महाराष्ट्र सरकारने डान्सबारवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उठवली आहे. ही बंदी उठवल्याची बातमी जेव्हा महाराष्ट्रात झळकली तेव्हा प्रत्येकाच्या डोळय़ासमोर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा चेहरा आला असेल.
महाराष्ट्र सरकारने डान्सबारवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी उठवली आहे. ही बंदी उठवल्याची बातमी जेव्हा महाराष्ट्रात झळकली तेव्हा प्रत्येकाच्या डोळय़ासमोर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा चेहरा आला असेल. कारण महाराष्ट्रात डान्सबार बंदीचा निर्णय त्यांनी अत्यंत धाडसाने घेतला होता. अर्थात हा निर्णय घेणे, इतकी सोपी गोष्ट नव्हती. बारमालकांची लॉबी, त्यात गुंतलेला अंडरवर्ल्डचा पैसा, त्यांच्याशी अनेक राजकीय लोकांचे असलेले लागेबांधे या सर्वाच्या पार्श्वभूमीवर तो निर्णय घेणे सोपे नव्हते; परंतु त्यांनी ते धाडस दाखवले. डान्सबार बंदीमुळे बेरोजगार झालेल्या बारबालांच्या रोजगाराचे काय, असा प्रश्न उपस्थित करणा-यांनाही आबांनी दिलेले सडेतोड उत्तर आजही आठवते.
मुंबईत १९९०च्या दशकात अत्यंत तुरळक प्रमाणात सुरू झालेल्या डान्सबारचे जाळे हळूहळू १९९५ ते २००० या पाच वर्षात शहरभर पसरले आणि पुढील पाच वर्षात सामान्य बारपेक्षा डान्सबारचीच संख्या एखादी साथ पसरावी इतक्या वेगाने पसरली होती. कारण या डान्सबारमधून मिळणारी कमाई प्रचंड मोठय़ा प्रमाणात होती. मध्य मुंबईत सुरू झालेली ही डान्सबार संस्कृती मुख्यत: उपनगरात तेही झोपडपट्टय़ांमध्ये जास्त पसरली. पूर्व उपनगरातील चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, मुलुंड तर पश्चिम उपनगरातील अंधेरी, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागातील झोपडपट्टय़ांतून सुरू झाले. चार-दोन झोपडय़ा विकत घेऊन तेथे डान्सबार सुरू झालेले होते. त्यातही त्यांच्या ग्रेड ठरलेल्या होत्या. सामान्य बारमध्ये असलेल्या दारूच्या पेगची आणि बीअरच्या बाटल्यांची जी किंमत आहे त्याच्या पाचपट महाग दारू इथे विकली जात होती. त्याशिवाय येथे डान्ससाठी येणाऱ्या महिलांवर मोठय़ा प्रमाणात पैसा उधळला जात होता. यातही वेगवेगळय़ा प्रकारच्या कॅटगरी होत्या. ग्रॅण्ट रोड येथील ‘टॉपजा’, चेंबूर येथील ‘बुलबुल’, ‘कमांडर’, ‘हॉटस्पॉट’, घाटकोपर येथील ‘नटराज’ हे बार गर्भश्रीमंतांचे बार म्हणून ओळखले जात होते. तिथेही कॅटगरी होती. सामान्यपणे येणाऱ्या ग्राहकांसाठी तळमजल्यावर सार्वजनिक हॉल असायचा. सामान्य आर्थिक परिस्थिती असणारे लोक असायचे तर त्याच्यापेक्षा चांगली उधळपट्टी करू शकणाऱ्या लोकांसाठी पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये व्यवस्था केली जात होती. तेथील डान्सरही अधिक देखण्या व नृत्याची माहिती असणाऱ्या असायच्या. त्यापेक्षा आणखी छोटय़ा हॉलमध्ये खास व्हीआयपी, वरिष्ठ आयपीएस, आयएएस अधिकारी, राजकीय नेते, मोठे व्यापारी यांची व्यवस्था केलेली असायची. अशा खास पाहुण्यांच्या येण्याच्या वेळा या रात्री अडीचनंतर असायच्या.
