राज ठाकरे यांनी पोलिसांचे दु:ख जाणून पाठिंबा दिल्यामुळे भारावून गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद तावडे यांनी राज यांना गुलाबाचे फुल दिले. ‘ऑन ड्युटी’ असताना त्यांनी दिलेली ही गुलाबभेट चर्चेचा विषय ठरली आहे.
![chief Raj Thackery ap (30)](http://prahaar.in/wp-content/uploads/2012/08/chief-Raj-Thackery-ap-30.jpg)
तत्पूर्वी राज ठाकरेंनी 20 मिनिटांच्या भाषणात राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांच्यावर तोफ डागत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. गृहखात्यावर अशी टीका केल्यानंतरही पोलिस शिपायाने हे पाऊल उचलण्याची ही घटना लक्षवेधी ठरली आहे. तावडे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी भायखळा येथील वायरलेस विभागात कार्यरत असल्याचे सांगितले. 13 ऑगस्ट 2010 रोजी सीआयएसएफच्या 15 जवानांनी मारहाण केली होती. याबाबत वरिष्ठ पातळीवर दाद मागण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला वेडे ठरवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांच्याकडेही दाद मागितली. पण त्यांच्याकडून ‘पाहतो’ यापलीकडे कोणतेच उत्तर आले नाही, असे सांगितले.
संघटना नसल्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही. जिथे गृहविभाग आमचे मनोधैर्य खच्ची करत होता, तिथे राज ठाकरेंनी आमचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना गुलाब भेट दिल्याचेही ते म्हणाले. या भेटीमुळे नोकरी धोक्यात आली नाही का, या प्रश्नावर ‘नोकरी गेली तरी पर्वा नाही,’ असे ते म्हणाले.
तावडे यांचा जबाब नोंदवला
मनसेच्या व्यासपीठावर जाऊन राज ठाकरे यांना गुलाबाचे फूल देणा-या पोलिस नाईक प्रमोद तावडे यांचा जबाब नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत आझाद मैदान पोलिस ठाण्यात सुरू होते. दोन वर्षापूर्वी तावडे यांना सीआयएसएफच्या जवानांनी बेदम मारहाण केली होती. याबाबत मुंबई पोलिस आयुक्त अरुप पटनायक, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे व्यथा मांडूनही न्याय मिळाला नाही, उलट टिंगल करण्यात आली, असे तावडे यांचे म्हणणे आहे. आपल्या भावना राज ठाकरे यांच्याकडे मांडल्या, असेही ते म्हणतात. दिल्ली, गुजरातमध्ये पोलिसांच्या युनियन आहेत, युनियनच्या माध्यमातून पोलिसांच्या समस्या या संबंधितांकडे मांडता याव्या, यासाठी मुंबई पोलिसांतही युनियन सुरू करण्यात यावी, अशी त्यांची मुख्य मागणी होती.