जगातील कोणताही बाप आपल्या मुलाचा सायकल घेऊन देण्याचा हट्ट पुरवित असतो. उत्तर प्रदेशात बापाला सायकल हवी आहे. बापाने सायकलचा हट्ट धरल्याचे हे जगातील आगळेवेगळे उदाहरण आहे. मात्र ती सायकल मुलालाच मिळेल आणि मुलाचाच हट्ट पूर्ण होईल.
‘बाप विरुद्ध बेटा’ अशी ही उत्तर प्रदेशातील लढाई सायकलवरून सुरू झालेली आहे. पण बेटा एवढा चलाख आहे की, आपल्या बापाशी आपल्याला लढाई करावी लागेल, याची खूणगाठ सहा महिने आगोदरपासूनच बहुधा बेट्याने गृहीत धरली होती. त्यामुळे समजा, बापाने सायकलचा हट्ट पुरवला नाही तर पर्यायी व्यवस्था करून ठेवावी म्हणून आपल्या पक्षाच्या घोडदौडीसाठी सायकलपेक्षा अधिक वेगाची ‘बाईक’ (फटफटी) हे चिन्ह बेट्याने मनात योजून ठेवले. निवडणूक आयोगाकडे अशी बरीच चिन्हे पडून आहेत की, जी कोणी घ्यायला तयार होत नसते. ज्या पक्षांना मान्यता नाही त्या पक्षांसाठी जातं, त्रिदल, हातोडा, स्टोव्ह, बरणी अशी विविध गंमतशीर चिन्हे निवडणूक आयोगाकडे पडून आहेत. आज कोणाला खरे वाटणार नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आजची निशाणी जी ‘हात’ आहे – ती अशी सांदी-कोप-यात पडून होती. जेव्हा श्रीमती इंदिरा गांधी यांनी वेगळा पक्ष काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आपल्या पक्षाला काँग्रेसकडे असलेली ‘गाय-वासरू’ ही निशाणी मिळणार नाही याची खूणगाठ इंदिराजींनी मनाशी ठेवली होती. श्री वसंत साठे यांच्यावर ‘हात’ चिन्ह राखून ठेवण्याकरिता अर्ज करण्याची जबाबदारी त्यांनी सोपवली. त्यावेळच्या निवडणूक आयोगाने सांगितले की, तो ‘हात’ रिकामाच पडलेला आहे आणि अपक्षांकरिता जे राखीव चिन्ह होते तो कोप-यात पडलेला ‘हात’ पक्षाचे चिन्ह म्हणून स्वीकारले. त्यावेळी देशात त्यांचे विरोधक असलेल्या मोरारजी देसाई, स. का. पाटील, निजलिंगप्पा, अतुल्य घोष आदी अहंकारी नेत्यांना असा काही ‘हात’ दाखवला की, आता राष्ट्रीय निवडणूक चिन्हांमध्ये ‘हात’ हे चिन्ह अग्रेसर आहे. ध्यानीमनी नसताना काँग्रेसचे हे चिन्ह इतके प्रभावी ठरले की, काँग्रेसच्या विरोधातील कोणत्याही पक्षाच्या नेत्याची सभा सुरू होताना तो नेता व्यासपीठावर आला की, पहिल्यांदा हात उंचावूनच समुदायाला अभिवादन करतो, त्यामुळे विरोधकांतर्फेही हात निवडणूक चिन्हाचा प्रचार आपोआप होतो. असे अडगळीत पडलेले हे चिन्ह इंदिरा गांधी यांनी अमर करून टाकले. पहिल्या निवडणुकीत म्हणजे १९५२ साली काँग्रसची निशाणी ‘मानेवर जू’ असलेल्या बैलांची जोडी होती. काँग्रेसचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध त्यातून व्यक्त होत होता. काँग्रेस पुन्हा फुटली आणि गाय-वासरू चिन्ह घेण्यात आले. आता काँग्रेस ‘हाता’वर उभी आहे.
