळ पडता.’
‘अरे पन शित्या, साटमाच्या घराजवळच्या कलमार मिळान मिळान आठ-धा पेटये मिळतले. पन इश्वासाक तू पंचवीस पेटये माल मिळतलो असा सांगितलंस. त्येचा काय करणार?’ यावर शित्या जोरजोरात हसायला लागला. हसता हसता त्याला खोकलाही लागला. थोडया वेळाने शांत झाल्यावर तो म्हणाला,
‘दत्त्या, हल्ली कलमार खंयचे-खंयचे रोग येतंत हय़ां म्हायती हा ना तुका? तुडतुडे आसत. थ्रीप्स हा. हय़ेच्यापैकी खंयचो तरी रोग इलो नी फळ गळान गेला. पंचवीस पेटयेचो माल आठ पेटये झालो. आनी मी म्हंतय, कलाम खंयच्या मायझयान बगीतल्यान हा? आंबे तू आनी मी काढून पाठवतलंव. ते खंयच्या कलमाचे आंबे आसत हय़ां त्या इश्वासाक कसा कळतला? तू निवात -हव. कलमाच्या यव्हारात मी बरोबर अडीच हजार कमवलंय.’
‘अरे पन माजा काय?’ शित्याचा फायद्याचा व्यवहार ऐकून दत्त्याचा जळफळाट झाला. यावर शित्या त्याला म्हणाला,
‘कलमाचो यव्हार माजो होतो. त्येच्यात कोनाची भागी नाया. हां, आता आंब्याचे पेटये भरना आनी ते पाठवना हय़ेतूर तुका शंभर-दोनशे रूपये सुटतले. मी चलतंय.’ असं म्हणून शित्याने दुस-या दिवशीही पुन्हा कणकवलीच्या त्याच बारची वाट धरली.