जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तरुणांचा नेता कन्हैया कुमार आंबेडकर जयंतीनिमित्त नागपुरात आला. त्याच्याभोवती तरुणांची प्रचंड गर्दी होती. विद्यार्थी नेता म्हणून कन्हैयाला आता तरुणांनी स्वीकारले आहे. संघर्षाशिवाय नेतृत्व उभे राहात नाही.
नेहरू विद्यापीठातील संघर्षामध्ये एक कन्हैया मिळाला. या देशात तरुणांच्या पिढीत नवीन नेतृत्व पुरोगामी विचारांनी आखलेले असायला हवे. कारण देशात आणि या राज्यात प्रतिगामी प्रवृत्ती सत्तेवर आहेत. नाईलाज म्हणून ही सरकारे लोकशाहीने सत्तेवर बसली पण सत्ताधारी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मनोमन स्वीकारली नाही.
कारण कन्हैया नागपूर विमानतळावर उतरल्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केली. गाडीच्या काचा फोडल्या. राज्यातले सरकार भाजपाचे असल्यामुळे संघवाले, बजरंग दलवाले, विश्व हिंदू परिषदवाले या सगळ्यांना सरकारचे पुरेपूर संरक्षण आहे. त्यामुळेच कन्हैयाच्या गाडीवर हल्ला झाला.
कन्हैयाच्या समोर हल्ला झाला आणि कन्हैयावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. बजरंग दलाच्या टोळक्यांनी कन्हैयावर चप्पल भिरकावली. काही जण व्यासपीठावरही चढले. कन्हैयाला मारून टाकायचा डाव असणार. संघ, जनसंघ भाजपाचा विचार ज्यांना मान्य नाही त्यांना ‘हाणा, मारा, ठोका’ असे प्रकार आता देशात सुरू झाले आहेत. ते देशाच्या सार्वभौमत्वाला खिंडार पाडणारे ठरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना लोकशाही पद्धतीने उत्तर देण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे.
कन्हैया त्यासाठी पुढे सरसावला आहे. त्याचे हात बळकट करीत राज्यात व देशात गेल्या काही वर्षापासून बिघडू पाहणारे वातावरण पुन्हा एकदा शुद्ध करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लोकशाहीवर विश्वास असणा-या सर्वच विचारधारांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.
कन्हैयावर ज्या पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्यावरून आता भाजपाची (अ)नीती उघड झाली आहे. या हल्ल्यानंतर कन्हैया डगमगलेला नाही. त्याने हिंमतीने भाषण केले आणि प्रचंड गर्दी केलेल्या तरुणांनी त्याच्या भाषणाला मोठा प्रतिसाद दिला. नागपूर ही संघभूमी म्हणून सांगितली जाते.
१९२५ साली संघाची स्थापना याच नागपुरात हेडगेवारांनी केली, परंतु तेच नागपूर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे ते संघभूमी म्हणून तसेच दीक्षाभूमी म्हणूनही. जगातले सर्व देशातले लोक नागपुरात आले तर रेशीम बागेत जात नाहीत. ते चैत्यभूमीवर येतात, त्यामुळे नागपूर ही संघभूमी हे विशेषण जगाने नाकारले आहे आणि चैत्यभूमी श्रद्धेने स्वीकारलेले आहे.
तरुणांचा नेता असलेल्या कन्हैयाने हे सामाजिक सत्य अतिशय परखड शब्दांत मांडले, त्यामुळे तरुणांच्या समोर एक प्रभावी विचार त्याने ठेवला. देशातल्या नव्या पिढीत आज या पुरोगामी विचाराची फार मोठी गरज आहे. भाजपाच्या हाती सत्ता आल्यामुळे संघ आक्रमक बनलेला आहे आणि सत्तेमार्फत शासकीय व्यवस्थेमध्ये सर्व ठिकाणी संघाची माणसे घुसविण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. संघ आता ९३ वर्षाचा झालेला आहे.
या ९३ वर्षात स्वातंत्र्याच्या लढाईच्या काळाच्या वर्षात संघ होता कुठे? संघ स्थापन करणारे हेडगेवार स्वातंत्र्याच्या चळवळीत तरुण होते. सगळा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता. मातृभूमीला मुक्त करण्यासाठी लढत होता आणि संघ स्थानावर ‘नमस्ते सदावत्सले मातृभूमी’ ही प्रार्थनाच सुरू होती. पण तिच्यासाठी लढायचे त्यांना समजले नाही.
ना हेडगेवार, ना गोळवलकर, ना अडवाणी, ना वाजपेयी लढले. आज देशप्रेमाच्या गप्पा मारणारी ही मंडळी तेव्हा होती कुठे? स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी संघ शाखेवर संघवाल्यांनी कधी राष्ट्रध्वज फडकवला का? देशप्रेम, त्याग याच्याशी यांचा काही संबंध नाही, त्यामुळे नागपूर ही संघभूमी कधीच होऊ शकणार नाही.
कन्हैयाने हे सत्य सांगितले आहे. कन्हैयाप्रमाणे पुरोगामी विचारांचा तरुणांचा गट देशात सगळीकडे निर्माण करावा लागेल. देशाची मूलतत्त्वे, घटना, संसद आणि देशाचा सर्वधर्मसमभाव हे विचार तरुणांपर्यंत पोहोचवावे लागतील, कारण भाजपाकडून देशपातळीवर विविध महाविद्यालयांत तरुणांची डोकी खराब करण्याचे काम प्रचारीरीत्या व्याख्याते नेमून पद्धतशीरपणे सुरू झाले आहे.
