जास्तीत जास्त उद्योजकांना आकर्षति करण्यासाठी बंदरे, जहाज बांधणी व वाहतूक क्षेत्रातील लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्यास प्राधान्य दिल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मुंबई – जास्तीत जास्त उद्योजकांना आकर्षति करण्यासाठी बंदरे, जहाज बांधणी व वाहतूक क्षेत्रातील लॉजिस्टिक कॉस्ट कमी करण्यास प्राधान्य दिल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ‘मेक इन इंडिया सप्ताहा’त बंदरे आणि जहाज या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. बंदरांना एकमेकांशी जोडण्यासाठी रेल्वेचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. या संदर्भातील कामे सुरू झाली आहेत. यासाठी पोर्ट रेल कनेक्टिव्हिटी कॉर्पोरेशन स्थापन करण्यात आले आहे.
रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासाठी इच्छुक कंपन्यांनी सहभाग घेतला असून आत्तापर्यंत चार कोटींच्या निविदा प्राप्त झाल्या आहेत. पोर्ट रेल कनेक्टिव्हिटीचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विविध ठिकाणी कार्यालये सुरू करण्यात आली असून वडाळा येथे कार्यालय सुरूही झाले आहे. तसेच बंदरांना रेल्वेबरोबर राष्ट्रीय महामार्गाशीही जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ४, ६ आणि ८ लेन आणि एक्स्प्रेस हायवे अशा रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमातून वाहतूक प्रक्रिया सोपी होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उद्योग, परवडणारी घरे आदी क्षेत्रातील १८ सामंजस्य करार
‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या पाचव्या दिवशी स्मार्ट सिटी, हवाई वाहतूक, किरकोळ उद्योग, लघु व मध्यम उद्योग, परवडणारी घरे आदी क्षेत्रातील १८ सामंजस्य करार करण्यात आले. आज झालेले १८ व यापूर्वी केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यात ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. खालापूर स्मार्ट सिटीसाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने करार करण्यात आला असून आधुनिक स्मार्ट शहर संकल्पनेच्या निर्मितीसाठी ११ गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणा-या खालापूर नगर पंचायत, कलोटे मोकाशी ग्राम पंचायत, नादोडे ग्रामपंचायत स्वेच्छेने पुढाकार घेतला आहे. याशिवाय सिडकोतर्फे आज नना प्रकल्पातील विकासकांसोबतही ११ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली.