भारतासमोर डावाच्या पराभवाचे संकट
लॉर्ड्स – फलंदाजांचे अपयश कायम राहिल्याने इंग्लंडविरुद्धच्या दुस-या क्रिकेट कसोटीमध्ये भारतासमोर डावाच्या पराभवाचे संकट आहे. पहिल्या डावात २८९ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाहुण्यांची तिस-या दिवशी रविवारी दुस-या डावात ६ बाद ६६ धावा अशी अवस्था झाली. स्टुअर्ट ब्रॉड (४ बळी) आणि जेम्स अँडरसन (२ बळी) या वेगवान दुकलीसमोर भारताच्या फलंदाजांनी कच खाल्ली.
भारताची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेल्या मुरली विजय याला अँडरसन याने दुस-या डावातही खाते उघडण्याची संधी दिली नाही. सावध खेळणारा लोकेश राहुलही (१०) अँडरसनची शिकार ठरला. २ बाद १३ धावा बिकट अवस्थेतील भारताला चेतेश्वर पुजारा (१७ धावा) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (१३ धावा) यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. कर्णधार विराट कोहलीही (१७ धावा) फार काळ खेळपट्टीवर थांबला नाही. ब्रॉडने तिन्ही महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. त्यानंतर त्याने दिनेश कार्तिकला शून्यावर बाद केले. अँडरसन (८-५-९-२) आणि ब्रॉड (११-५-१६-४) हे दोघे भारतासाठी पुरेसे ठरले.
तत्पूर्वी, ६ बाद ३५७ धावांवरून इंग्लंडने तिस-या दिवशी ७ बाद ३९६ धावांवर पहिला डाव घोषित केला. १२० धावांवर खेळणा-या ख्रिस वोक्स याने त्याच्या धावसंख्येमध्ये आणखी १७ धावांची भर घातली. भारतातर्फे मोहम्मद शमी आणि हार्दिक पंडय़ाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मात्र अनुक्रमे ९६ आणि ६६ धावा मोजल्या. इशांत शर्माने २२ षटकांत १०१ धावा दिल्या.
लॉर्ड्सवर १०० बळी घेणारा अँडरसन पहिला गोलंदाज
वैयक्तिक तिस-या षटकात जेम्स अँडरसन याने मुरली विजयला माघारी धाडले. त्याची ऐतिहासिक लॉर्ड्सवरील ही १००वी विकेट आहे. या मैदानावर १०० बळी घेणारा अँडरसन हा जगातील पहिला गोलंदाज आहे. विजयच्या विकेटसह अँडरसन याने कारकिर्दीतील बळींची संख्या ५५०वर पोहोचवली. अँडरसनपूर्वी, एखाद्या स्टेडियमवर १०० किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची करामत श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन याने साधली आहे. कारकिर्दीत ८००हून अधिक बळी टिपणा-या मुरली याने गॉल, कॅन्डी आणि सिंहलीज् स्पोर्ट्स क्लबवर (कोलंबो) शंभरहून अधिक विकेट घेतल्या आहेत.