चित्रपटसृष्टी काही अलिखित नियम आणि दृढ समजुतींवर चालते. स्टार्स प्रत्येक वेळी प्रेक्षकांना प्रेक्षागृहाकडे खेचून आणतीलच, याची शाश्वती नसते. असंख्य चित्रपट असे आहेत, ज्यात नावाजलेले स्टार्स नाहीत, तरीही ते केवळ आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झालेले आहेत.
हिंदी चित्रपट बव्हंशी फेस व्हॅल्यूवर जगतात. म्हणजे चित्रपटात आघाडीचा स्टार असला की, प्रेक्षकांना सुरुवातीला थिएटरकडे खेचून आणण्याचं काम निम्म सोपं होतं. त्यानंतर चित्रपटात दम असेल तर तो बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडतो आणि चित्रपट भुक्कड असेल तर दुस-याच दिवशी उताणा होतो (वैधानिक इशारा : सलमानच्या चित्रपटांना हा नियम लागू होत नाही). त्यामुळे अगदी ऑफ बीट विषयावरील सिनेमातही एखादा चांगला नाववाला, क्राउडपुलर स्टार घेण्यासाठी निर्माता धडपडत असतो. तेवढाच धोका कमी आणि गुंतवणुकीच्या परताव्याची खात्री वाढते. ‘चांदनी बार’ आणि ‘पेज थ्री’सारखे हटके चित्रपट स्टार्सविना गाजल्यानंतरही मधुर भांडारकरला आपल्या पुढल्या चित्रपटांसाठी अक्षयकुमार, अजय देवगण, करीना कपूर या स्टार्सची गरज भासते. ‘लगान’ची जबरदस्त पुण्याई पाठीशी असूनही आशुतोष गोवारीकरला ‘स्वदेस’साठी शाहरुख खान नावाचं खणखणीत नाणं लागतं (ते नाणं वाजलंच नाही, हा भाग सोडा).
चित्रपटसृष्टी ही काही अलिखित नियम आणि दृढ समजुतींवर चालते. स्टार्स प्रत्येक वेळी प्रेक्षकांना प्रेक्षागृहाकडे खेचून आणतीलच, याची शाश्वती नसते. असंख्य चित्रपट असे आहेत, ज्यात नावाजलेले स्टार्स नाहीत, तरीही ते केवळ आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झालेले आहेत. पण ‘नियमाला अपवाद’ म्हणून इंडस्ट्री अशा चित्रपटांचं यश फारसं मनावर घेत नाही. याच न्यायाने, एखादा स्टारवाला चित्रपट जोरदार आपटला तरी पुन्हा ‘नियमाला अपवाद’ म्हणून अशा चित्रपटाचं अपयशही मनावर घेतलं जात नाही. त्यामुळेच, गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘जोकर’च्या अपयशाचा इंडस्ट्रीला धक्का बसला असला तरी त्याच्या अपयशाने इंडस्ट्रीच्या चालीरिती बदलणार नाहीत.
‘जोकर’चं अपयश साधंसुधं नाही. ते इंडस्ट्रीला हलवून टाकणारं नसलं तरी बुचकळ्यात पाडणारं नक्कीच आहे. बुचकळ्यात अशासाठी की, अक्षयकुमारसारखा क्राउडपुलर असतानाही या चित्रपटाला साधं चांगलं ओपनिंगही मिळू नये, हा प्रश्न इंडस्ट्रीतल्या धुरीणांना सतावू लागला आहे. सिनेमा चांगला आहे की, वाईट हे ठरवण्यासाठी प्रेक्षकांनी तो किमान बघायला तरी हवा. आणि ‘जोकर’सारखा स्टारवाला, भरपूर गाजावाजा झालेला चित्रपट पहिल्या वीकएंडला (शुक्रवार ते रविवार) निव्वळ हाइप आणि अपेक्षांच्या जोरावर तगडा धंदा करील, अशी अपेक्षा असते. ‘जोकर’च्या बाबतीत ती अधिकच होती, कारण ‘जोकर’च्या आधी अक्षयचा ‘रावडी राठोड’ तुफान यशस्वी झाला होता. इतकंच नव्हे, तर पहिल्या वीकएंडला सर्वाधिक गल्ला जमवण्याचा विक्रमही त्याने केला होता. ‘रावडी राठोड’चीच यशस्वी जोडी (अक्षय-सोनाक्षी) ‘जोकर’मध्ये होती. त्यामुळे या चित्रपटाला चांगलं ओपनिंग मिळेल, अशी अपेक्षाच नव्हे तर खात्रीच होती.