सत्तेत बसलेला आजचा जो भाजपा आहे त्याचे सुरुवातीचे निवडणूक चिन्ह ‘पणती’ होते. पण ती पणती काही पेटत नव्हती. वात आणि भरपूर तेल घातल्यावरही त्या पणतीला प्रकाश नव्हता. त्या पणतीचे जेव्हा कमळ झाले तेव्हा हळूहळू ते कमळ फुलत गेले आणि आज ते केंद्रात सत्तास्थानी आहे. या देशाच्या लोकशाहीचा जगातील क्रमांक पहिला आहे. इतक्या अनेक जाती-धर्माची लोकशाही या देशातील सामान्य माणसांनी टिकवून ठेवली; पण अजूनही या देशातील मतदारांना निवडणूक चिन्हाची गरज भासतेच आहे. जवळजवळ ७० वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर, ६५ वर्षापूर्वी सुरू झालेल्या मतदानानंतर, खरं म्हणजे व्यक्ती आणि चिन्हाऐवजी ‘पक्षाला मतदान’ हीच संकल्पना रूजवायला हवी होती. व्यक्तीलासुद्धा मतदान होता कामा नये. मतदान पक्षाला करायचे आणि ज्या टक्केवारीत ज्या ज्या पक्षाला मते मिळतील त्या टक्केवारीत लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या एकूण जागांपैकी त्या त्या पक्षाला तेवढे खासदार आणि आमदार मिळायचे. खासदारांची आणि आमदारांची यादी पक्षाने सादर करायची. यामुळे चांगले लोक राजकारणात येऊ शकतील आणि निवडणुकीतील पैशाचा चुराडा टळू शकेल. हा विचार रूजणे आणि पचणे खूप अवघड आहे. अशी कल्पना करू या की, निवडणूक मतदान यंत्रामध्ये प्रमुख पक्षांचीच नावे राहतील. त्या राजकीय पक्षाच्या नावासमोरचं बटन दाबायचे. यामुळे पक्ष आणि पक्षाचा कार्यक्रम याला महत्त्व येईल आणि व्यक्ती गौण ठरेल. लोकशाहीचे मुख्य सूत्र असे आहे की, लोकशाही संकल्पना मजबूत व्हायला हवी. तिथे व्यक्ती दुय्यम असायला हवी. आज नेमके उलटे झाले आहे. व्यक्तींना अतोनात महत्त्व आले आहे आणि त्या व्यक्तींच्या मागे लोकशाही झाकोळली गेली आहे.
..तर आता उत्तर प्रदेशातील बाप-बेटय़ाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये हिंदीतील ‘ती’ जी म्हण आहे.. ‘बाप से बेटा सवाई’ ती म्हण प्रत्यक्षात लागू होत आहे. बापाविरुद्ध लढायची तयारी बेटय़ाने केलेली आहे आणि बापही मुलाच्या विरोधात दंड थोपटून आहे. मुळात हा बाप पहिलवान होता. त्याची पहिलवानगी आजही त्यांच्या देहदृष्टीवरून जाणवते. यादव कुटुंबीयात गृहकलहाची सुरुवात द्वितीय पत्नीपासून झाली आणि त्यामुळे सावत्र मुलाच्या विरोधात आईने आक्रोश सुरू केला आणि सख्ख्या बापाने कैकयीला मदत करण्याचे ठरवले. त्यामुळे यादव कुळातील हा संघर्ष कमालीचा चव्हाटय़ावर आला. एका घरात अनेक सायकली असतात. यादवांच्या घरात बाप आणि बेटय़ाची एकच सायकल, त्यामुळे मारामा-या सुरू झाल्या. प्रकरण निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेले, आता त्याचा फैसला होईल. एक चाक बापाकडे आणि एक चाक बेटय़ाकडे अशी वाटणी करणे शक्य नाही. त्यामुळे बेटय़ाने हट्ट केला तर सायकल त्याला मिळेल. बापाने दांडगाई?केली तर बापाकडे जाईल. एकूणच उत्तर प्रदेशातील सायकलचे भांडण मोठे गंमतशीर आहे. सायकलच्या दोन चाकांना संसाराची उपमा देतात. मात्र ही उपमा तशी योग्य नाही. कारण सायकलचा स्टँड, सायकलचे कॅरिअर, सायकलची मागची सीट, तो सर्व?भार मागच्या चाकावर असतो आणि पुढच्या चाकाला असते ती ट्रिंग ट्रिंग म्हणजे घंटा. पुढे बसणारा ती रूबाबात वाजवतो. संसाराची उपमा देताना सगळा भार मागच्या चाकावर म्हणजे घरातील स्त्रीवर दिला जातो. यादवांच्या घरातील सायकलचे भांडण एका स्त्रीमुळेच ओढवले. रामायण-महाभारतसुद्धा स्त्रीमुळेच घडले आहे. आता उत्तर प्रदेशातील हे महाभारत त्याच स्टाईलने सुरू आहे.
