तुरुंगवासाची शिक्षा झाल्यापासून वारंवार पॅरोलवर बाहेर येणारा बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने पुन्हा एकदा पॅरोलवर रजा मागितली आहे.
पुणे – तुरुंगवासाची शिक्षा झाल्यापासून वारंवार पॅरोलवर बाहेर येणारा बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने पुन्हा एकदा पॅरोलवर रजा मागितली आहे. संजय दत्तने तुरुंग प्रशासनाकडे चौदा दिवसांच्या रजेसाठी अर्ज केला आहे.
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी संजय दत्तला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. शिक्षा झाल्यापासून आतापर्यंत संजय दत्त अनेकदा कधी स्वत:च्या आजारपणाचे तर, कधी पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण पुढे करुन, पॅरोलवर बाहेर आला आहे.
संजयला इतर कैद्यांपेक्षा वारंवार मिळणा-या अशा प्रकारच्या वेगळया वागणुकीमुळे अनेकदा तत्कालिन राज्य सरकारवर टिका झाली होती. सध्या राज्यात सत्तेवर असणा-या भाजपने त्यावेळी विधिमंडळात संजय दत्तला वारंवार मिळणा-या पॅरोलचा मुद्दा उपस्थित करुन, सरकारची कोंडी केली होती.
आता गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे भाजप आता काय करणार ? आपल्या अन्य आश्वासनांप्रमाणे इथेही घुमजाव करुन, सेलिब्रेटींना वेगळा न्याय लावणार? याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.