जर तुम्ही बँक खात्यातून मोठी रक्कम काढताय किंवा मोठ्या रक्कमेचे व्यवहार करताय तर निवडणूक आयोग आणि प्राप्तिकर खात्याच्या अधिका-यांच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते.
मुंबई – निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांच्या बँक खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार होत असतील अथवा मोठी रक्कम खात्यातून काढली जात असेल तर या रकमेबाबतची संपूर्ण माहिती देणे उमेदवाराला गरजेचे असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये काळा पैशांचा व्यवहार केला होऊ नये यासाठी भारतीय निवडणूक आयोग उमेदवारांच्या बँक खात्यातून होणारी मोठ्या रकमेच्या व्यवहारावर लक्ष्य ठेवण्यासाठी नवीन यंत्रणा सुरु केली आहे. तसेच रक्कम अथवा सोन्याच्या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारची संशय स्थिती दिसून येत असले तर त्याबद्दलची माहिती विविध संस्थांकडून आयोगाला दिली जाणार आहे.
दहा लाखाहून अधिक रक्कम एखाद्या उमेदवाराच्या खात्यातून काढली जात असल्यास अथवा उमेदवाराच्या नातेवाईकाकडून अशा प्रकारचे व्यवहार होत असतील तर त्यावर लक्ष ठेवण्यात यावे अशी आयोगाकडून सर्व बँकांना सूचना देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार, मुंबईतील प्राप्तिकर खात्यामध्ये यासंबधीची माहिती देण्यासाठी कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच रकमेच्या व्यवहारासंबधीची संशयास्पद माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबरही देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात कोणताही उमेदवार ७० लाखाहून अधिक निवडणुकीचा खर्च करु शकत नाही. या आधी ही खर्च मर्यादा ४० लाख होती. तसेच गोवासारख्या लहान राज्यातही निवडणूक खर्च मर्यादा २२ लाखावरुन ५४ लाख इतकी करण्यात आली आहे.