पालिका निवडणुका घोषित होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.
नवी मुंबई- पालिका निवडणुका घोषित होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र प्रभाग रचनेवर आक्षेप आणि २०५ हरकती दाखल झाल्याने यावरील सुनावणी गुरुवारी दिवसभर ठेवण्यात आली आहे.
या सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी अनेक जणांना पालिका प्रशासनाने लेखी कळविले नसल्याने पालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. प्रभागरचनेबाबत हरकतींचा पाऊस झाल्याने त्याच्या निराकरणाचे कामही वाढले आहे.
पालिका पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८९ प्रभागांचे १११ प्रभाग झाले आहेत. या प्रभागांचे सीमांकन करताना अनेक तांत्रिक चुका झाल्याचा दावा सर्व राजकीय पक्षांनी केला आहे. या प्रभाग रचनेला न्यायलयात देखील आव्हान देण्यात आले होते. परंतु हरकती सूचना सुनावणी होऊ द्या, या नंतर जर याचिकाकर्त्यांचे समाधान झाले नाही तर पुन्हा न्यायलयात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
मात्र या नंतर देखील पालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरुच असून प्रभाग रचनेच्या हरकती सुनावणीच्या पूर्व संध्येला देखील अनेकांना पालिकेने लेखी उपस्थित राहण्याची सूचना कळविण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
नागरिक व राजकीय पक्षांनी घेतलेल्या हरकती व सुचनांची सुनावणी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत ठेवण्यात आली आहे. मात्र २०५ जणांच्या हरकती आणि सूचनांना ठेवलेली ही वेळ अत्यंत कमी असल्याने देखील नाराजी आहे.
दरम्यान प्रभाग रचनेवर याचिका दाखल करणा-या नवी मुंबई काँग्रेसचे सचिव सुधीर पवार यांनी पालिका उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्याकडे तक्रार करून याबाबत जाब विचारला. पवार यांच्या पत्त्यावर लेखी पत्र पाठविण्याऐवजी पालिका प्रशासनाने पक्ष कार्यालय आणि जिल्हाअध्यक्ष दशरथ भगत यांच्या घरी पत्र पाठविल्याचा दावा केला, मात्र या दोन ठिकाणी देखील पत्र मिळाले नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
दरम्यान पालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी देखील प्रभाग रचनेला हरकत घेतली आहे. त्यांना देखील सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी एसएमएस करून जबाबदारी पार पडल्याची भूमिका प्रशासनाने निभावली आहे.
लेखी कळविल्यास न्यायालयात पुरावे म्हणून न्यायालयात हे पत्र उपयोगी पडेल मात्र पालिका प्रशासन मात्र लेखी पत्रे देण्यास चालढकल करीत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये नाराजी आहे. या संदर्भात पालिका उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांनी सुनावणी बाबत आपण व्यक्तिश: संपर्क साधला असून फोन देखील केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान अनेक जणांनी अर्धवट पट्टे आणि अपूर्ण मोबाईल क्रमांक टाकले असल्याने अशा लोकांना शोधून आम्ही लेखी पत्रे देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचा दावा देखील पटनिगीरे यांनी केला आहे.