भल्या पहाटे शस्त्रास्त्रांचा खणखणाट सुरू होतो. तलवारी, भाले, अन्य शस्त्रास्त्रे घासून पुसून पुढे होतात. सगळी सुरक्षा यंत्रणाच सज्ज झालेली असते. औचित्य असते ते खंडेनवमीचे! नवरात्रीतील नवव्या दिवशी शस्त्रास्त्र पूजा करण्याची परंपरा गेले कित्येक शतके चालू आहे. ग्रामीण भागातील बलुतेदारापासून ते लष्करातील सैनिकांपर्यंत.. सर्वत्र नवमीचा दिवस म्हणजे प्रचंड उत्साहाचा आणि जल्लोषाचा क्षणच. मालवणी मुलखात या दिवशी शेतातील नव्या भाताचे, नव्या पिकाचे याबरोबरच विविध रानफुलांचे आणि साथीला आंब्याच्या पानांमधून साकारलेले तोरण घराच्या मुख्य दरवाजाला लावले जातेच जाते. लष्करी छावण्यांमध्ये खंडेनवमी दिवशी शस्त्रास्त्र पूजा करतानाच बक-याची मान तोडण्याची परंपरा आहे. काही ग्रामीण भागातही ही प्रथा चालू आहे. अलीकडे शस्त्रास्त्रांची परिणीती बदलली आहे. लढाऊ परंपरा जोपासणारी मंडळी विधिपूर्वक शस्त्रपूजन करतात. शिल्पकार, कारागीर आपापल्या उपकरणांना मनोभावे वंदन करतात. या उपकरणांना, शस्त्रांना देव मानून पूजा करण्याची प्रथा महाराष्ट्रात आणि राजस्थानातप्रामुख्याने आढळते. या दोन्ही प्रातांत खड्ग पूजेचे विशेष महत्त्व आहे.
आज तर विजया दशमी आणि खंडेनवमी एकाच दिवशी होत आहे. या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा केल्यावर दुस-या दिवशी सिमोल्लंघन करत नव्या मोहिमा सुरू करण्याची परंपरा पूर्वज जपत असत. आजही हा वसा जपला जात असला तरी त्याचा व्यास आणि त्रिज्या बदलली आहे. कृषी वलयांच्या खड्ग पूजेत जसे शस्त्रास्त्रांना महत्त्व आहे तसेच दारावर तोरण बांधण्याची परंपरा मोठी आहे.
खंडेनवमी दिवशी घराच्या मुख्य दारावरच नव्हे तर जी जी महत्त्वाची जागा आहे तेथे तेथे नव्याचे बांधने (भाताची लोंबी, वरी, नाचणी तसेच आंब्याची पाने एकत्र करून बांधला जाणारा झुंबर) लावलेच जाते. पूर्वी तोरण बांधण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जायच्या. झेंडूच्या फु लांमध्ये आंब्याचे डहाळे, भाताच्या लोंब्या दिमाखदार दिसायच्या. शेतीची परंपरा अनेक ठिकाणी खंडित झाली. यामुळे तोरणाची परंपरा जपायची तर भाताच्या लोंब्या बाजारातून खरेदी कराव्या लागतात.
आंब्याचे डहाळेही आता मिळेनासे झाले आहेत. रायवळ आंब्यांची जागा कलमी आंब्याने घेतली. यावर कडी म्हणजे अलीकडे बारमाही ताजे दिसणारे तोरण मिळायला लागले आहे. प्लास्टिकमध्ये अस्सल तोरण उपलब्ध झाले असले तरी मुलखातल्या तोरणाची मजा काही वेगळीच. वर्षाच्या बाराही महिने टवटवीत दिसणारे. कृत्रिम असे. माणसाचे जीवनही असेच झाले आहे. सारं काही कागदी फुलांसारखे. कोमजायचे नाही कधी असाच अट्टाहास असतो सा-यांचा. पण परंपरा जपते हो आजची पिढी, असे जेव्हा ज्येष्ठ मंडळी सांगतात तेव्हा हायसे वाटते.
