हल्ली प्रत्येक जण झटपट पैसे कसे कमावता येतील याचा शोध घेत असतो. याच मानसिकतेचा फायदा कंपन्या घेतात आणि स्वत:चे उखळ पांढरे करून घेतात. सारासार विवेकबुद्धी न वापरणे आणि झटपट श्रीमंतीच्या मोहात पडणे, यामुळे आपली अवस्था मात्र तेलही गेले, तूपही गेले आणि हाती राहिले धुपाटणे अशी होते.
परवा ऑफिसमध्ये लंचटाईमला एक मैत्रीण आम्हा सर्वाना एका कंपनीच्या बहुस्तरीय विक्री योजनेबद्दल (एमएलएम-मल्टिलेवल मार्केटिंग) माहिती सांगत होती. ती नुकतीच त्या कंपनीची सभासद बनली होती. कंपनीच्या विविध उत्पादकांनी थेट विक्री व आपल्याखालील साखळीत अजून सभासद बनवून कसा प्रचंड नफा कमावता येतो याचे मनाला भुरळ पाडणारे सुंदर चित्र ती उभे करत होती. ‘अगं घरबसल्या कामे करून तुम्ही या योजनेद्वारे लाखो रुपये कमवू शकता. मी तर ठरवले आहे की एकदा का यात माझा जम बसला की ९ ते ५ची नोकरी सोडूनच द्यायची’.
हे सगळे ती सांगत असताना मला मात्र नुकत्याच वर्तमानपत्रात आलेल्या अशाच एका कंपनीच्या (क्यू नेट) आर्थिक घोटाळ्याची बातमी आठवली. बहुस्तरीय विक्री योजना सुरू करणा-या बहुसंख्य कंपन्यांनी माणसाची आर्थिक परिस्थिती व मानसिकता याचा पुरेपूर अभ्यास केलेला असतो.
मनाला भुरळ पाडणा-या आकर्षक योजना, समोरच्याला आपल्या जाळ्यात ओढून घेणारे संभाषण चातुर्य, विविध प्रलोभने, फसव्या जाहिराती याद्वारे उत्पादनांची विक्री किंवा सभासद बनवणारी मोठयात मोठी मानवी साखळी निर्मिती हे उद्दिष्टय़े असते. या कंपन्यांचे घोषवाक्य असते. ‘जितकी जास्त विक्री तितका अधिक नफा’. क्यू नेट कंपनीच्या खटल्यावर काम करणा-या अॅड. मृदुला भाटकर म्हणतात की, बहुस्तरीय विक्री योजना म्हणजे लोकांना मूर्ख बनवा आणि त्यांना दुस-यांना मूर्ख बनवायला शिकवा.
सोन्याचा मुलामा दिलेल्या बेगडी दागिन्याप्रमाणे असणारी तुमची योजना लोकांच्या गळी उतरवा आणि लाखो कमवा. बहुस्तरीय विक्री योजना या दोन प्रकारच्या असतात. पहिल्या प्रकारामध्ये कंपनीची स्वत:ची बहुविध उत्पादने (जशी सौंदर्यप्रसाधने, वजन कमी करायची उत्पादने, पोषक आहार, नित्योपयोगाच्या विविध वस्तू, कधी कधी तर असाध्य रोग बरा करण्याची दावा करणारी जादुई औषधे वगरे) असतात.
कंपनी नेहमीच्या विक्री तंत्राचा अवलंब न करता सभासदांची साखळी निर्माण करून त्यांच्याद्वारे थेट विक्री करते. सभासद होणा-या व्यक्तीला ही उत्पादने साखळीबाहेरील लोकांना विकून नफा कमवता येतो तसेच साखळीत नवीन सभासद बनवून त्यांनी केलेल्या विक्रीमधूनही कमिशन मिळते. ही योजना कायद्याने अधिकृत या सदरात मोडते. तर दुस-या प्रकारच्या योजनांना ‘पिरॅमिड’योजना असे म्हणतात. यात तुम्हाला केवळ सभासद बनवायचे असतात.
जितके जास्त सभासद बनतात तितके अधिक कमिशन मिळते. या योजनांमध्ये सभासद बनण्यासाठी प्रवेश फी म्हणून मोठी रक्कम आकारली जाते किंवा कमी किमतीच्या वस्तू अधिक मूल्य देऊन विकत घेण्याची सक्ती केली जाते.
