म्हाडाच्या ३१ मे रोजी काढण्यात येणा-या सोडतीतील बांधकाम पूर्ण असलेल्या सुमारे ३०७ घरांना येत्या सहा महिन्यांत भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळणार आहे.
मुंबई- म्हाडाच्या ३१ मे रोजी काढण्यात येणा-या १ हजार २४४ घरांच्या सोडतीतील बांधकाम पूर्ण असलेल्या सुमारे ३०७ घरांना येत्या सहा महिन्यांत भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळणार आहे. यामुळे सोडतीनंतर वर्षभरात लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.
मागाठाणे, दहिसर, पवई, प्रतीक्षानगर, तुर्भे-मंडाळा, मालवणी-मालाड, शिंपोली, विनोबा भावेनगर व प्रतीक्षानगर येथील म्हाडाची अल्प, अत्यल्प, मध्यम व उच्च या उत्पन्न गटातील सुमारे ३०७ घरे आधीपासून बांधून तयार आहेत. त्यामुळे म्हाडाने या घरांसाठी भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
येत्या सहा महिन्यांत या घरांना भोगवटा प्रमाणपत्र मिळू शकते. यापूर्वीच्या सोडतीतील घरे ओसीविना तब्बल अडीच ते तीन वर्षे रखडली आहेत. यंदाच्या सोडतीतही बांधकाम तयार नसलेल्या घरांचा समावेश आहे. त्यामुळे घरे बांधण्यासाठी लागणारा वेळ आणि ती बांधून पूर्ण झाल्यावर त्याची ओसी मिळवण्यास लागणारा कालावधी लक्षात घेता लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळण्यास सुमारे अडीच ते तीन वर्षे लागणार आहेत.
पवईच्या महागड्या घरांकडे पाठ
म्हाडाच्या सोडतीला चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांत ४ हजार ४४३ अर्ज भरण्यात आले आहेत. तर ५२ जणांनी ऑनलाइन अनामत रक्कम भरली आहे. यात मागाठाणे व प्रतीक्षानगर येथील अत्यल्प गटातील घरांसाठी सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. तर पवई-तुंगा येथील महागडय़ा घरांकडे मात्र मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे. मागाठाणे येतील अत्यल्प उत्पन्न गटातील ६२ घरांसाठी सर्वाधिक ५२१ अर्ज तर त्या खालोखाल प्रतीक्षानगर (बी) येथील २४ घरांसाठी ३०० अर्ज आले आहेत. तर पवई-तुंगा येथील उच्च उत्पन्न गटातील ४८० घरांसाठी २६१ अर्ज व तुंगामधीलच मध्यम उत्पन्न गटातील २५२ घरांसाठी २७८ अर्ज आले आहेत. सर्वसामान्यांसाठी असलेल्या कमी घरांसाठी तीन दिवसांत जास्त अर्ज आले आहेत. तर श्रीमंतांसाठी जास्त संख्या असलेल्या घरांसाठी मात्र कमी अर्ज आले आहेत.