पूर्वी म्हणजे अगदी अलीकडच्या काही वर्षापर्यंत शस्त्रास्त्र पूजेचा थाट काही और असायचा. गंध, अक्षता समर्पणाबरोबरच नऊ दिवस पाणी शिंपलेले रुजवाणाच्या डहाळया शस्त्रास्त्रांवर पोहोचायच्या. घटस्थापनेदिवशी पूजेसाठी ठेवलेला घट हलविला जायचा. एकजात सर्व शस्त्रास्त्रे पूजली जायची. वहया- पुस्तकेही पूजेच्या जाग्यापर्यंत पोहोचायची.
घराघरात शस्त्रास्त्रांची जागा भली मोठी असायची. अलीकडे शस्त्रास्त्रे कमी झाली. पुस्तकांची जागा लॅपटॉपने घेतली. ट्रंकांची जागा कपाटाने घेतली. शेतक-यांचे नांगर पूजेला असायचेच. या नांगरांऐवजी आता ट्रॅक्टर आले. खंडेनवमीची परंपरा मात्र टिकून आहे. नवमी दिवशी ही प्रथा जपण्याचा कसोशीने प्रयत्न होतो आहे.
त्या पाठोपाठचा उत्सव म्हणजे दसरा.. विजयादशमी म्हणजे एक विजयाचा उत्सव. साडेतीन मुहूर्तापैकी एक. प्रेम कसे वृद्धिंगत करावे याचा मुहूर्त. दसरा म्हणजे सीमोल्लंघन. या सीमोल्लंघनादिवशी आपटयाची पाने शस्त्रास्त्रांवर ठेवली जातात. त्याचवेळी शस्त्रे उचलली जातात. यामागच्या लोककथा, पुराणकथा गावोगावी बदलतात. एक मात्र खरे की कथा बदलल्या तरी परंपरा त्याच असतात. काही गावांमध्ये नवमीदिवशीच सोने लुटतात. सोने लुटण्याच्या निमित्ताने का सारे जण एकत्र येतात. गावागावातील ग्रामदेवतांच्या ठिकाणी तर काही संस्थानांमध्ये शाही सोहळयात सोने लुटले जाते. यानंतरची परंपरा सर्वात महत्त्वाची.
‘सोने घ्या सोन्यासारखे व्हा’ असे सांगत लहान-मोठे एकमेकांना सोने देतात. अलीकडे संवाद हरवत चालला आहे. अशावेळी आजची पिढी ज्येष्ठांना सोने म्हणून आपटयाची पाने बहाल करते तेव्हा त्यांच्या चेह-यावर पसरलेला आनंद सोन्याहून अधिक असतो. परस्परांमधील नातेसंबंध दृढ होऊन आपुलकी, एकजूट निर्माण होण्यास यामुळे अधिकच बळ मिळते.
आज प्रत्येकालाच गतिशील जगायचे आहे. आणि त्याच्या संकल्पना वृद्धिंगत करणारी अनेक उपकरणे, अनेक यंत्रणा सहजपणे मिळत आहेत. सायबर तंत्रज्ञानाने सारेकाही डिजिटल झाले आहे. अशा वेळी खंडेनवमीही बदलली आहे. आता शस्त्रास्त्रांची जागा कमी झाली. भल्या पहाटेची गजबज थांबली. विशिष्ट कोनात अडकून ठेवलेल्या भिंतीवरच्या तलवारी आत फक्त शोभे पुरत्याच उरल्या आहेत. अन्य शस्त्रास्त्रांची रया बदलली आहे.
काळाबरोबर बदलायला हवं माणसांनी असे ज्येष्ठ मंडळी सांगायचे. आजची पिढी नव्या पिढीला हाच वसा देत आहे. दस-याच्या शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन करताना तुम्ही- आम्ही सर्वानीच बदलत्या काळाचे भान बाळगून नव्या आणि जुन्याची सांगड घालायला हवी. आमच्या मुलखातल्या दस-याचा उत्सवही बदलतो आहे. दस-यादिवशीच्या असणा-या परंपरा आता कमी होऊ लागल्या आहेत. त्यातील जिव्हाळा आणि सोन्याची म्हणजे आपटयाच्या पानांची देवाण-घेवाण कमी होऊ लागली आहे.
