केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळमध्ये आलेल्या महापुरात ३२४ बळी गेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळसाठी ५०० कोटींची मदत जाहीर केली. महाराष्ट्रही केरळला २० कोटींची मदत देणार आहे.
तिरुवनंतपुरम- केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत ३२४ बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, केरळमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हवाई पाहणी केली असून, त्यांनी केरळसाठी ५०० कोटींची तत्काळ मदत जाहीर केली. देशभरातून मदतीचे हात पुढे येत असून महाराष्ट्रही केरळला २० कोटींची मदत देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. आठवडाभर कोसळणा-या पावसाने राज्य पार कोलमडून गेले असतानाच, १४ पैकी १३ जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, आयटीबीपीचे जवान पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. सर्व प्रमुख व मोठय़ा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असून परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री पिनराई विजयन, केंद्रीय मंत्री के. जे. अल्फान्स यांच्याशी झालेल्या बैठकीमध्ये मोदी यांनी केरळला ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली. याचबरोबर मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली.
बैठकीमध्ये पंतप्रधानांकडे मुख्यमंत्र्यांनी २ हजार कोटींची मागणी केली होती. मात्र, पंतप्रधानांनी ५०० कोटींची मदत देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री विजयन यांनी केरळमध्ये १९ हजार ५१२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्याचे केरळ मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवर म्हटले आहे.
स्टेट बँकेनेही केरळवासीयांना दिलासा दिला असून दोन कोटींची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. तसेच बँक ऑफ केरळच्या खातेदारांना सेवा शुल्क आणि इतर दंड माफ करण्यात येणार आहे. तसेच यूएईचे राजे शेख खलिफा यांनी केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्कालीन समिती नेमण्याची सूचना केली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळला २० कोटींची मदत जाहीर केली, तर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी १० कोटींची मदत जाहीर केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केरळ मुख्यमंत्री मदत निधीला १० कोटी देण्याचे जाहीर केले.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीदेखील केरळला ५ कोटी रुपये आणि मदतीसाठी २४५ अग्निशामक दलाच्या जवानांना बोटींसह केरळला पाठविण्याचे जाहीर केले आहे. भारतीय सैन्याकडून विशेष विमानाने अन्न आणि इतर गरजेच्या वस्तू तिरुअनंतपुरमला पोहोचल्या.
केरळमधील महापुराला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून आपल्या सद्भावना केरळवासियांसोबत असल्याचे म्हटले आहे.
क्रीडा विश्व एकवटले
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेकांनी केरळवासियांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली आहे. केरळमधील प्रत्येकाने सुरक्षिततेची काळजी घ्यावी. शक्य असेल तर घरातच रहावे. लवकरच ही परिस्थिती सुधारेल अशी आशा करतो. या परिस्थितीत मदतकार्य करणा-या भारतीय जवानांचे आभार असे विराटने ट्विट केले आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झाने, खेळाडू आणि संपूर्ण भारतीय तुमच्या पाठीशी आहेत, असा संदेश पाठवला आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंडय़ा, हरभजन सिंग, केरळा ब्लास्टर क्लबचा फुटबॉलपटू इयान ह्युम याच्यासह क्रीडा विश्वातील अनेकांनी केरळच्या लोकांसाठी मदतीची साद घातली आहे.
कर्नाटकलाही पावसाचा तडाखा; कोडगूमध्ये सहा बळी
केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवलेला असतानाच शेजारच्या कर्नाटकमध्येही पावसाने काल थैमान घातले. कोडगू जिल्ह्यामध्ये जवळपास ११ हजार घरांचे नुकसान झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बँकांना एटीएममध्ये पुरेसे पैसे ठेवण्यास सांगण्यात आल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले. कुमारस्वामी यांनी सांगितले की, कोडगूमध्ये जवळपास १ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एनडीआरएफ, नौदल, लष्कर आणि अग्निशामक दलाच्या जवानांचा समावेश आहे. हवाई दलाकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे.
गर्भवती महिलेसाठी जवान ठरले देवदूत
केरळमधील एका गर्भवती महिलेला वैद्यकीय मदतीची गरज असताना भारतीय नौदलाचे जवान तिच्या मदतीसाठी आले. या जवानांनी त्या महिलेला घरातून बाहेर काढत एका हेलिकॉप्टरच्या साहाय्याने रुग्णालयात नेले. तिथे त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सजिता झाबे असे त्या महिलेचे नाव आहे.
छतावर उतरविले हेलिकॉप्टर
केळरमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांनी बचावकार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. अशाच एका वीर जवानाचे शौर्य थक्क करणारे आहे. माणसांचे पोहोचणे जिथे जवळपास अशक्य होते अशा ठिकाणी एका घराच्या छतावरच हेलिकॉप्टर उतरवून या जवानाने २६ लोकांचे प्राण वाचवले. शौर्यचक्र विजेते कॅप्टन पी. राजकुमार असे या जवानाचे नाव आहे. गर्द झाडींमध्ये कोप्टन कुमार यांनी हवाई दलाचे सी किंग ४२ बी हे चॉपर उतरवले आणि २६ लोकांना एअरलिफ्ट केले. या ऑपरेशनच्या अखेरपर्यंत ३२ जणांचे प्राण वाचले होते.
केरळच्या मदतीला महाराष्ट्र धावला
केरळमध्ये महापुरामुळे हाहाकार माजला असून नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून शनिवारी तब्बल सात लाख लिटर पाणी रेल्वेने केरळला पाठविण्यात आले. रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहेत. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी केरळला रवाना करण्यात येणार आहे.