त्यामुळेच वीकएंडला अवघ्या 15 कोटींचा ठोक गल्ला गोळा करून या चित्रपटाने सर्वाना बुचकळ्यात पाडलं. चित्रपट अपयशी झाल्यानंतर त्याची अनेक कारणं सांगितली जातात. चित्रपटाची कथा भरकटली होती, पटकथा वाईट होती, गाणीच गाजली नव्हती, जोडी विजोड होती, दिग्दर्शन ढिसाळ होतं, अशा प्रकारच्या चित्रपटाला सध्या मार्केटच नाही.. एक ना दोन, असंख्य कारणं जन्म घेतात. या सगळ्याच्या शेवटी ‘चित्रपट वाईट होता’ एवढं एकच कारण खरं असतं. पण चित्रपट वाईट आहे, हे बघितल्यावर कळेल ना? आणि प्रेक्षकांनी चित्रपट बघितल्यानंतर त्याला वाईट ठरवलाय, हे बॉक्स ऑफिसवरच्या आकड्यांवरून स्पष्ट होईलच की! पण अनेकदा तसं होत नाही.
प्रेक्षक इतके हुशार असतात की, पहिला प्रोमो किंवा अलीकडच्या पद्धतीनुसार टीझर प्रदर्शित झाल्या झाल्या त्यांना त्या चित्रपटाविषयी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह व्हाइब्ज मिळतात आणि त्याच वेळी हा चित्रपट आपण पाहायचा की नाही, याची खूणगाठ ते बांधून टाकतात. आणि 100 पैकी 99.99 वेळा त्यांचा निर्णय अचूक निघतो. ‘जोकर’चंच उदाहरण घ्या ना! या चित्रपटाच्या अपयशाची आता असंख्य कारणं सांगितली जातील. अक्षयकुमारने चित्रपटाचं प्रमोशनच केलं नाही, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश गेला, गाणी गाजली नाहीत, सायन्स फिक्शन-एलियन्स वगैरे असलेले चित्रपट आपल्याकडे चालत नाहीत.. अपयशाला हजार कारणं असतात. पण प्रेक्षकांनी चित्रपट बघायच्या आधीच तो वाईट आहे, हे ओळखण्याचा चाणाक्षपणा दाखवला होता, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
त्यामुळेच आमिरसारखा सुपरस्टार असो, सलमानसारखा यशाचा हुकमी एक्का असो किंवा अगदी नवोदित दिग्दर्शक असो, शुक्रवारच्या या ऑडियन्स पॉवरला ते जबरदस्त टरकून असतात. ही ऑडियन्स पॉवर कधी कधी अगदी नव्या कलाकारांच्या किंवा फारशा ग्लॅमर नसलेल्या पण चांगलं काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कलाकारांच्या मदतीला येते. ‘भेजा फ्राय’, ‘मिथ्या’, ‘देव डी’, ‘उडान’, ‘तेरे बिन लादेन’ अशी याची असंख्य उदाहरणं आहेत. पण एखादा ‘शिरीन-फरहाद की निकल पडी’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतो आणि या व्यवसायाचं इंगित आपल्यालाच कळलंय, अशा थाटात वावरणारे लोक पुन्हा ‘स्टार्सना पर्याय नाही’ म्हणायला मोकळे होतात. पण प्रेक्षकांना खेचून आणताना या ‘फेसव्हॅल्यू’ असलेल्या स्टार्सच्या तोंडालाही ‘फेस’ येतो, हे ‘जोकर’च्या अपयशाने सिद्ध व्हायला हरकत नाही.