कोकणचे अर्थकारण चालते ते येथील आंबा, काजू आणि शेतीसह मासेमारी व्यवसायावर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मसुरे- कोकणचे अर्थकारण चालते ते येथील आंबा, काजू आणि शेतीसह मासेमारी व्यवसायावर असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यातील प्रमुख स्रेत आहे तो आंबा व काजू पिकाचा! फलोद्यान योजनेमधून अनेक ठिकाणच्या कातळ जमिनीत आंबा व काजू पिकाची लागवड येथील शेतक-यांनी मोठया प्रमाणावर केली आहे.
स्फोटाद्वारे खड्डे खोदून अशा उभारलेल्या बागांना विशेष महत्त्व असले तरी ज्या ठिकाणी कातळाला नैसर्गिक भेगा व मऊपणा आहे अशाच ठिकाणी ही लागवड यशस्वी झाल्याचे दिसून येते. आचरा-मशवी-देवगड मार्गावर काही आंबा कलमे कित्येक वर्षे वाढ न होता कमी उंचीचीच दिसून येत आहेत.
स्फोटाच्या साहाय्याने खड्डा खोदून त्यामध्ये बाहेरील माती आणून तयार केलेल्या बागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात झाडाची ‘मर’ आढळून येत आहे. बागायतदारांनी यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण एक झाड जरी रोगग्रस्त झाले तरी त्यापासून मिळणा-या उत्पन्नास मुकावे लागणार आहे.
आंबा हे उष्ण कटिबंधातील फळपीक असून या पिकामध्ये जमिनीत असणा-या मर्यादित ओलाव्यावर टिकून राहण्याची विशेषक्षमता असते. परंतु मागील काही वर्षे तापमानात वाढ होत असल्याने या वाढलेल्या तापमानामुळे जमिनीतून व कलमांच्या पानातून बाष्पीभवनाचे प्रमाण ठरावीक पातळीपेक्षा जास्त झाल्याने पाण्याचा अती ताण पडून ठरावीक कलमे वाळत आहेत. त्यातच सदर लागवड ही कातळात असल्याने कलमांच्या विस्ताराचा विचार करता मुळांची वाढ खुंटून मुळे कलमांच्या बुंध्याजवळ मर्यादित राहिलेली दिसून येतात.
मर लागण्यापूर्वीची प्राथमिक लक्षणे
झाडाच्या वाढत्या वयाप्रमाणे मुळांच्या वाढीसाठी बुंध्याभोवती कातळात अपुरी जागा राहिल्याने शेंडे खुरटलेले राहतात व झाडे शेंडयाकडून सुकतात. अशा झाडाची स्वतंत्र ओळख ठेवणे आवश्यक असते. ही मर कातळावरील कोणत्याही वयाच्या बागांमध्ये आढळू शकते अशी माहिती कृषीतज्ज्ञ अभिजीत मदने यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे वाढत्या तापमानामुळे कलमांचे बाष्पोत्सर्जन व प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. या वेळेस झाडावरील नवीन व जुनी अशी सर्व पाने पिवळसर पडतात. या झाडांना वेळीच पाणी दिले असता पुन्हा पालवी येणे शक्य असते.
तात्पुरत्या उपाययोजना
प्रार्दुभावित कलमाच्या बुंध्याभोवती दोन ते अडीच फूट उंचीची अळी बांधावी. त्यात बाहेरून उत्तम प्रकारची माती आणून टाकावी. यामुळे तंतुमुळाच्या वाढीस पुरेशी माती मिळेल. तसेच झाडांना पाणी व अन्नद्रव्याचा अतिरिक्त पुरवठा होऊन झाडांची उष्णता सहन करण्याची क्षमता वाढते.
या कलमांना खत व्यवस्थापन करताना सेंद्रीय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्याचा सल्ला मदने यांनी दिला आहे. सेंद्रीय खतामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढून जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढते. प्रादुर्भावित कलमे निवडून अशा कलमांची शेंडयाकडील छाटणी करावी.
ही छाटणी सप्टेबर महिन्याच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात करावी. तसेच अशा कलमांना खोड किडयाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नियंत्रणाबाबतच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात.
पाणी व्यवस्थापन आवश्यक
पाणी व्यवस्था असलेल्या ठिकाणी प्रादुर्भावित कलमांना आठवडयातून एक वेळेस दोनशे ते तीनशे लिटर पाणी द्यावे. पाणी देण्याचा हा कालावधी प्रामुख्याने मार्च ते मे महिना असावा. अशा झाडांच्या बुंध्यालगत जमिनीवर आच्छादन केल्यास जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. हे आच्छादन झाडावरील गळालेल्या पानांचे अथवा सुक्या गवताचे करावे.
बागायतदार मित्रांनो, मर रोगाने कलमे अथवा काजू झाडे मरण्याचे प्रमाण अत्यल्प असले तरी नुकसानच आहे. ते टाळण्यासाठी काही सोप्या उपाययोजना करता येणे शक्य आहे. सध्याच्या काळात आंबा किंवा काजूच्या प्रत्येक झाडाचे उत्पन्न वातावरणातील बदलाने तुलनेने कमीच झाले आहे. मग कशाला मुकुया आपण हातच्या उत्पन्नाला. तुमच्यासुद्धा फळबागेत मर रोगाची थोडी जरी चाहूल एखाद्या झाडाला लागली तर ते झाड वाचवणे तुमच्याच हातात आहे.