भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने जागतिक स्पर्धेतील रौप्यपदकाचे सर्वाधिक श्रेय तिचे वैयक्तिक (पर्सनल) प्रशिक्षक विमल कुमार यांना दिले. विमल सरांना यशाचे श्रेय दिल्याने वाईट वाटण्याचे कारण नाही. मात्र त्यांचे गोडवे गाताना सायनाने राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केल्याचे जाणवते. सायनाकडून तशी अपेक्षा नव्हती.
गेल्या दशकभरात आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्तरावर भारताचे वर्चस्व निर्माण करण्यात हैदराबादवासी सायना नेहवालचे मोठे योगदान आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी तसेच जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी ती भारताची पहिली बॅडमिंटनपटू आहे. अनेक ओपन आणि सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धा तिने जिंकल्यात.
प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदाने हुलकावणी दिली तरी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ तिने संपवला. सहाव्या प्रयत्नात सायनाला सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवण्यात यश आले. यंदाचे रौप्यपदक ही तिच्यासह भारताच्या बॅडमिंटनपटूची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. पुन्हा सूर गवसल्याने सायनासह तिचे चाहते सुखावलेत. पुढील वर्षी होणारे रिओ ऑलिंपिक पाहता जागतिक स्पर्धेतील कामगिरी तिचा आत्मविश्वास उंचावणारी ठरेल. मात्र सायनाने हे यश एकतर्फी घेतले आहे.
स्वत:सह प्रशिक्षक विमल कुमार यांनाच पदकाचे ‘क्रेडिट’ दिले आहे. सायनाच्या बोलण्यात आणि वागण्यात राष्ट्रीय प्रशिक्षक आणि माजी महान बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद यांच्या प्रति आकस जाणवतो.
जागतिक स्पर्धेनंतर मायदेशात परतलेल्या सायनाने विमल कुमारांची तोंड भरभरून स्तुती केली. ‘‘सातत्याच्या अपयशानंतर गेल्या वर्षी बॅडमिंटन सोडून देण्याचा विचार माझ्या मनात आला होता. मात्र त्यानंतर हैदराबादहून बंगळूरुला स्थायिक होण्याचा माझा निर्णय योग्य ठरला. विमल सरांनी माझ्यात विजयाचा आत्मविश्वास जाणवला. मी चँपियन्स बनू शकते, हे मला पटवून दिले. मला अधिकाधिक वेळ दिला. कोर्टवर स्वत:हून उपस्थित राहताना माझे कच्चे दुवे हेरले. त्यानंतर माझ्या चुका सुधारून घेतल्या. माझ्या तंदुरुस्तीवरही (फिटनेस) त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्यामुळे मी यशस्वी पुनरागमन केले,’’ असे सायनाने म्हटले. सायनाने विमल सरांची केलेली प्रशंसावजा स्तुती तिच्या दृष्टीने योग्य असली तरी त्याच्यातून गोपीचंदना खिजवण्याचा तिने प्रयत्न केलाय. गोपीचंद यांच्यापेक्षा विमल कुमार कितीतरी अधिक प्रतिभावंत आणि लायक प्रशिक्षक आहेत, हे पटवून देण्याचा तिचा प्रयत्न आहे.
२०१४ वर्ष सायनासाठी वाईट गेले. काही केल्या तिचा खेळ उंचावत नव्हता. अव्वल बॅडमिंटनपटू असूनही गोपीचंद आपल्याकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. परिणामी कामगिरी खालावली आणि जागतिक रँकिंग घसरले, असा (गैर) समज तिने करवून घेतला. त्यानंतर सायनाने हैदराबादहून बंगळूरुला स्थायिक होण्यासह माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी जागतिक स्पर्धेदरम्यान आपल्या निर्णयाबाबत तिने गोपीचंद यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सायनाला बंगळूरुला जाण्यास खुल्या दिलाने परवानगी दिली. गेले वर्षभर सायना ही विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतेय. त्यांच्या ‘टिप्स’ तिच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्यात. चायना आणि इंडिया ओपनसह ऑल इंग्लंड बॅडमिंटन आणि आता जागतिक स्पर्धेची ‘फायनल’ तसेच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी घेतलेली झेप पाहता सायनाला आकाश ठेंगणे झाले आहे. आपल्याला लाभलेले आजवरचे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक अशी तिची विमल सरांप्रति भावना झाली आहे. मात्र सायना तिचा सोनेरी भूतकाळ विसरतेय. जवळपास एका तपापूर्वी गोपीचंद अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर गोपीचंद यांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली. तिच्याकडे अधिक लक्ष दिले.