डान्सबार खरे फोफावले ते नवी मुंबई विभागात. विशेषत: पनवेल व त्याच्या परिसरात डान्सबारचे पेवच फुटले. त्या डान्साची ख्याती केवळ मुंबई व नवी मुंबई इतकीच मर्यादित राहिली नाही, तर ते लोण पार अध्र्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. पुणे, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर येथील सायंकाळी श्रीमंत पोरांच्या टोळय़ा निघायच्या आणि रात्री दहा वाजता नवी मुंबईतील बारमध्ये येऊन धडकायच्या. गल्ली-बोळात, नाक्या-नाक्यावर झालेल्या या बारचा परिणाम समाजजीवनावर मोठय़ा प्रमाणात झाला. अनेक जण डान्समधील मुलींच्या नादाला लागून उद्ध्वस्त झाले. काहींनी स्वत:चे जीवन संपवले, तर काहींनी बारबालांची हत्या केली. शाळा-महाविद्यालयीत मुले कुतूहलापोटी या बारमध्ये पाऊल ठेवत होते. मग अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. घरातून मिळालेला पाकीटमनी कमी पडू लागायचा आणि मग हीच मुले डान्सबारमध्ये पैसे उडवण्यासाठी गुन्हेगारीकडे वळल्याच्या घटना घडल्या. अनेक तरुण मुले अगोदर घरातच चोरी करू लागली, पुन्हा शेजाऱ्या-पाजा-याकडे आणि शेवटी सराईत गुन्हेगार बनले. दारूच्या नशेत असलेल्या एका मुलाने तर आई डान्सबारमध्ये उडवायला पैसे देत नाही म्हणून तिचा खून केल्याची घटना ठाण्यात घडली. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. या धंद्यात पैसे मिळत आहेत, हे कळल्यानंतर चांगल्या घरातील काही मुलीही या व्यवसायाकडे वळल्या.
गुन्हेगारी अशी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे, हे गृहमंत्री आणि संवेदनशील माणूस असणाऱ्या आर. आर. पाटील यांच्या लक्षात आले. कायद्याच्या चौकटीत राहून बारवर कारवाई करणे, धाडी टाकणे असे प्रकार त्यांनी करून पाहिले. मात्र अनेक बारमालकांशी पोलिसांचेच लागेबांधे असायचे. त्यामुळे त्यांच्याकडून टाळाटाळ होऊ लागली तेव्हा त्या आबांनी गुन्हे विभागाकडून धाडी टाकून पाहिल्या. मात्र मोठी गुप्तता पाळून धाड टाकायची, गिऱ्हाईक, मुली, वेटर, मॅनेजर आणि काही ग्राहकांना पोलिसांनी पकडायचे आणि दुस-या दिवशी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर केले की, ५०० रुपये दंड भरून त्यांना सोडून दिले जायचे. हे आबांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी या डान्सबारवरच बंदी घालण्याचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आणि अनेक सहकारी मंत्र्यांचा विरोध असताना त्यांनी धाडसी पाऊल टाकून डान्सबारवर बंदी घातली. अनेक गृहिणींनी, अनेक मातांनी त्यांना लाखलाख धन्यवाद दिले. मात्र डान्सबारचे मालक आणि बारबालांच्या संघटनांनी आबांविरोधात उठाव केला. पत्रकार परिषदा झडू लागल्या. मानवाधिकाराचे दरवाजे ठोठावले जाऊ लागले. बारबालांच्या संघटनांनी तर आमचा रोजगार हिरावून घेऊन आमच्या मूलभूत हक्कावर गदा आणली आहे, असे टाहोही फोडला; पण आबा बधले नाहीत. डान्सबार बंद झाल्यामुळे बारबालांचा रोजगार बुडालेला आहे, त्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आली आहे, त्यांना पर्यायी रोजगार काय देणार, असा भडीमार आबांवर झाला तेव्हा त्यांनी आपल्या खास स्टाईलने मोठा पॉज घेत आणि डोळे मिचकावत दिलेले उत्तर त्यावेळी फार सगळीकडे चर्चेचा विषय झाले होते. आबा म्हणाले होते, ‘कुणाचा रोजगार हिरावून घेण्याचा राज्य सरकारचा हेतू नाही. जरी काही कारणाने कुणाच्या रोजगावर गदा आली असेल तर त्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांना रोजगार मिळवून देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. या जबाबदारीपासून सरकार पळणार नाही. डान्सबार बंदीमुळे ज्या महिलांचा रोजगार हिरावला गेला आहे, त्यांच्या रोजगाराची सरकारने पूर्ण तजवीज केली आहे.’ असे म्हणून आबांनी मोठा पॉज घेतला..डान्सबारमधील महिलांसाठी नेमकी कोणती योजना आबांनी आणलेली आहे याकडे सर्वाचेच लक्ष लागलेले असताना आबा म्हणाले, ‘डान्सबारमध्ये काम करणारी एकही महिला रोजगारापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने तजवीज केली असून रोजगार हमी योजनेवर या बारडान्सरना प्राधान्याने काम द्यावे, अशा सूचना केल्या आहेत.’ आबांच्या या वाक्यावर हशा पिकला. मात्र पुन्हा गंभीर होत आबा म्हणाले, ‘ग्रामीण भागातील आमच्या हजारो माता-भगिनी जर या रोजगारावर आपली उपजीवका करीत असतील तर यांना ते काम करायला काय हरकत आहे. काही मूठभर लोकांसाठी संपूर्ण समाज उद्ध्वस्त होऊ देणार नाही.’ इतकी खंबीर भूमिका घेणारे आजच्या सरकारमध्ये कुणी आहे, असे आता तरी दिसत नाही. म्हणून डान्सबारचे दरवाजे खुले होत असताना आबा तुमची
आठवण येते.