पेड न्यूज प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने नेमलेल्या समितीला प्रथमदर्शनी चार लोकसभा उमेदवार दोषी आढळून आले आहेत.
मुंबई- पेड न्यूज प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने नेमलेल्या समितीला प्रथमदर्शनी चार लोकसभा उमेदवार दोषी आढळून आले आहेत. समितीने सादर केलेल्या या अहवालात ही बाब समोर आली आहे. असे असले तरी या प्रकरणी उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे दाद मागता येणार आहे. दरम्यान, पेड न्यूज दिल्याचा आरोप या सर्वच उमेदवारांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे.
लोकसभा निवडणुकीत पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची बारीक नजर होती. अशा घटनांवर नजर ठेवण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. अशी प्रकरणे आढळल्यास त्याची शहानिशा करूनच याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करायचा होता. त्यानुसार समितीने राज्यातील चार लोकसभा उमेदवारांना प्रथमदर्शनी दोषी ठरवल्याचा अहवाल राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिला आहे.
दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा, उत्तर मुंबईचे उमेदवार संजय निरुपम, पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विश्वजीत कदम आणि भाजपचे अनिल शिरोळे यांचा यात समावेश आहे. स्थानिक वर्तमानपत्रात या उमेदवारांनी पैसे देऊन पेड न्यूज दिल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे.
दरम्यान, हे आरोप चारही उमेदवारांनी फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याची मुभा आहे. शिवाय निवडणुकीत जाहिरातींसाठी केलेल्या खर्चाचा तपशीलही ते निवडणूक आयोगाला सादर करून आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करू शकतात.