कोणी म्हणतात की, ‘मुलायमना जवळ करून मोदींनीच हे भांडण लावून दिले आहे.’ ते खरे असू शकेल. मोदी काही करू शकतात. नोटाबंदी करू शकतात. नोटा छापू शकतात. वाटू शकतात. पकडू शकतात. काही जणांना तुरुंगात घालू शकतात. काही उद्योगपतींना सर्व सवलती देऊ शकतात. सगळे काही आहे ते मोदींच्या मर्जीवर आहे. कारण हुकूमशहाला कोणलाही विचारावे लागत नाही. मोदींना सोयीची अशी भूमिका बापाने घेतली. पण चाणाक्ष बेटय़ाने आपल्या बापाची चाल ओळखली आणि त्याला शह द्यायचे ठरवले. मिळाली तर सायकल, नाहीतर फटफटी घेऊन हा बेटा तयार आहे. राजकीय निरीक्षकांना असे वाटत होते की, या भांडणात उत्तर प्रदेशात भाजपाचा फायदा होईल. पण आता उत्तर प्रदेशातीलच राजकीय निरीक्षक-अगदी ‘जागरण’सारख्या वृत्तपत्राचे संपादकसुद्धा असे लिहू लागले आहेत की, बापाशी झालेल्या भांडणाचा फायदा बेटय़ालाच अधिक होणार आहे. विशेष म्हणजे बापाला या भांडणाचा खूप ताण आहे. त्यांचा रक्तदाब वाढलाय म्हणतात. पण बेटा ताजातवाना आहे. त्याच्याबरोबर २०० आमदार आहेत. २३४ मधील २००. शिवाय बापाशी भांडण घेतल्यानंतर खरं तर बेटय़ावर ताणतणाव यायला पाहिजे होता. पण बापाची खेळी झालेली आहे. बाप मुख्यमंत्रीसुद्धा राहिलेला आहे आणि बापाबरोबर वय नाही. बेटा मुख्यमंत्री आहेच आणि त्याच्या एकूण देहबोलीवरून असे वातावरण दिसते आहे की, मिळाली तर सायकल नाही मिळाली तर फटफटी अशी काही सुसाट वेगात तो घेऊन जाईल की मोदी महाराजांचे नाक तळापासून कापण्याचे काम हा बेटाच करील. मग परिस्थिती अशी होईल की, बापाच्या गळय़ात तपेलं येईल. उत्तर प्रदेशातील आजच्या राजकारणाची स्थिती अशी आहे की, बेटा एक नंबरवर आहे. बेटय़ाची बहेन दोन नंबरवर आहे आणि बेटय़ाचा बाप तीन नंबरला आहे आणि कमळ चार नंबरला. या स्थितीत बेटय़ाचा विजय होणे अत्यंत आवश्यक आहे. बेटा जिंकणे म्हणजे पुढची पिढी जिंकणे आणि बेटा जिंकणे म्हणजे मोदींच्या दिल्लीच्या सत्तेला प्रचंड तडाखा बसणे. काय वाट्टेल ते झाले तरी भाजपाचा पराभव व्हायलाच हवा. कारण देशावरील आजचे सगळय़ात मोठे संकट मोदी हेच आहे. मोदी लोकशाही बरबाद करून टाकतील. आणि म्हणून उत्तर प्रदेशात बेटा जिंकला पाहिजे, बाप हरला पाहिजे. सायकल बेटय़ाला मिळाली पाहिजे. कारण जगातील प्रत्येक बाप सायकल बेटय़ालाच देत असतो. स्वत:कडे ठेवत नाही.