गोपीचंद यांनी तिला स्वत:ची मुलगी मानली. कोर्टवर तिच्याकडून कसून सराव करवून घेतला. तिच्या आहाराची आणि तंदुरुस्तीची काळजी घेतली. चीन आणि इंडोनेशियाच्या बॅडमिंटनपटूंवर वर्चस्व मिळवण्याचे कसब त्यांनी तिला शिकवले. गोपीसरांच्या मार्गदर्शनाखाली सायनाने २०१२ लंडन ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीत कांस्यपदक मिळवले. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी ती भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली. आपल्याला शक्य झाले नाही ते ‘लाडकी शिष्या’ सायनाने करून दाखवल्याने गोपीचंद यांना मनस्वी खूप आनंद झाला. जागतिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवल्याबद्दल समस्त भारतीयांना तिचा अभिमान वाटतो. मात्र विमल सरांची केलेली स्तुती अतिशयोक्ती वाटते.
विमल कुमार यांच्याबद्दल कुणाला आकस नाही. ते माजी राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. मात्र सध्या त्यांना सायनाचे वैयक्तिक प्रशिक्षक एवढेच काम आहे. विद्यमान राष्ट्रीय प्रशिक्षक या नात्याने पुलेला गोपीचंद यांना शेकडो बॅडमिंटनपटूंकडे लक्ष द्यावे लागते. शिवाय हैदराबादमध्ये त्यांची स्वत:ची अॅकॅडमी आहे. मात्र स्वत:ची अॅकॅडमी असूनही गोपीचंदनी आपल्या राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केलेली नाही. म्हणून ते ‘ग्रेट’ आहेत. त्यांची कारकीर्द प्रचंड खडतर तरीही उल्लेखनीय आहे.
कारकिर्दीच्या दुस-या ‘इनिंग’मध्ये गोपीचंद यांनी होतकरू आणि प्रतिभावंत बॅडमिंटनपटू बनवण्याचा विडा उचलला आहे. सायनासह पारुपल्ली कश्यप, पी. व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत, आरएमव्ही गुरुसाईदत्त, अरुंधती पानतावणे, अरुण विष्णू आदी अनेक सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू त्यांनी घडवलेत. सायनाला जागतिक स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी सहा वर्षे वाट पाहावी लागली. मात्र तिच्यापेक्षा कमी वयाची असूनही सिंधूने एक-दोन नव्हे तर सलग दोनदा कांस्यपदक मिळवण्याची करामत साधली आहे. अव्वल बॅडमिंटनपटू असल्याने गोपीचंद यांनी माझ्याकडेच अधिक लक्ष द्यावे, ही सायनाची ओरड चुकीची आहे. त्यांच्यासाठी सर्व शिष्य समान आहेत. त्यांना अनेक सायना घडवायच्या आहेत. प्रत्येक क्रीडापटूला वैयक्तिक प्रशिक्षक नेमणे शक्य नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय यश आणि चांगल्या मिळकतीमुळे सायनाला ‘पर्सनल’ प्रशिक्षक नेमणे, शक्य झाले आहे.
गोपीचंद यांना सोडून अन्य प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याची तसेच गोपीसरांवर तोंडसुख घेण्याची सायनाची ही पहिली वेळ नाही. २०११ मध्ये तिने भास्कर बाबू यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवले. मात्र तीन महिन्यांनंतर पुन्हा गोपीचंद यांच्याकडे परतली. आपल्या निर्णयाबद्दल खेद व्यक्त करताना ऑलिंपिक पदक मिळवून देण्यात मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल त्यावेळी तिने गोपीसरांची प्रशंसा केली. विमल सरांसोबतचा सायनाचा प्रवास एक वर्षाचा झालाय. मात्र तिची खरी अडचण पुढे आहे.२०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये सायनाला राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. त्यावेळी तिच्यासोबत जाण्यास विमल कुमार यांना बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) परवानगी दिली नाही तर सायना काय करेल?
आपल्या पहिल्या प्रशिक्षकांप्रति किती असीम निष्ठा असावी, हे विक्रमवीर सचिन तेंडुलकरकडून शिकावे. क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी त्याचे गुरू रमाकांत आचरेकर यांना विसरलेला नाही. मात्र सायना काही वर्षातच गोपीचंद यांना विसरली. भारतातील क्रीडापटूंसाठी सायना आदर्श आहे. बॅडमिंटनमध्ये कारकीर्द करणाऱ्या प्रत्येक मुलीला सायना बनायची इच्छा आहे. खेळ बहरतोय, ही सायनासह भारताच्या बॅडमिंटनसाठी आनंदाची बाब आहे. मात्र वैयक्तिक प्रशिक्षकांवर स्तुतीसुमने उधळताना राष्ट्रीय प्रशिक्षकांना लक्ष्य केल्यामुळे तिने सहका-यांसह अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे.