गेल्या काही महिन्यांपासून मध्य व पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीचा खेळखंडोबा होत असून उपनगरीय वेळापत्रक दर दिवशी कोलमडून पडत असल्याचे पाहवयास मिळत आहे.
मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून मध्य व पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीचा खेळखंडोबा होत असून उपनगरीय वेळापत्रक दर दिवशी कोलमडून पडत असल्याचे पाहवयास मिळत आहे. रेल्वे प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका प्रवाशांना बसत असून याआधीही प्रवाशांच्या उद्रेकाचा रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागले आहे. रेल्वेचे वेळोवेळी कोलमडणारे वेळापत्रक आणि यामुळे प्रवाशांचा होणारा उद्रेक यामुळे रेल्वे कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांत स्टेशन अधीक्षक, रेल्वे तिकीट तपासनीस किंवा मोटरमन वा गार्ड यांना प्रवाशांनी घेराव घालण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने रेल्वेचे कर्मचारी दबावाखाली काम करत असल्याचे समजते. मुंबई उपनगरीय सेवेवर मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावर जवळजवळ दर दिवशी काही ना काही तांत्रिक बिघाडामुळे गाडय़ा किमान १० ते १५ मिनिटे उशिरानेच धावत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. उशिराने धावणा-या गाडय़ांमुळे गर्दीत वाढ होत असून काही वेळा ही गर्दी प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे.
प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होत असून काही ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून रेल्वे रोको करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण त्या पलीकडे जाऊन रेल्वे कर्मचा-यांना घेराव घालण्याच्या अथवा प्रसंगी तोडफोड करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. स्टेशन अधीक्षक, तिकीट खिडकीवरील कर्मचारी, मोटरमन, गार्ड आणि तिकीट तपासनीस हे प्रवाशांच्या थेट संपर्कात येत असल्याने त्यांच्यावर प्रवाशांचा सर्व रोष निघतो. गेल्या काही दिवसांमध्ये चेंबूर, गुरू तेगबहाद्दूर नगर, विलेपार्ले, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आदी ठिकाणी तिकीट तपासनीस, स्टेशन अधीक्षक आणि मोटरमन यांच्याबरोबर प्रवाशांनी तू तू मै मै झाल्याचे पाहावयास मिळाले.
चेंबूर येथे घडलेल्या घटनेत संबंधित मुलीकडे अधिकृत तिकीट नसतानाही तिच्या पालकांनी तिकीट तपासनीसांवर दबाव आणत, त्यांच्यावर चोरीचा आळ घेत या प्रकरणाला गंभीर वळण दिले. त्याचप्रमाणे गेल्या आठवडय़ात चेन्नई एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या एका तरुण उपनगरीय प्रवाशाकडे तिकिटाची विचारणा केली असता त्याच्या पालकांनीही संबंधित अधिका-याला दामटवण्याचा प्रकार घडला होता. गाडी दिरंगाईने चालणे किंवा यंत्रणेत बिघाड होणे, यासाठी अनेक तांत्रिक गोष्टी कारणीभूत असतात. अनेकदा तर काही व्यसनाधीन तरुण सिग्नलच्या वायर कापतात, त्यामुळेही तांत्रिक बिघाड होतात. मुंबईसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या शहरात देखभाल दुरुस्तीसाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे हे बिघाड होतात. मात्र, प्रवाशांनी कोणत्याही कारणासाठी थेट रेल्वे कर्मचा-यांवर दबाव आणणे चूक आहे, असे मत मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी मांडले.