शाळेतून घरी परतत असताना मैदानात ठेवलेल्या दुचाकी चालवण्याची हौस दहावीतील विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतल्याची दुर्दैवी घटना कल्याणजवळच्या आंबिवली गावात घडली.
कल्याण – शाळेतून घरी परतत असताना मैदानात ठेवलेल्या दुचाकी चालवण्याची हौस दहावीतील विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतल्याची दुर्दैवी घटना कल्याणजवळच्या आंबिवली गावात घडली. या दुचाकी चोरीच्या संशयावरून इराणी वस्तीतील तरुणांनी दहावीत शिकणा-या दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्यात फैयाज शेखचा सोमवारी मृत्यू झाला.
या मारहाण प्रकरणी तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी केली. आंबिवलीत राहणारे फैयाज शेख व दीपक भंडारी हे १ मार्च रोजी दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आणण्यासाठी पाटील विद्यालयात गेले होते. शाळेतून परतताना मैदानात उभ्या असलेल्या दोन दुचाकी चालवण्याचा मोह या विद्यार्थ्यांना झाला.
या दुचाकीचे मालक असलेल्या इराणी तरुणांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी दोन विद्यार्थ्यांना हटकले. दुचाकीची चोरी केल्याच्या संशयावरून फै याज व दीपकला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दुचाकीवरून पडल्याने फैजलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो कोमात गेला. त्याच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सोमवारी त्याचा मृत्यू झाला.
दीपकने हा सर्व प्रकार घरी सांगितला. फैयाजच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी व स्थानिक रहिवाशांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यावर धाव घेऊन मारहाण करणा-यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी फैयाजच्या कुटुंबीयांना दिले. फैयाज हा एकुलता एक मुलगा होता. मनमिळावू व अभ्यासात हुशार असणा-या फैयाजच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फैयाजच्या मित्रांची जबानी घेण्याचे काम सुरू असून त्याचा शवविच्छेदन अहवाल मागवला आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
– विजय भिसे, पोलिस निरीक्षक, महात्मा फुले पोलिस ठाणे