बचत गटांचे महत्त्व महिलांना पटावे, यातून रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी ‘प्रहार स्त्री प्रेरणा’तर्फे ‘बचतीचा वटवृक्ष सुखाचे होईल आयुष्य’ या कार्यक्रमाचे दादर, हिंदमाता येथील आहुजा सभागृहात शनिवार १४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई- बचत गटांचे महत्त्व महिलांना पटावे, यातून रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी ‘प्रहार स्त्री प्रेरणा’तर्फे ‘बचतीचा वटवृक्ष सुखाचे होईल आयुष्य’ या कार्यक्रमाचे दादर, हिंदमाता येथील आहुजा सभागृहात शनिवार १४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर वसई-विरार महापालिकेल्या उपायुक्त संगिता धायगुडे व बचतगट तज्ज्ञ किरण बडे या मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ‘प्रहार स्त्री प्रेरणा’ संस्थेच्या सभासदांना आमंत्रित करण्यात आले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी आश्वासक पाऊल म्हणून १४ जानेवारी रोजी ‘प्रहार स्त्री प्रेरणा संस्थे’ची स्थापना झाली. त्या अंतर्गत महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोजगारनिर्मितीला चालना देणारा ‘बचतीचा वटवृक्ष सुखाचे होईल आयुष्य’ हा कार्यक्रम सभासद महिलांसाठी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे बचत गटांचे महत्त्व, निर्मिती, त्याअंतर्गत येणारे उद्योग आणि उत्पादन विक्री कशा पद्धतीने करावी, याविषयीचे तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे या मागील अनेक वर्षापासून जिजाऊंच्या माध्यमातून अनेक बचत गट चालवत आहेत. त्यातून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी त्यांनी मिळवून दिल्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या महिलांशी थेट संवाद साधणार आहे. तर बचत गटांचे महत्त्व आणि बचत गटांचे कार्य यावर वसई-विरार महापालिके च्या उपआयुक्त संगिता धायगुडे मार्गदर्शन करणार आहेत. बचत गटांमार्फत उभारण्यात येणारे उद्योग व त्यातून तयार उत्पादन विक्रीबाबत किरण बडे मार्गदर्शन करतील. त्यामुळे ‘प्रहार स्त्री प्रेरणा’च्या अधिकाअधिक महिला सदस्यांनी या संधीचा लाभ घेऊन या उपक्रमात सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी प्रहार स्त्री प्रेरणा समन्वयक तृप्ती राणे यांच्याशी ६१२३९९०० या क्रमांकावर संपर्क साधावा.