रायगड जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ सालच्या ७० कोटी ६ लाख २० हजार रुपयांच्या अर्थसंकल्पात अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती चित्रा पाटील यांनी या अर्थसंकल्पात आपल्या बांधकाम विभागासाठी सर्वाधिक १५ कोटी ५० लाख एवढी भरीव तरतूद केली आहे.
अलिबाग – रायगड जिल्हा परिषदेच्या २०१६-१७ सालच्या ७० कोटी ६ लाख २० हजार रुपयांच्या अर्थसंकल्पात अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती चित्रा पाटील यांनी या अर्थसंकल्पात आपल्या बांधकाम विभागासाठी सर्वाधिक १५ कोटी ५० लाख एवढी भरीव तरतूद केली आहे. २३ मार्च रोजी ही विशेष अर्थसंकल्पसभा घेण्यात आली.
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली ना. ना. पाटील सभागृहात या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती चित्रा पाटील यांनी रायगड जिल्हा परिषदेचा सन २०१५-१६ सालचा १०४ कोटींचा अंतिम अर्थसंकल्प तर २०१६-१७ सालचा ७० कोटी ६ लाख २० हजार रुपयांचा मूळ महसुली अर्थसंकल्प सभागृहात मांडला. त्याला सभागृहाने मंजुरी दिली. यावेळी आपले म्हणणे ऐकून घेतले जात नसल्याचे सांगत विरोधकांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला. यंदाच्या अर्थसंकल्पात बांधकाम विभागासाठी सर्वाधिक १५ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .
यामध्ये प्रामुख्याने नवीन रस्ते, अपूर्ण कामे, इमारती, साकव, महिला व्यायामशाळांसाठी साहित्य पुरवणे, सभामंडप, व्यायामशाळा बांधणे या कामांचा समावेश आहे. अपंग कल्याणसाठी १ कोटी ९५ लाख अशी समाज कल्याण विभागासाठी एकूण १४ कोटींची तरतूद ठेवण्यात आली आहे. त्यात नियमित योजनांबरोबरच दुर्गम भागात रुग्णसेवेसाठी ४ ते ५ गावे मिळून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी २५ लाख रुपये इतका निधी राखून ठेवण्यात आला आहे. गतिमंदांसाठी तात्पुरते ‘डे केअर सेंटर्स’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या ४२ योजनांसाठी ३ कोटी, कृषी विभागासाठी ३ कोटी ५० लाख, पशुसंवर्धन विभागासाठी २ कोटी, महिला बालकल्याणसाठी ६ कोटी ५० लाख, आरोग्य विभागासाठी २ कोटी ५० लाख रुपये, शिक्षणसाठी ३ कोटी तर सामान्य प्रशासन विभागासाठी ८४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोद वैशाली पाटील यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
विरोधकांचा सभात्याग
सभेच्या सुरुवातीलाच अध्यक्ष सुरेश टोकरे हे अभिनंदन व दुखवटय़ाचे ठराव मांडत असताना विरोधी सदस्य बोलण्यासाठी उभे राहिले. ही सभा बेकायदा आहे. अनेक सभासदांना या सभेचा अजेंडा मिळाला नाही, असे ते सांगत होते. मात्र अध्यक्षांनी
त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. आपले म्हणणे ऐकून घेत नसल्याचे सांगून शिवसेना, भाजपाच्या सर्व सभासदांनी घोषणाबाजी करीत सभात्याग केला.