गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करत मुंबई व उपनगरांतून सोमवारी कोकणसाठी सहा बसेस रवाना झाल्या.
मुंबई- गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करत मुंबई व उपनगरांतून सोमवारी कोकणसाठी सहा बसेस रवाना झाल्या. स्वाभिमान संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष तथा आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘१०० रुपयांत कोकण’चे मुंबई आणि परिसरात जोरदार स्वागत होत असून या अभिनव उपक्रमाबद्दल कोकणवासीय नितेश राणे आणि स्वाभिमान संघटनेला धन्यवाद देत आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात दरवर्षी जाणा-यांची संख्या लाखोंच्या घरात असल्याने रेल्वे व एसटीचे आरक्षणही पटकन फुल्ल होते. अशावेळी खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांच्या खिशावर दरोडा टाकून त्यांची लूट माजवतात. हे थांबवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमान संघटनेने फक्त १०० रुपयांत कोकणचा सुखकर प्रवास उपलब्ध करून दिला.
त्यानुसार दादर, वाशी, बोरिवली, डोंबिवली, विरार व ठाणे भागातून सोमवारी प्रत्येक एक बस सोमवारी सोडण्यात आली. स्वाभिमानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी अनेक पर्याय शोधणा-या कोकणवासीयांची गैरसोय स्वाभिमानने राबविलेल्या उपक्रमामुळे दूर झाली आहे. ‘स्वाभिमान’च्या या योजनेचा मोठा फायदा कोकणवासीयांना होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांतून उमटली.
गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी आरक्षण मिळावे म्हणून दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र त्याकरता अनेक अडचणी आल्या. खासगी आरक्षणाला गेलो असता दादर ते कणकवलीपर्यंत १२०० रुपये सांगण्यात आले. मात्र आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने फक्त १०० रुपयांत गावी जायला मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत.
– सुरेश केळकर
इतर राजकीय पुढा-यांनी यातून आदर्श घेण्यासारखे आहे. कोकणवासीयांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याचे काम आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या वतीने करण्यात आले.
– कमलेश पाठक
ही अतिशय चांगली योजना आहे. गर्दीच्या वेळी रेल्वेचा प्रवास नकोसा होतो. अनेकदा आरक्षण असूनही गाडीत चढायला जागा मिळत नाही. स्वाभिमान संघटनेच्या वतीने राबवलेली योजना कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी उत्तम आहे.
– लावण्या सावंत
दादर ते कणकवली प्रवास प्रथमच करत आहे. मात्र कोकणी माणसाची ख-या अर्थाने ही सेवा आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेतर्फे करण्यात येत आहे. केवळ १०० रुपयांत हा प्रवास उपलब्ध करून ही सेवा थांबत नाही तर बस थांब्यावर प्रवाशांना इच्छित ठिकाणाची माहिती दिली जाते. तेथे ये-जा करणा-या प्रवाशांकडे स्वाभिमानचे कार्यकर्ते आस्थेने विचारणा करतात. यामुळे गोंधळाची परिस्थिती उद्भवत नाही. या सेवेसाठी ‘स्वाभिमान’चे मन:पूर्वक आभार.
– अरविंद बोबले