मात्र गावागावात होणारा हा दसरोत्सव वेगळा थाट टिकवून आहे. या दिवशी लागणारी शिवलग्न असो नाहीतर पतंगोत्सव.. उत्सवाचा दिमाख मोठा असतोच.
दुर्गा देवीच्या किल्ल्यात जत्रा..
खारेपाटण येथील इतिहासकालीन दुर्गादेवीच्या मंदिरात दस-यादिवशी दुर्गादेवीसमोर गोंधळ घातला जातो. या दिवशी दुर्गा देवीच्या किल्ल्यात जत्रेचे स्वरूप येते. आनंदोत्सव म्हणून दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत येथे पतंग उडविले जातात. लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्व या महोत्सवात सहभागी होतात. देवीची खणा-नारळानी ओटी भरली जाते.
माहेरवाशीणी येथे आपले नवस फेडण्यासाठी मोठया संख्येने येतात. सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यावर रात्री गोंधळाला डोंगरावर महाप्रसाद दिला जातो. सर्व गावकरी मंडळी या उत्सवात मोठया संख्येने सहभागी होतात. या दिवशी दुर्गादेवीच्या उत्सवात बक-यांची मुंडकी छाटली जातात. स्वातंत्र्य पूर्वकाळात या उत्सवात ब्रिटिशही सहभागी व्हायचे. विशेष म्हणजे आजही त्यांचा वाटा काढला जातो. त्यांना उत्सवातील हिस्सा बाजूला काढला जातो. पोलिसांना या उत्सवात मानाचे स्थान दिले जाते.
देवीचा गोंधळ घालण्याची परंपरा मोठी आहे. दुर्गादेवीच्या गोंधळात पंचक्रोशीतील सर्व गाव या गोंधळात सहभागी होतात. येथे होणारा पंतगोत्सव हा अनोखाच म्हणायला हवा. मुलांबरोबर आजी, आजोबाही या पतंगोत्सवात सहभागी होतात.
खारेपाटणबरोबर नडगिवे येथील गांगेश्वर, चिंचवली निनादेवी, कुरंगवणे विठू महाकाळी, वायंगणी आदिनाथ, पन्हाळे निनुदेवी, शेजवली निनादेवी या ठिकाणी नवरात्र आईचा जागर, भजने, कीर्तने होतात. मंदिरावर विद्युत रोषणाई केलेली असते. नवरात्र उत्सवाचे स्वरूप बदलत चालले असले तरी परंपरागत चालत आलेले हे उत्सव मोठया उत्साहात येथे चालू आहेत.
नवं करण्याची परंपरा
देवासमोर नवे करण्याची परंपरा आहे. यादिवशी शेतामध्ये पिकलेल्या धान्याची कणसे, भाताची केसरे, विविध रंगांची फुले घेऊन ती आंब्यांच्या पानामध्ये बांधून घराच्या, मंदिराच्या दरवाजासमोर लावली जातात. तसे वाहनांनासुद्धा बांधण्यात येतात.
नवरात्रोत्सवामध्ये दरम्यान शेतीमध्ये भाताचे, वरीचे, तिळाचे पीक येते. यावेळी शेतकरी आनंदी असतो. आपल्या शेतामध्ये चांगले पीक आले याचा शेतक-याला आनंद होत असतो. आलेल्या पिकावर आपले जीवन अवलंबून असते.
धन लक्ष्मीच्या पावलाने आपल्या घरात येते. त्यांचे पूजन करून नव्याच्या रूपाने घराच्या समोर दरवाजाला बांधून ठेवतात व आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी येऊन जीवन सुखीसमृद्धी बनावे, अशी देवीकडे प्रार्थना करतात.