राहुल-अखिलेश एक झाले पाहिजेत
उत्तर प्रदेशातील निवडणुका देशाच्या राजकारणाला वेगळे वळण लावणा-या ठरतील. मोदींच्या हातात एकवटलेली अनिर्बंध सत्ता उत्तर प्रदेशात भाजपाचा पराभव झाल्यानंतर ढिली होईल आणि मग मोदींना सत्तेतून पायउतार व्हावेच लागेल. ती काळाची गरज ठरेल. नाही तर पुढच्या दोन-अडीच वर्षात मोदी हा देश बरबाद करतील. लोकशाही, लोकशाही संकेत, परंपरा यांच्याशी मोदींचे काही देणे-घेणे नाही. ‘सूडबुद्धीचे राजकारण’ हा त्यांचा राजकारणाचा मंत्र आहे. यापूर्वी अतिशय हुशारीने भाजपाने काँग्रेसच्या राजवटीतील काही प्रकरणांचा गवगवा करून अण्णा हजारेंना वापरून घेतले आणि त्याचा फायदा भाजपाने मिळवला, काँग्रेसची प्रतिमा भ्रष्ट आहे, असे वातावरण निर्माण केले गेले. आज प्रत्यक्षात मोदींवर ४२ कोटी रुपये खाल्ल्याचा थेट आरोप आहे. राहुल गांधींची टिंगल करण्यात सगळय़ा वाहिन्या आणि मोदींचे चमचे आघाडीवर आहेत. पण झालेल्या आरोपाचा मोदींनी अजून इन्कार केलेला नाही. जर हा आरोप खोटा असता तर राहुल गांधी यांना मोदी कोर्टात खेचू शकले असते. ‘दूध का दूध’ आणि ‘पानी का पानी’ झाले असते. मोदींना ती हिंमत नाही. कारण भ्रष्टाचाराचे खरकटे त्यांच्या तोंडाला लागलेले आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की, मोदी जर एवढे शूर-वीर आहेत तर आरोपाचा इन्कार का करत नाहीत? आणि इथेच गोम आहे! ४२ कोटी रुपये हा आकडा छोटा आहे. पण त्याचे पुरावे विरोधकांकडे आहेत. हे मोदींना माहिती झाल्यामुळे मोदी मूग गिळून बसले आहेत आणि ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ असली भंपक भाषणबाजी करत गावभर ते फिरत आहेत. मोदींच्या भाषणाचा लोकांना आता कंटाळा आलेला आहे. त्यांचे हातवारे नकोसे झालेत. हा माणूस ढोंगी आहे. नोटाबंदी करून त्यांनीच महाघोटाळा केलेला आहे. १५ लाख कोटी रुपये बँकेत जमा झाल्यानंतर काळा पैसा राहिलाच नाही. मग ज्या काळय़ा पैशाचे भूत मोदींनी उभे केले होते तो पैसा आहे कुठे? राहुल गांधींनी हेच नेमके प्रश्न उपस्थित केलेले आहेत. जे राहुल गांधींची टिंगल करत होते त्यांनाही आता जाणवू लागले आहे की, राहुल गांधींच्या म्हणण्यात तथ्य असल्याने देशात हळूहळू वातावरण मोदींच्या विरोधात जात आहे. आणि मोदींच्या पायाखालची चादर हळूहळू खिसकली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपाचे नाक तळापासून कापले गेले तर, मोदींच्या भाजपामध्येच त्यांच्याविरोधात एक नाही पन्नास लोक बोलायला सुरुवात करतील. अडवाणींची मानसिकता अशी आहे की, त्यांच्या मनातील अस्वस्थतेचा स्फोट कधीही होऊ शकेल. पुढची दोन-अडीच वर्षे मोदी बदनाम झाले की, या देशातील जनता भाजपाला दरवाजात उभे करणार नाही. ते करणे गरजेचे आहे.