विविध ठिकाणच्या उत्तम नोक-या सोडून या प्रचारी धर्मपंडितांना पगार लाख, दोन दोन लाख रुपये दिले जात आहेत. गाडी-घोडय़ांची व्यवस्था केली आहे आणि त्यांना एवढेच काम दिले जात आहे की २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जे तरुण मतदार होतील, त्यांना भाजपा संघाची महती सांगायची. जो संघाची विचारसरणी मानत नाही. किंबहुना पुरोगामी विचारांची कास धरून समाजात समानता, स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न करीत असेल त्याला देशद्रोही ठरवून मोकळे व्हायचे. त्याचेच ‘बौद्धिक’ संघ शाखेत द्यायचे, अशी सगळी व्यूहरचना पद्धतशीररीत्या सुरू आहे. त्यांचा चेहरा एक नाही.
अनेक तोंडी असणारे हे चेहरे संघाने तयार केलेले आहेत. ते आपल्याला दिसणार नाहीत. दिसले तरी ते किती महत्त्वाचे सामाजिक काम करतात असा भास निर्माण करायचा, माध्यमातील पत्रपंडितांकडून त्याला सेवेचा मुलामा द्यायला सांगायचा, असे उद्योग सध्या देशपातळीवर सुरू आहेत. त्याचा रिमोट कंट्रोल रेशीमबागेत आहे. त्यामुळे तरुणांनी अशा मंडळींपासून वेळीच सावध राहिले पाहिजे. अन्यथा धड आपले राहील. त्यावरील डोक्यात दुस-याचेच राज्य सुरू राहील. ते टाळण्यासाठी कन्हैयासारख्या तरुणांची इथे गरज आहे.
जे आजच्या तरुणांना संघ, भाजपापासून नेमका काय धोका आहे? हे प्रभावीपणे सांगू शकतील. राजकीय नेत्यांच्या या संदर्भात फारसा उपयोग होऊ शकणारा नाही. तरुणांच्या भाषेत बोलणारा आणि तरुणांच्या वेदना समजणारा तरुण हे काम प्रभावीपणे करू शकतो. अशा तरुणांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. ज्यांनी गांधीजींना मारायला कमी केले नाही ती विचारप्रवृत्ती पानसरेंना मारण्यापर्यंत अजून कायम आहे. त्यामुळे पुढचा काळ हा कठीण, संघर्षाचा काळ आहे. कन्हैया त्याचे प्रतीक आहे. याची प्रचिती त्याने नागपुरात आणून दिली आहे.
कन्हैया आज देशातील पुरोगामी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे. बिहारमधील सामान्य कुटुंबातून आलेल्या या तरुणाने अनेक वर्षानंतर देशातील राजसत्तेला हलवण्याचे काम केले आहे. त्याने तर मोदी आणि भाजपाच्या गंडस्थळावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. घटनेनुसार प्रत्येक नागरिक त्याला आवडणारा लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. पण असा नागरिक जेव्हा मतदान करतो, तेव्हा त्या लोकप्रतिनिधीने आपल्या विकासासाठी प्रयत्न करावे.
नित्याच्या अडचणींची सोडवणूक करावी, ही माफक अपेक्षा बाळगून असतो. त्यात तो लोकप्रतिनिधी यशस्वी झाला नाही, तर त्याचा भ्रमनिरास होतो. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यानची मोदी यांची भाषणे आठवा. त्यांनी काय काय घोषणा दिल्या होत्या. पण त्यातील किती घोषणा हे केंद्रातील सरकार पुरे करू शकले याचे उत्तर मागण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे उत्तर शून्य असेच द्यावे लागेल.
विकासाचा अजेंडा मांडून केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाला त्यांच्या आश्वासन पूर्ततेचा विसर पडलेला आहे. त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारमधील साधू, महंत कधी ‘रामजादे, हरामजादे’चा मुद्दा उपस्थित करीत धार्मिक दहशत निर्माण करीत आहेत. सरसंघचालक व संघ आरक्षणाच्या फेरविचाराची मागणी येनकेन् प्रकारेन पुढे रेटत आहे. अशा वावटळी वातावरणात सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास भक्कम करण्यासाठी, तरुणांमध्ये नवी ऊर्जा पेरण्याचे काम कन्हैयासारखा तरुण करीत असेल तर त्याचे हात बळकट केले पाहिजेत. त्यासाठी लोकशाहीवर विश्वास असणा-या पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्तींनी, संस्था, संघटना व पक्षांनीही पुढे येण्याची गरज आहे.
त्याने पुरोगामी विचार अधिक प्रवाहित होतील. कन्हैयावर हल्ला करण्याचा प्रयत्न बजरंग दलाने केला. पण त्याला तातडीने उत्तर देण्यात आले. असाच हल्ला यापुढे कोणी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर लोकशाहीवर विश्वास असणा-या प्रत्येक व्यक्तीने सनदशीर मार्गाने हा हल्ला परतावण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हल्ला करणा-यांचे धैर्य वाढू शकते.