सुमारे साडेचारशे वर्षापूर्वीपासूनची राजेशाही व सावंतवाडी संस्थानची परंपरा लाभलेल्या ओटवणे श्री देवी सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानाचा प्रसिद्ध वार्षिक दसरोत्सव व खंडेनवमी एकाच दिवशी साजरा होत आहे. या उत्सवाला जिल्हयातील प्रसिद्ध दसरोत्सव मानले जात असून या उत्सवात देवस्थानातील दैविक तरंगे सुवर्णअलंकार आणि भरजारी वस्त्रांनी सजविले जाते हे खास आकर्षण. ओटवणे वार्षिक दसरोत्सव म्हणजे सावंतवाडी संस्थानचा राजेशाही सण!
या उत्सवात या देवस्थानातील तरंगाना तसेच मूर्तीना सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह भरजरी वस्त्रांनी सजविण्याची परंपरा आहे. या देवस्थानाची कायकायी, पावणाई आणि रवळनाथ ही तीन तरंगे सोन्याची आहेत.
सावंतवाडी उपकोषागारात असलेली ही तरंगे, सोन्या-चांदीचे सर्व वस्त्रालंकार फक्त दस-यालाच गावात आणले जातात. हे सुवर्ण वैभव पाहण्यासाठी जिल्हयातील हजारो भाविक येत असतात. या दिवशी ओटवणे गावचे आराध्य दैवत श्री देव रवळनाथाला पूर्णत: सुवर्ण अलंकारांनी सजविले जाते. या दिवशी ग्रामदेवतेचे देखणे रूप नयनांना तृप्त करते. तसेच देवस्थानच्या तिन्ही तरंगांना सप्तपीतांबरीच्या वस्त्रांनी सजविले जाते.
श्री देव रवळनाथ हा देवसकीत अतिप्राचीन देव आहे. पेडणे, चंदगड व ओटवणे या प्रमुख देवस्थानांपैकी ओटवणे येथील रवळनाथाला पहिला मान दिला जातो. १६०० शतकापासून या मंदिराला सावंतवाडी संस्थानाचा वारसा लाभला आहे. पंचफणाच्या नागाच्या कृपाशीर्वादाने सावंतवाडी संस्थानाला गतवैभव प्राप्त झाले होते. पंचफणाच्या नागाचे स्थळ सध्याचे शेरवाळेवाडीतील ब्राह्मण स्थळ असून सावंतवाडी संस्थानाच्या माता सत्त्वशिलादेवी ब्राह्मण स्थळाची भेट घेतात.
ओटवणे रवळनाथाची मूर्ती ही स्वयंभू आहे. प्रथम समुद्र कासव, पाच फण्याचा नाग असून शिवलिंगावर रवळनाथ उभा आहे. सावंतवाडी संस्थानाची न्यायदेवता म्हणून रवळनाथाला संबोधले जाते. ज्या नागराजामुळे संस्थानाला गतवैभव प्राप्त झाले होते त्या नागाला तसेच कासवाला गावात मोठे महत्त्व आहे.
कासव किंवा नाग दिसल्यास येथील ग्रामस्थ त्याला नमस्कार करतात. तर नागराजाने आपल्या घरी रात्री वास्तव केल्यास वैभव प्राप्त होण्याचे लक्षण मानले जाते. ओटवणे श्री देव रवळनाथ लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. या जागृत देवस्थानामुळे गावाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पुरातन रवळनाथ मंदिरासह सावंतवाडी संस्थानाचा मूळ पुरुष असलेले राजे खेमसावंतांचे समाधीस्थळ ओटवणे तेरेखोल नदीच्या त्रिवेणी संगमावर पाहायला मिळते. या मंदिराची रचना भाविकांना मोहित करणारी आहे अशा प्रसिद्ध या दसरोत्सवात सुवर्ण अलंकाराचा साज देवस्थानातील मूर्तीना चढवला जात असल्याने तसेच तरंगांच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतात. येथे होणारा शिवलग्न सोहळा नेत्रदीपक असतो. असाच थाट साळशी संस्थानातही असतो.