कंपनीची उत्पादने ही केवळ नावालाच असल्याने नवीन सभासदाच्या प्रवेश फीमधून पहिल्या सभासदाचे कमिशन/नफा दिला जातो. म्हणून अशा योजना आर्थिक फसवणूक या सदरात मोडतात. योजनेचा पाया ‘नवीन सभासद बनवा आणि पैसे कमवा’ असा असल्यामुळे अशा योजना जास्त काळ तग धरू शकत नाहीत.
कायद्यानेसुध्दा अशा योजना अवैध असतात. गेल्या दहा-पंधरा वर्षात अशा कंपन्यांचा सुळसुळाट झालेला दिसून येतो आहे. या बहुसंख्य कंपन्यांचे सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाईन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होतात. त्यामुळे पिरॅमिडच्या खालच्या स्तरातील जे सभासद असतात त्यांना तक्रार निवारणासाठी वरच्या स्तरातील घटकांशी (कंपनी मुख्य अधिकारी, व्यवस्थापक) संपर्कच साधता येत नाही. कमिशनची रक्कम ऑनलाईन दिसते पण ती सभासदाच्या खात्यात प्रत्यक्ष कधी जमाच होत नाही. कंपनीची उत्पादने निकृष्ट दर्जा व अधिक किंमत यामुळे विकलीच जात नाहीत.
या बहुसंख्य कंपन्यांचे मूळ हे परदेशी असल्याने इंटरनेटवारे हे लाखो रुपये परस्पर परदेशी बँक खात्यांमध्ये जमा केले जातात आणि लाखो रुपयांच अपहार होतो. लोकांच्या आर्थिक फसवणुकीबरोबरच देशातील करोडो रुपये अवैध मार्गाने परदेशी जातात. तुम्हाला अशा एखाद्या योजनेची भुरळ पडलीच तर खालील गोष्टींची छाननी केल्याशिवाय आपला पैसा, वेळ व श्रम वाया घालवू नका.
» कंपनीचा पूर्वइतिहास
» कंपनीची आतापर्यंतची कामगिरी
» कंपनीची उत्पादने व सेवा (यामध्ये उत्पादनांच्या किमती बाजारभावाप्रमाणे रास्त आहेत का, तसेच उत्पादनांच्या गुणधर्माविषयी केलेल्या दाव्यातील सत्यता पडताळून पाहा)
» प्रवेश फी
» कमिशन पद्धत (केवळ सभासद बनवा की उत्पादने विका)
काही उत्पादनांच्या गुणधर्माबाबत अतिरंजीत विक्रीसाठी दावे केले जातात. उदाहरणार्थ क्यू नेट कंपनीने बायोडिस्क नावाचे उत्पादन आणले होते. त्यांच्या दाव्यानुसार हा डिस्क पाण्यात घातल्यावर पाण्याची रेणूरचना बदलून त्याचा उपयोग कर्करोगासारखे असाध्य रोग बरे करण्यासाठी होऊ शकतो.
अन्य काही जादुई दावा करणारी उत्पादने म्हणजे नजर न लागू देणारी पेंडण्ट्स, घराजी ऊर्जा शुद्ध करणारी उपकरणे, चुंबकीय माळा, रुद्राक्ष माळा. अॅड. मृदुला भाटकर म्हणतात, की अशा योजनांवर सरकारने पूर्णपणे बंदी घालावी जेणेकरून, जरी आता लाखो लोकांचे नुकसान झाले तरी, भविष्यातील करोडो लोकांच्या आर्थिक फसवणुकीला आळा घालता येईल. अन्यथा फसवणुकीने लोक आर्थिक व मानसिकदृष्टया विकलांग होतील.
हल्ली प्रत्येक जण झटपट पैसे कसे कमावता येतील याचा शोध घेत असतो. याच मानसिकतेचा फायदा कंपन्या घेतात आणि स्वत:चे उखळ पांढरे करून घेतात. सारासार विवेकबुद्धी न वापरणे आणि झटपट श्रीमंतीच्या मोहात पडणे, यामुळे आपली अवस्था मात्र तेलही गेले तूप ही गेले आणि हाती राहिले धुपाटणे अशी होते.