वसई-विरारमध्ये रस्त्यावर तसेच मिळेल त्या जागेवर फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. फेरीवाल्यांनी विविध संघटना राजकीय कार्यकर्ते यांच्या पाठबळावर वैधमापनाच्या ऐवजी दगड ठेवून ग्राहकांची खुलेआम लूट चालवली आहे.
नालासोपारा- वसई-विरारमध्ये रस्त्यावर तसेच मिळेल त्या जागेवर फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. फेरीवाल्यांनी विविध संघटना राजकीय कार्यकर्ते यांच्या पाठबळावर वैधमापनाच्या ऐवजी दगड ठेवून ग्राहकांची खुलेआम लूट चालवली आहे. याकडे वैधमापन अधिकारी मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
नालासोपारा पूर्वेकडील गालानगरमध्ये शेकडो फेरीवाले रस्त्यावर बसतात. हे फेरीवाले वजनाऐवजी दगड ठेवून वजन करून भाजी विक्री करतात. प्रत्येक वजन काटय़ाचे वैधमापन अधिका-यांकडून सील प्रमाणबद्ध केले जाते. मात्र वैधमापन वसई तालुक्यात अस्तित्वात आहे की नाही याची शंका उपस्थित केली जात आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीत पालिकेने ऑगस्ट १६ ते ३१ मार्च १७ मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण केले त्यात स्थिर व अस्थिर मिळून १६००० फेरीवाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. फेरीवाल्यांकडून अनेकवेळा महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर हल्ले करून कारवाई थांबवण्यासाठी पालिकेच्या प्रकल्प अधिका-यांवर कारवाई करू नये या साठी त्यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात ५ किलो सफरचंद चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्याला काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्धीही दिली. त्यामुळे त्या सफरचंदांची चर्चा राज्यभरात झाली नेमकी ती सफरचंद सोन्याची होती की चांदीची असा सवाल सामान्य नागरिक विचारात आहेत. एकीकडे आपल्याला मोकळे रस्ते हवेत मग अशा अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई नको का करायला? कोणाला तरी हाताशी धरून अधिका-यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणे कितपत योग्य आहे.
गालानगर येथे संध्याकाळी संपूर्ण रस्ता माणसांनी फुलून जातो. हा रस्ता आहे की भाजी मार्केट हेच समजत नाही. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी काही लोक फेरीवाल्याकडून हफ्ता वसूल करत असल्याचे बोलले जात आहे. महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्शल स्कोड नेमले आहेत. मात्र ते पावती फाडण्यापलीकडे काहीच करत नसल्याचा आरोप होत आहे. पालिका हद्दीत अनेक अनधिकृत फेरीवाले आहेत. मात्र अधिका-यांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याने कोणीही कारवाई करण्यास धजावत नाही.