सुमारे दीड महिन्यापूर्वी मुरुड फणसाड अभयारण्यात वेळास्ते बीट परिसरात कृष्णा केदारे व वाजंत्री या वनमजुरांचा हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
मुरुड- सुमारे दीड महिन्यापूर्वी मुरुड फणसाड अभयारण्यात वेळास्ते बीट परिसरात कृष्णा केदारे व वाजंत्री या वनमजुरांचा हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनांनंतर जाग आलेल्या वनखात्याने धूळ खात पडलेले ट्रॅप कॅमेरे या अभयारण्यात तात्काळ लावले. त्या दिवसापासून या कॅमे-यांना डुक्कर, ससे आणि बिबटे ट्रॅप झाले आहेत.
फणसाड अभयारण्यातील वेळास्ते, वावे, वांद्रे गावातील रहिवासी हिंस्त्र श्वापदांच्या वावरामुळे जीव मुठीत घेऊन जगत आहेत. काही शेतक-यांनी तर शेती करणेच बंद केले आहे. मागील काही घटनांनंतर वनखात्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने रहिवाशांत नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर वनखाते आणखी अशा स्वरूपाच्या घटना होण्याची वाट पाहत आहे का? असा थेट सवालच माजी सरपंच संदीप गोंडघरे यांनी केला आहे. या मोकाट श्वापदांपासून गावकरी आणि पर्यटकांना संरक्षण मिळावे, अशी माफक अपेक्षा येथील नागरिकांची आहे.