मुंबईत येणा-या नव्या रिक्षा, परमिट जाळा, असे प्रक्षोभक भाषण करत राज ठाकरे समाजात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे.
मुंबई – मुंबईत येणा-या नव्या रिक्षा, परमिट जाळा, असे प्रक्षोभक भाषण करत राज ठाकरे समाजात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहे. राज यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो, अनुचित प्रकारांना उत्तेजन देणा-या राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच राज यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १०व्या वर्धापनदिनी राज यांनी प्रक्षोभक भाषण करून पुन्हा एकदा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगार व रिक्षाचे परवाने मिळाले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. तसेच मुंबईत १५ वर्षापेक्षा अधिक वास्तव्य करणा-या व जे ऑनलाईन लॉटरी पद्धतीत रिक्षा परवान्यासाठी पात्र असतील, अशांना शासनाच्या नियमानुसार रिक्षा परवाना मिळालाच पाहिजे, असेही निरुपम म्हणाले.