प्रत्येकाला भेटल्याशिवाय मी येथून जाणारच नाही, असे आपलेपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दाखवल्याने रायगड जिल्हावासीय भारावून गेले.
मुंबई – येथे आलेल्या प्रत्येकाला भेटल्याशिवाय मी येथून जाणारच नाही. स्वीकारलेल्या प्रत्येक निवेदनांबाबत जातीने लक्ष घालून सर्वाचे प्रश्न मार्गी लावणार आहे. निवेदन देणारी व्यक्ती कोणत्या धर्म, पंथ, जात अथवा पक्षाची आहे, याचा विचार न करता केवळ माणुसकीच्या भावनेतून त्यांचे प्रश्न सोडवले जातील, असे आपलेपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दाखवल्याने रायगड जिल्हावासीय भारावून गेले. निमित्त होते अलिबाग येथे आयोजित ‘जनता दरबारा’चे. एका मंत्र्यांने तालुका- गावपातळीवरून आलेल्या प्रत्येकांचे गा-हाणे ऐकून त्यांच्याशी थेट संवाद साधल्याने गावखेडय़ातून आलेल्या अनेकांच्या चेह-यावरील आनंद लपत नव्हता.
रायगड जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार, कामगार, बेरोजगार तरुणांशी नारायण राणे यांनी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोकणविषयी आंतरिक जिव्हाळा असलेल्या राणे यांनी गावच्या पद्धतीनुसार त्यांना समस्यांचे निवेदन सादर करणा-या प्रत्येक व्यक्तींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
अगदी विशी-बाविशीपासून सत्तरीतल्या ज्येष्ठांचाही त्यात समावेश होता. सामूहिक व वैयक्तिक निवेदने स्वीकारल्यानंतर अधिका-यांशी चर्चा करून त्याचे तातडीने निवारण करण्याचे आदेश नारायण राणे यांनी दिले.