आसाममधील तिनसुकिया येथील पेंगेरी परिसरात सोमवारी विजेच्या धक्क्याने ११ जणांचा मृत्यू झाला.
तिनसुकिया- आसाममधील तिनसुकिया येथील पेंगेरी परिसरात सोमवारी विजेच्या धक्क्याने ११ जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी या परिसरात दोन जणांची हत्या झाली होती. या हत्याकांडातील आरोपीला अटक करावी, यासाठी येथील नागरिकांनी आंदोलन पुकारले होते. या वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
या वेळी तारेला गोळी लागल्याने तार कोसळली. या घटनेला आसामच्या पोलीस महासंचालकांनी दुजोरा दिला असून हवेत गोळीबार करताना तार तुटून ती लोकांवर पडल्याचे ते म्हणाले. या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत.
आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पेंगेरी परिसरात काही जणांनी आंदोलन केले होते. या वेळी पोलीस आणि या नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. आंदोलकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यांच्याकडे हत्यारे आणि पेट्रोलबॉम्बही होते. या वेळी आंदोलकांकडून पोलीस स्थानकावर दगडफेकही केली.
त्यामुळे आंदोलकांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना अखेर गोळीबार करावा लागला. या वेळी गोळीबार करताना विजेच्या तारेला गोळी लागल्याने तार कोसळली. यात १३ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. सिंह यांनी नंतर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी चर्चा केली. तेव्हा गोगोई यांनी त्यांना परिस्थितीची कल्पना दिली.