मोदी हे देशावरील आणि लोकशाहीवरचे संकट आहे. म्हणून सगळे मतभेद विसरून जे जे,?भाजपाचे विरोधक आहेत, त्यांनी त्यांनी या घटकेला एक होण्याची गरज आहे. त्याची सुरुवात उत्तर प्रदेशमधून झाली पाहिजे. म्हणून राहुल गांधींना विनंती आहे की, त्या मुलायमच्या नादी लागू नका. तुमचे वय अखिलेशचे वय जवळपास समानच आहे. पुढच्या पिढीच्या हातात पुरोगामी विचारांचे राज्य यायचे असेल तर उत्तर प्रदेशात ११ मार्चला भाजपा नेस्तनाबूत होणे अत्यंत गरजेचे आहे. तेथील मतदारांची ती मानसिकता आहे. कारण मोदींनी नोटाबंदीने त्यांचा अतोनात छळ केला. लोकशाहीतील सूड घेणे म्हणजे विरोधात मतदान करणे! म्हणून राहुल गांधींनी काँग्रेसची निवडणूक आघाडी अखिलेश यादव यांच्याशी करावी. महत्त्व अखिलेशला द्यावे. अखिलेश यादवची लोकप्रियता आजही उत्तर प्रदेशात टिकून आहे. बापाशी भांडण झाल्यावर त्याचा फायदा अखिलेशला मिळतो आहे. या स्थितीत ‘किती जागा देता?’ असा आकडय़ांचा वाद न करता मुख्य शत्रू कोण आहे हे ओळखून उत्तर प्रदेशची लढाई काँग्रेसने लढवली पाहिजे. ती लढाई लढवली जाणे राहुल गांधी यांच्या उद्याच्या नेतृत्वासाठीही आवश्यक आहे. त्याचवेळी अखिलेश आणि राहुल गांधी यांनी थेट लालकृष्ण अडवाणी यांना भेटून आशीर्वाद घ्यावा. ते आशीर्वाद देतील. कारण त्यांना मोदींचा भस्मासुर किती धोकादायक आहे याचा अंदाज आलेला आहे आणि म्हणून उत्तर प्रदेशचे राज्य भाजपाच्या हाती न जाणे ही २०१९ च्या मोदींच्या पराभवाची नांदी ठरेल. गुजरातमधील मोदींनी केलेले गोध्राकांड, त्यांची एकूण गुर्मी, संसदेला कस्पटासमान मानणारी वृत्ती, सर्वोच्च न्यायालयालाही न जुमानणारी प्रवृत्ती या सर्वातूनच देशाला जाणवू लागले आहे की, मोदी या देशाला परवडणारे नाहीत. अशा वेळी काँग्रेसचा राष्ट्रीय विचार हा पुरोगामी विचार सोबत ठेवून भाजपाचा पराभव करणे हे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे आणि ते घडू शकेल.
भाजपाअंतर्गत इतकी धुसपूस आहे की, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार बेचैन आहेत. एका खासदाराची भेट झाली, तो पूर्वी समाजवादी पक्षाचा होता. मोदी लाटेत भाजपामध्ये गेला, निवडून आला. जुनी मैत्री आहे. त्याला विचारले.. काय चालले आहे.. त्याने प्रांजळपणे सांगितले..
‘श्रीमान मोदीजीकी वजहसे सांसद तो बन गए, ये कबूल करना चाहिये। लेकीन साथमें यह भी बताता हूँ की जैसे मोदीजी की वजहसे सांसद बने वही मोदीजीकी वजहसे हम घर जानेवाले हैं’
ही एका खासदाराची प्रतिक्रिया नाही. ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळे मोदींची कलई निघालेली असताना काँग्रेसने उत्तर प्रदेशात निवडून येणा-या पक्षालाच शक्ती दिली पाहिजे, तरच मोदींचा पराभव होईल. शीला दीक्षित यांची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मागे घ्या, उत्तर प्रदेशात काँग्रेसची शक्ती नाही हे समजून घ्या. मोरारजींचे सरकार पाडण्याकरिता इंदिराजींनी चरणसिंग यांना पाठिंबा दिला. सरकार बनवायला दिला. सरकार चालवायला दिला नाही. राजकारणात हे चातुर्य दाखवणे गरजेचे आहे आणि काँग्रेसने ती अपेक्षा पूर्ण करावी.