लांजा शहरापासून ८ कि.मी. अंतरावर आणि तालुक्याच्या पश्चिम भागात निओशी हे टुमदार गाव वसले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या गावात सर्वच गावकरी मोठय़ा गुण्यागोविंदाने राहतात. धार्मिक सण, प्रथा-परंपरा जोपासतानाच आधुनिकतेची कास धरणारे हे गाव हळूहळू कात टाकू लागले आहे.
लांजा- लांजा शहरापासून ८ कि.मी. अंतरावर आणि तालुक्याच्या पश्चिम भागात निओशी हे टुमदार गाव वसले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या गावात सर्वच गावकरी मोठय़ा गुण्यागोविंदाने राहतात. धार्मिक सण, प्रथा-परंपरा जोपासतानाच आधुनिकतेची कास धरणारे हे गाव हळूहळू कात टाकू लागले आहे. एका बाजूला डोंगररांगांनी कोंदण घातलेले आणि दुस-या बाजूला मुचकुंदी नदीचा किनारा अशा निसर्गसंपन्न परिसरामध्ये निओशी गाव वसले आहे. या गावचे वैशिष्टय़ म्हणजे येथील डोंगरभागात असणारा व बारमाही वाहणारा झरा होय. आजवर कधीही न आटलेल्या या झ-याचे पाणी ग्रॅव्हिटीने गावात आणून त्याद्वारे गावच्या पाण्याची तहान भागविण्यात आली आहे.
हिंदू धर्मातील रूढी-परंपरांचा पगडा असणा-या निओशी गावचे प्रमुख दैवत म्हणजे श्री देव ठाणेश्वर होय. इंदवटी-निओशी या मुख्य रस्त्यापासून ५०० मीटर अंतरावर हे मंदिर आहे. सभोवताली असणा-या निसर्गरम्य वातावरणामुळे या देवस्थानचा परिसर मन मोहून टाकतो. याखेरीज मंदिरामध्ये श्री ब्राह्मणदेव, श्री विठ्ठलाई देवी यांच्याही मूर्ती आहेत. ठाणेश्वर हे देवस्थान अतिशय जागृत व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे देवस्थान म्हणून श्री ठाणेश्वर या देवस्थानाची ओळख आहे. दरवर्षी महाशिवरात्री व त्रिपुरारी पौर्णिमेला श्री ठाणेश्वराचा यात्रोत्सव मोठय़ा जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो.
यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित राहून श्री ठाणेश्वराच्या चरणी नतमस्तक होतात. श्री ठाणेश्वर देवस्थानाचे पुजारी म्हणून प्रकाश बारगोडे हे काम पाहतात. तर प्रकाश मांडवे, संतोष साटले व तुळाजी पडय़ार हे देवस्थानाचे मानकरी आहेत. तर गावचा शिमगोत्सवही अशाच प्रकारे पारंपरिकपणे जल्लोषात साजरा होतो. शिमगोत्सवामध्ये टिपरी खेळ गावाबरोबरच गावाबाहेरही नेला जातो. टिपरी खेळ हे गावचे एक वेगळे वैशिष्टय़ मानले जाते.
तसेच निओशी गावामध्ये जांगलदेव, श्री गणपती मंदिर आहे. यापैकी जांगलदेवाचा यात्रोत्सवही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. दरवर्षी देव दीपावलीला जांगलदेवाची मोठी यात्रा भरते. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. शैक्षणिक अंगाचा विचार करता निओशी गावामध्ये जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची एक शाळा आहे. पूर्ण प्राथमिक शाळेसाठी येथील मुलांना कोंडये येथे तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना खावडी आणि लांजा येथे जावे लागते. गावामध्ये ठाणेश्वर नाच व नमन मंडळाबरोबरच अन्य मंडळे कार्यरत आहेत. या मंडळांच्या माध्यमातून गावामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. गावाला वारकरी सांप्रदाय परंपरादेखील असून दरवर्षी कार्तिकी एकादशीला येथील १५ ते २० वारकरी पंढरपूरला जातात. लांजा बसस्थानकातून थेट एस.टी. फे-या सोडण्यात येत असल्याने निओशी गावामध्ये जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही. याबरोबरच अन्य खासगी वाहनांची सतत रहदारी असते.
निओशी-इंदवटी ग्रुप ग्रामपंचायत असून यामध्ये इंदवटी या गावाचा समावेश आहे. निओशी गावची लोकसंख्या सुमारे ६००च्या आसपास आहे. गावामध्ये वरचीवाडी आणि तांबेवाडी या वाडय़ा आहेत. एकूण सात सदस्यसंख्या असणा-या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा सौ. बाईत या सांभाळत आहेत. उपसरपंच म्हणून विजय भगते तर सदस्य म्हणून मिना भगते, सौ. सावंत, सचिन तांबे, सुवर्णा तांबे व नामदेव कानडे हे कार्यरत आहेत. ग्रामसेवक म्हणून श्री. सुवारे हे काम पाहतात. गावामध्ये कुणबी समाज बहुसंख्येने म्हणजे ९९ टक्के इतका असून सर्व जण एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदतात. प्रशासकीय कामकाज हे ग्रामपंचायतीमार्फत चालते. निओशी
निओशी गावात लघुपाटबंधारे धरणप्रकल्प पूर्णत्वास गेला असून गावाच्या जलसिंचनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणारा आहे. डोंगरातील बारमाही वाहणा-या झ-याचे पाणी विनावीज व ग्रॅव्हिटीने गावात आणून गावातील लोकांनी पिण्याच्या पाण्याची अडचण सोडविली आहे. त्यामुळे मे महिन्यात अन्य गावांप्रमाणे निओशी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही. भातशेती हाच निओशी येथील ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय आहे. भातशेतीबरोबरच वरी, नाचणी पिकेही घेतली जातात.
तर आंबा, काजू पीक हा देखील आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. अनेक शेतक-यांनी काजू, आंबा कलमांच्या बागा फुलविल्या आहेत. यातून वर्षाकाठी चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. तसेच उन्हाळी व हिवाळी हंगामात येथील ग्रामस्थ शेवगा, उडीद, कुळीथ, पावटा, मिरची, वाल, वांगी आदी भाजीपाला लागवड करतात. लांजा या स्थानिक बाजारपेठेत या भाजीपाल्याची विक्री करून आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टिकोनातून येथील काही शेतकरीवर्गाची धडपड सुरू असते. तसेच येथील हरहुन्नरी तरुण शेतकरी सुनील पडय़ार यांनी शेतीबरोबरच काजू फॅक्टरी, गावठी कोंबडय़ा पालन यासारख्या शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग अवलंबिला आहे. अशा प्रकारे धार्मिक लोककला, सण, उत्सव उत्स्फूर्तपणे साजरे करणारे आणि मुचकुंदी नदीच्या समृद्ध तीरावर वसलेले निओशी गाव प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे.