महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना त्यांच्या गुजरात प्रेमाबद्दल खडे बोल सुनवले आहेत. मोदींना देशाचा पंतप्रधान व्हायचे आहे. पण, त्यांच्या भाषणातला गुजरात अजूनही सुटत नाही. ते सातत्याने गुजरातमध्ये केलेल्या विकासाच्या कामाचाच ढोल बडवत राहतात. हे ढोलसुद्धा खरे नाहीत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना त्यांच्या गुजरात प्रेमाबद्दल खडे बोल सुनवले आहेत. मोदींना देशाचा पंतप्रधान व्हायचे आहे. पण, त्यांच्या भाषणातला गुजरात अजूनही सुटत नाही. ते सातत्याने गुजरातमध्ये केलेल्या विकासाच्या कामाचाच ढोल बडवत राहतात. हे ढोलसुद्धा खरे नाहीत. दोन वर्षापूर्वी राज ठाकरे गुजरातेत जाऊन आले. तिथे काही दिवस राहून त्यांनी मोदी यांच्या प्रगतीचे दर्शन घेतले आणि या विकासकामांमुळे ते खूपच प्रभावित झाले. नंतरचे काही महिने तर राज ठाकरे सातत्याने ‘नमो’ मंत्र जपत होते. त्यांच्या नेहमीच्या बोलण्याच्या स्टाइलमधून ते केवळ नमो मंत्र म्हणून थांबत नव्हते तर त्यावरून राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना टोकत होते. त्यांच्यावरचा हा नमो प्रभाव आता ओसरला असल्याचे दिसत आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो आणि राज या दोघांच्या मैत्रीमुळे राज ठाकरे यांचा मनसे पक्ष भाजप-सेना युतीसोबत येईल, अशा अपेक्षा वाढल्या होत्या. राज ठाकरे नरेंद्र मोदींमुळे एवढे प्रभावित झाले होते की, आघाडीत येण्याबाबत मोदींनी शब्द टाकताच राज ठाकरे ताबडतोब तो मान्य करतील, अशी आशा भाजपच्या नेत्यांना वाटत होती. या आशेची मर्यादा एवढी वाढली होती की, राज ठाकरे यांच्या युतीमध्ये येण्यास शिवसेनेने विरोध केला तर शिवसेनेशी असलेली युती तोडून मनसेशी युती करावी, असाही विचार काही भाजप नेत्यांच्या मनात यायला लागला होता. मात्र, आता राज ठाकरे यांची युतीत येण्याची शक्यताही दुरावली आहे आणि त्यामुळे भाजपला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
विरोधी पक्षांवर टीका करताना मला एक हाती सत्ता द्या, मी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतो, वगैरे आश्वासनांची धूळफेक लोकांवर केली. मात्र, नाशिकमध्ये मनसे व भाजपच्या युतीच्या हाती पालिकेची सत्ता असूनही मनसेने येथे लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. मात्र, ‘आप’च्या दिल्लीतील यशस्वी स्वारीनंतर प्रत्येक पक्षाने आपण चर्चेत आणि लोकांच्या नजरेत कसे राहू, यासाठी प्रयत्न केले आहेत. ‘मनसे’कडे आता मुद्दे उरलेले दिसत नाहीत. त्यामुळे इतरांवर टीका करून, नको ते क्षुल्लक मुद्दे उपस्थित करून लोकांच्या नजरा स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. गेल्या वर्षापासून मनसेचे लोकप्रतिनिधी महाराष्ट्रातील ज्या भागात काम करत आहेत त्या लोकप्रतिनिधींचे प्रगतिपुस्तक तपासण्याचे काम राज ठाकरे यांनी करावे. ‘आप’चा बाप बनण्यासाठी मनसे उत्सुक आहे. मात्र, ‘आप’चा बाप बनण्यासाठी ‘आप’ने लोकांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कामाचा आढावा राज यांनी प्रथम घ्यावा. ‘मायबाप’ मतदारांना दिलेली आश्वासने सोयीस्करपणे विसरणा-या मनसेने हे लक्षात ठेवावे. एखाद्या पक्षावर किंवा नेत्यावर टीका करून लोकांना भावनिक आवाहन करून मतांचा जोगवा मागण्याचे दिवस आता संपले आहेत.