ग्रामीण भागात . एक फोन केल्यानंतर काही वेळातच रुग्णाला लागणारे रक्त संबंधित रुग्णालयात उपलब्ध होणार आहे.
मुंबई – ग्रामीण भागात कधी रक्त उपलब्ध नाही, रक्त उपलब्ध झाले तर ने-आण करण्यासाठी वाहन नाही, अशा अनेक समस्या असतात. या सगळ्या अडचणींतून आता ग्रामीण भागातील जनतेची लवकर सुटका होणार आहे. एक फोन केल्यानंतर काही वेळातच रुग्णाला लागणारे रक्त संबंधित रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारची देशातील ही पहिलीच योजना (पायलेट प्रोजेक्ट) सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांत दिवाळीनंतर सुरू होते आहे.
आजही ग्रामीण भागात रक्तदानाचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी रक्तपेढ्यांतून संबंधित गटाचे रक्त अनेकदा चटकन उपलब्ध होत नाही. विशेषत: अपघातग्रस्तांना रात्री गरज पडल्यास खासगी रक्तपेढय़ांमध्ये जावे लागते. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठीच ही योजना आहे. याबाबत आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. संजय जाधव यांची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळय़ात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोचे रुग्ण आढळतात. त्यांना रक्तपेशी, रक्तघटकांची गरज असते. त्यांना या योजनेचा फायदा होऊ शकेल, या हेतूने सिंधुदुर्ग व साताऱ्याची या योजनेसाठी निवड करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत १०२ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनवर सरकारी रुग्णालये आणि काही नर्सिग होममध्ये उपचार घेणा-या रुग्णांना फक्त एक फोन करावा लागेल. नंतर रक्तपेढीतील कर्मचारी हवे त्या गटाचे रक्त घेऊन रुग्णालयात येईल. रक्ताच्या वाहतुकीसाठी आरोग्यविभाग दुचाकी गाडय़ा भाडय़ाने घेणार आहे. या गाडय़ांना एक छोटी शीतपेटी लावून ४ अंश सेल्सिअस तापमानात ठेवून रक्त नेण्यात येईल, असे डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. या उपक्रमासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असून, दिवाळीनंतर हा उपक्रम सुरू होणार आहे. या उपक्रमासाठी वर्षाला ७-८ लाख रुपये खर्च येणार आहे. मिळणारा प्रतिसाद पाहून नंतर ही सेवा राज्यभर नेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
योजनेतील ठळक मुद्दे
रक्त रुग्ण असेल तिथपर्यंत विनाशुल्क पोहोचवणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरेल
कमीत कमी अर्ध्या तासात रक्त गरजू रुग्णापर्यंत नेले जाईल
ही सुविधा रुग्णांसाठी २४ तास उपलब्ध असेल