प्रेम प्रकरणे, कौटुंबिक कलह आणि व्यसनाधीनतेतून शेतकरी आत्महत्या करत असल्याचे उत्तर राधा मोहन सिंह यांनी राज्यसभेत दिले.
नवी दिल्ली- शेतक-यांच्या आत्महत्या या प्रेमप्रकरणांमुळे होतात, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शुक्रवारी लोकसभेत केले. सिंह यांचे वक्तव्य शेतकरीविरोधी असून असंवेदनशीलपणा दाखवणारे आहे, असा आरोप विरोधकांनी केला.
राज्यसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना सिंग म्हणाले की, शेतक-यांच्या आत्महत्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच कर्जबाजारीपणा, पीक न आल्याने, दुष्काळ, सामाजिक-आर्थिक व वैयक्तिक कारणांमुळे होतात. यासाठी त्यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी केंद्राच्या आकडेवारीचा हवाला दिला.
प्रेमप्रकरण, गरिबी, नंपुसकता आदींमुळेही या आत्महत्या होत असल्याचे केंद्राने नमूद केले आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली. त्यामुळे विरोधकांनी सिंह यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली. या विधानाचा समाचार घेताना कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना शेतक-यांच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या घरी पाठवावे.
सपाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सिंह यांनी माफी मागण्याची मागणी केली. सिंह यांचे विधान बेजबाबदारपणाचे आहे. माकपचे नेते सीताराम येचुरी म्हणाले की, आत्महत्येचे दिलेले कारण मुर्खपणाचा कळस आहे. मात्र, वास्तविकता वेगळी आहे. शेतीतील नुकसानीमुळे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या २६ टक्क्यांवर गेल्या आहेत.
आत्महत्येचे खरे कारण लपवण्यासाठी अशी वादग्रस्त विधाने केली जात आहेत. सीपीएमचे नेते डी. राजा म्हणाले की, शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचा दृष्टीकोन निष्ठुरपणाचा आहे. शेतकरी हे कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्या मदतीसाठी पावले उचलली पाहिजेत.
कृषीमंत्र्यांचे विधान शेतक-यांचा अपमान करणारे आहे. मंत्र्यांनी संसदेची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर हक्कभंगाची नोटीस देण्याचा इशारा जनता दल (सं.) चे नेते के. सी. त्यागी यांनी दिला.